Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: राज्य नाट्य स्पर्धा : तंत्रासाठी की बक्षिसासाठी?

रसिक स्पेशल: राज्य नाट्य स्पर्धा : तंत्रासाठी की बक्षिसासाठी?

रसिक स्पेशल: राज्य नाट्य स्पर्धा : तंत्रासाठी की बक्षिसासाठी?

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Article Written By Dr Satish Salunke | State Drama Competition: For Technique Or Prize?

डॉ. सतीश साळुंके12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पारंपरिक, साचेबद्ध विचार करणारे परीक्षक ही राज्य नाट्य स्पर्धेसमोरची जशी समस्या आहे तशी दर्जाहीन, साधारण संहिता हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. अलीकडे या स्पर्धेत ‘नाटका’साठी नाटक सादर न होता ते बक्षिसांसाठी जास्त होते. त्यामुळे नाट्यतंत्राऐवजी ‘बक्षीसतंत्र’ विकसित झाले आहे. दुर्दैवाने हौशी रंगभूमी या बक्षीसतंत्रालाच सर्वोत्तम नाटक म्हणून कवटाळून बसली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘राज्य नाट्य’च्या निमित्ताने या स्पर्धेच्या अंतरंगावर एक दृष्टिक्षेप…

मराठी रंगभूमीच्या वर्तमानकाळावर दृष्टिक्षेप टाकला तर व्यावसायिक रंगभूमीवर वर्षाला १० – १५ पेक्षा जास्त नाटकांची निर्मिती होताना दिसते, तर हौशी रंगभूमीवर दरवर्षी पाचशेपेक्षा जास्त नाटके उभी राहतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या राज्य हौशी नाट्य स्पर्धा. या वर्षी होत असलेल्या विविध प्रकारच्या राज्य नाट्य स्पर्धांवर नजर टाकली तर देशातील कोणत्याही रंगकर्मीला आश्चर्य वाटू शकते. यंदाच्या बासष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत तब्बल ५८० नाटके सादर होत आहेत, तर बालनाट्य स्पर्धेतही साधारण ३८९ नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय संगीत नाट्य स्पर्धेत २६, हिंदीतील ७७, तर संस्कृमधील ३० नाटकांचा समावेश आहे. या सर्व प्रकारच्या नाटकांची संख्या ११०० च्या वर जाते. खरे तर एवढ्या प्रचंड प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या मराठी नाटकाच्या कुंभमेळ्याची जागतिक रंगभूमीने दखल घ्यायला हवी.

एकीकडे संख्यात्मकदृष्ट्या विलक्षण वैभवशाली वाटणाऱ्या या स्पर्धा दरवर्षी विविध वादांमुळे गाजतात. हजारो रंगकर्मी प्रचंड परिश्रम घेऊन नाटक उभे करतात. ते उभारताना त्या – त्या नाटकाच्या प्रमुखाला मोठ्या मानसिक आणि आर्थिक तणावाला सामोरे जावे लागते. नाटकाच्या तालमीच्या जागेपासून सुरू होणारा संघर्ष थेट नाटकाच्या दिवशी लाइट, सेट उभारण्यापर्यंतच अविरत सुरू असतो. त्यात नाटकातील कलावंतांचे आपसातील शीतयुद्ध, मानापमान, प्रत्येकाचा वेगळेपण जपण्याचा प्रयत्न यातून दिग्दर्शक मार्ग काढत असतो. हा सगळा संघर्ष हेच मुळात स्वतंत्र नाटक असते. पण तरीही नाटक उभं राहतं, घडतं. ‘आता पुढच्या वर्षी नको ते नाटक’ म्हणणारे पुढच्या वर्षीही तितक्याच ऊर्जेने नवी संहिता शोधू लागतात. या सगळ्यामागे एक अद्भुत शक्ती अन् ऊर्जा कार्यरत असते, तिचे नाव आहे हौस! याच हौसेने मराठी रंगभूमीचे विश्व तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपले आणि जगवले.

