- Marathi News
- Opinion
- Pandharpur Wari Journey Update; Sonune Guruji’s Lifelong Warkari Mission Honoured
आरती सुहास सदाव्रते12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शैक्षणिक क्षेत्रासह वारकरी संप्रदायाची जीवनमूल्य रुजविण्यासाठी पाच दशकांपासून अविरत हरिनामाचा जागर मांडणारे जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील हभप गुरुवर्य सोनुने गुरुजी कृतीशील आदर्शाचे दीपस्तंभ आहेत. जाफराबाद तालुक्यातील 35 गावातील शेकडो शिष्य परिवारांनी ‘गुरुजी बाबां’चा अमृत जीवनाचा अमृत महोत्सव सोहळा मे महिन्यात साजरा केला. या सोहळ्यानिमित्त ‘वारी’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जालन्यातील सुयश प्रकाशनने हा विशेषांक तयार केला आहे. समीक्षक डॉ. कैलास इंगळे, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. सुहास सदाव्रते यांनी या विशेषांकाचे संपादन केले आहे.
हभप सोनुने गुरुजी यांनी स्थापन केलेली ‘वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान’ अविरत कार्य करीत आहे. वारी, वारकरी यासह पंढरपूर येथील विठू माऊली, पैठण येथील नाथ महाराज, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली, देहू येथील जगतगुरू तुकोबाराय यांना प्रमाण मानत आषाढी- कार्तिकीला दिंडीच्या माध्यमातून लोकजागराचे कार्य करणारे हभप साळूबा महाराज सोनुने अर्थात ‘गुरुजी बाबा’ यांच्या चरणी नतमस्तक व्हावेच लागते. शिक्षकीपेक्षा सांभाळत जवळपास पाच दशके वारकरी संप्रदायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोनुने गुरुजींनी आयुष्य समर्पित केले आहे. वारकरी संप्रदायाची जीवनमूल्य रुजवण करीत 12 वर्षांपासून ‘चतुर्थी जागर उपक्रम’ प्रेरणादायी ठरलेला आहे. पंढरपूर, पैठण, आळंदी, देहू याठिकाणी पायी दिंडी प्रवास 15 वर्षांपासून अविरत सुरूच आहे.
गुरुजींच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त अविस्मरणीय अनुभव ठरावा म्हणून ‘वारी’ या विशेषांकाचे निमित्त शोधले आहे. एकूणच हभप सोनुनेचा जीवनपट, वारी-दिंडीचे आयोजन आणि वारकरी संप्रदाय जीवनमूल्य वर्तमानात अपरिहार्य ठरतात या हेतूने ‘वारी’चे प्रयोजन आहे. विशेषांकात ‘वारी महाराष्ट्राचा महासोहळा’ या विषयावर सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या अभ्यासपूर्ण लेखासह ‘वारी’च्या इतर लेख विषय व निवडीत प्रमुख मार्गदर्शक भूमिका प्रेरणा देणारी आहे. विशेषांकात गुरुवर्य प्रा. बसवराज कोरे यांनी हभप सोनुने गुरुजींची घेतलेली “माझी सर्व चिंता आहे विठोबासी ” या मुलाखतीतून गुरुजींचे बालविश्व ते आयुष्याच्या विविध वळणांवर आलेले सुख दुःखाचे प्रसंग आणि आठवणी शब्दबद्ध करीत प्रा. बसवराज कोरे यांनी प्रवास उलगडून दाखविला आहे.
वारी विशेषांकात ‘वारीचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू’, ‘वारी एक आनंदयात्रा’, वारीच्या वाटचालीतील समान दुवे, मराठवाड्यातील वारी परंपरा’, यासह आधुनिक मराठी साहित्यातील वारीदर्शन’, संतांच्या अभंगातील वारी’ अशा विविध विषयांवर मान्यवर लेखक, कीर्तनकार, अभ्यासकांचे लेख आहेत. वारी विशेषांकाच्या प्रवासात सुनील वायाळ, अनिरुद्ध महाराज जगताप, संदेश भंडारे, सचिन परब, डॉ. रवींद्र बेंबरे यांच्यासह मान्यवरांच्या लेखनाने ‘वारी’ विशेषांक समृद्ध होताना दिसतो. वारीच्या एकूणच प्रवासात गजानन पोफळे, भगवानराव गायकवाड, विठ्ठल चव्हाण, अंबादास महाराज भालके, अनिल देव्हडे, अनिल म्हस्के यांचा सहप्रवास जिव्हाळ्याचा आहे.
‘वारी ‘विशेषांक निर्मितीत ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद धोडपकर यांचे सहकार्य नसते तर वाट खडतर होती. कवी, पत्रकार, अभिनेते विनोद जैतमहाल यांनी ‘वारी’चे केलेले मुखपृष्ठ, मागील मुख्य पानावरील ‘गुरू पाठीराखा पावलोपावली, भेटवी माऊली पंढरीची’ या ओळीतून ‘वारी’ विशेषांकाचे अंतरंग अधोरेखित होते. संभाजीनगर येथील काव्या क्रिएशनने रेखाटलेली मुखपृष्ठावरील दिंडी आणि विठ्ठलाची प्रतिमा अद्वैत आनंद देणारी वाटते.
विशेषांक ‘वारीत’ माणूस घडवणारा संस्कार, ‘मानवतावादी विचार,’विठ्ठलभक्तीचे गारुड, संत संगतीचे काय सांगू सुख, ‘माझी वारी, माझा संसार, नीतीमान जीवनाचा आग्रह’ अशा विषयावर हभप अभय जगताप, डॉ. सर्जेराव जिगे, शालीकराम म्हस्के, कलावती साळुंके, डॉ. एकनाथ शिंदे यांनी लेखातून ‘वारी’चे वैभव सिद्ध केले आहे. वारी विशेषांकात खास म्हणून बाब अशी, की सौ. सुमन सोनुने यांनी सहजीवनात वारकरी जीवनमूल्याची जोपासना कशी झाले, असे अनुभव मांडले आहेत. हभप सोनुने गुरुजींची कन्या ज्योती आढाव, स्नुषा मनीषा तसेच नातू विवेक (हरी) यांनी व्यक्त केलेल्या भावना वारीची उंची वाढविणाऱ्या आहेत.
जवळपास पाच दशके वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेवून आयुष्य समर्पित करणारे हभप सोनुने गुरुजी होय. आजच्या युवापिढीला हा वसा आणि वारसा याची मनोमन जाणीव होवो, यासाठी विविध विषयांवरील लेख मागविण्यात आले होते. एकूणच ‘वारी’चे यश हे हजारो वारकऱ्यांच्या मनातील हरिनामाच्या अविरत जागरासाठी आहे.
(लेखिका सुयश प्रकाशनच्या सर्वेसर्वा आहेत.)





