सताऱ्यातील पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद; आंबेनळी घाट ‘या’ वेळी असणार बंद

0
7


Maharashtra Weather Update:  सातारा आणि जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट बंद राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दोन ठिकाणी दरड पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कडून हा निर्णय घेण्यात आलाय. महाबळेश्वर ते पोलादपूर घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर धुके असल्यामुळे त्याचबरोबर मागील दोन ते तीन दिवसापासून सलग मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत असल्यामुळे दरड पडण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी हा घाट पुढच्या आदेशापर्यंत संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहे.

दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या अजब कारभाराचा अजब आदेश बघायला मिळतोय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत हा बंदचा आदेश लागू असणार आहे.

निर्बंध लावलेली ठिकाणे कोणती?

अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केरळली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव , बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा, तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळ त्याचबरोबर धरण अशा पर्यटन स्थळाच्या परिसरामध्ये पर्यटक गर्दी होत असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध घातले आहेत. तर या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे. 

आंबेनळी घाटात तीन ठिकाणी कोसळली दरड

रायगडमध्ये दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मोठा फटका बसला . त्यानंतर  आता पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये देखील तीन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. या दरडीसोबत रस्त्यावर माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक जवळपास दोन तासांहून अधिक वेळ बंद आहे. प्रशासनाकडून तीनही ठिकाणी दरड बाजूला घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरड बाजूला होईपर्यंत आंबेनळी घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पहिल्याच पावसात सहा महिन्यापूर्वी तयार केलेला डांबरी रस्ता गेला वाहून 

नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा ते भिलवडी असा रस्ता सहा महिन्यापूर्वीच डांबरीकरण करून नवीनच बनवायला होता. मात्र रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने आता या परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे . सध्या पेरणीचे दिवस असल्याने मात्र या परिसरातील जवळपास १० गावातील नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं चित्र आहे. पहिल्याच पावसात रस्ता वाहूनच गेला नाही तर रस्त्यात मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद पडली आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link