राज्य नाट्य स्पर्धेतील नाट्यनिर्मितीत असा फार मोठा रंगसमूह आहे, जो नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या ध्यासाने पेटलेला आहे. या रंगसमूहाला नाटक केवळ रंजन म्हणून नव्हे, तर विचार म्हणून करायचे आहे, त्यांना नव्या रंगभाषेत बोलायचे आहे, प्रतीकात्मक मिथकांच्या माध्यमातून नवविचार मांडायचा आहे, त्यासाठी तशाच संहितेचा ते शोध घेत असतात. अशा रंगसमूहाचे रंगकर्मी हे केवळ ‘कलावंत’ नसतात, तर विचारवंतही असतात. त्यामुळे अशा नाटकांची रंगभाषा विलक्षण वैचारिक अन् मंथनशील असते. तर दुसरा रंगसमूह कौटुंबिक आशयाची नि सरळ सरळ कथा असलेली नाटके सादर करीत असतो. अर्थात, या दोन्हींचे श्रम, त्यामागची धडपड समान असते. नाटक उभारणीच्या या दोन – तीन महिन्यांच्या प्रक्रियेत एक सुप्त आणि अदृश्य प्रश्न स्पर्धकांच्या डोक्यात असतो आणि तो म्हणजे नाटकाच्या परीक्षकांच्या गुणवत्तेचा. सध्या या स्पर्धेच्या सर्व प्रकारांमध्ये सगळ्यात कळीचे प्रश्न कोणते असतील, तर एक म्हणजे प्रयोगशील आणि नवनाट्याच्या दृष्टीने नवी रंगभाषा समजू न शकणारे अशिक्षित परीक्षक आणि नव्या, प्रभावी व प्रयोगशील संहितांचा अभाव.

राज्य नाट्य स्पर्धेच्या सर्व प्रकारांतील बहुसंख्य परीक्षक जुनेच असतात. यातील बऱ्याच जणांची नावे ते परीक्षक म्हणून आल्यावरच माहीत होतात. वर्षभर ते कोणती नाट्य चळवळ करतात? मागील पाच – सात वर्षांत त्यांनी कोणते नाटक, एकांकिका केली आहे? त्यांची नव्या वैचारिक, प्रायोगिक रंगभूमीविषयीची समजूत किती आहे, असे अनेक प्रश्न उभे राहतात. काही मंडळी तर केवळ ‘राज्य नाट्य’पुरते परीक्षक असतात. त्यांनी कधी काळी नाटक केलेले असते, पण आता वेळ असल्याने ते परीक्षणासाठी उपलब्ध असतात. यातील बरीचशी मंडळी, अवघड विचार करायला लावणारी, तुलनेने आकलनाला कठीण अशी प्रयोगशील नाटके टाळून डोक्याला ताण न देणारी नाटके नंबरात काढून मोकळे होतात आणि मग काही नवे करण्याच्या ऊर्जेने, ध्येयाने पेटलेली रंगकर्मी मंडळी मनातल्या मनात असंतोषाने धगधगत राहतात. अशी विशेष अभ्यास नसलेली, उच्च रसग्रहणाचा फारसा संबंध नसलेले परीक्षक राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वात मोठा अडथळा समजले जातात. ते हौशी रंगभूमीला तर मागे रेटतातच; पण या रंगभूमीवरील अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांना वैफल्यग्रस्त करून या स्पर्धेपासून तोडूनही टाकतात.

अर्थात सगळेच परीक्षक या श्रेणीतील नसतात. काही परीक्षक अत्यंत अभ्यासू, चिकित्सक आणि खरोखरच तज्ज्ञ असतात. पण दुर्दैवाने त्यांची संख्या कमी असते आणि अंतिम निकाल तयार करताना त्यांचा आवाजही ऐकला जात नाही. मग प्रश्न उरतो की, सांस्कृतिक संचालनालय अशांची निवड का करते? या प्रकाराला आळा घालण्यासाठी मागील तीन वर्षांपासून परीक्षक असलेल्यांची नावे बाद करण्यात आली आहेत, असे संचालनालयाकडून अलीकडे सांगण्यात आले. त्यामुळे किमान तीच ती नावे पुन्हा दिसणार नाहीत हे खरे. परंतु, परीक्षकांचा बायोडाटा त्या स्पर्धास्थळाच्या दर्शनी भागावर लावण्याचा निर्णय संचालनालय घेत नाही तोपर्यंत स्पर्धकांच्या मनात स्पर्धेविषयी विश्वासार्हता वाढणार नाही.

दुसरीकडे, तज्ज्ञ-जाणकार आणि अभ्यासू परीक्षक मंडळींचीही बऱ्याचदा तक्रार असते की, चांगली नाटके सादर होत नाहीत. यातही तथ्य आहेच. पण, त्याचे मूळ कारण नाटकांच्या सुमार संहितेत दडले आहे. राज्य नाट्य स्पर्धेचा अभ्यास केला तर जवळपास पन्नास टक्के संहिता त्याच त्या असतात, तर वीस टक्के संहिता एकांकिकांना फोडणी देऊन दुसरा अंक वाढवलेल्या असतात. परिणामी नाटकाची गती, कथावस्तू, आशयातील सुसूत्रता आणि पात्र नियोजन यांच्यात विस्कळीतपणा येतो. तो प्रेक्षकांच्या दृष्टीने रटाळ ठरतो. काही संहिता नव्या असल्या तरी अतिउत्साहीपणामुळे त्यातील नवखेपणा लपून राहत नाही. एक मात्र खरेच की, दहा – पंधरा टक्के संहिता ताकदीने लिहिलेल्या असतात. खरे तर या स्पर्धेच्या नाट्यलेखनाचा आवाका पाहता राज्य नाट्य परीनिरीक्षण मंडळाने अशा लेखकांसाठी नाट्यलेखन कार्यशाळा आयोजित करून त्यांना लेखनाचे मार्गदर्शन करावे. राज्य नाट्य स्पर्धा आणि कामगार नाट्य स्पर्धा या दोन स्पर्धांचा विचार केला तर त्यातही बहुतेक मराठी नाट्य स्पर्धांत सादर झालेली नाटके जशीच्या तशी अनुवाद करून सादर होतात. त्यामुळे एक प्रकारे हिंदी आणि कामगार नाट्य स्पर्धांमध्येही हौशी मराठी स्पर्धेतील नाटकेच सादर होतात. परिणामी या दोन्ही नाट्य स्पर्धांचा दर्जा कमालीचा घसरलेला दिसतो.

पारंपरिक, साचेबद्ध विचार करणारे आणि प्रयोगशील नवनाट्याच्या दृष्टीने जाणकार नसणारे परीक्षक ही राज्य नाट्य स्पर्धेसमोरची जशी समस्या आहे तशी दर्जाहीन, साधारण संहिता हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. दुसरीकडे, ‘राज्य नाट्य’मधून अनेक मोठी मंडळी पुढे आली आणि त्यांनी नाट्य – सिनेसृष्टीत नाव कमावले, ही जुनी तबकडी वाजवणे आता बंद करून गेल्या पंधरा – वीस वर्षांत ही प्रक्रिया का मंदावली याचा विचार केला पाहिजे. अलीकडे राज्य नाट्य स्पर्धेत नाटक हे ‘नाटका’साठी न होता ते बक्षिसांसाठी जास्त होते. त्यामुळे नाट्यतंत्र विकसित होण्याऐवजी ‘बक्षीसतंत्र’ विकसित झाले आहे. दुर्दैवाने हौशी रंगभूमी या बक्षीसतंत्रालाच सर्वोत्तम नाटक म्हणून कवटाळून बसली आहे.

( संपर्क- salunkedrsatish@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments