
- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Specail Article Majhya Hisshyache Kisse Write By Rumi Jaffrey On Pran Saheb
रूमी जाफरी8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘उपकार’मधील ‘मलंग चाचा’च्या भूमिकेत प्राण. ही व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की ती अजरामर झाली.
प्राण साहेबांनी ऋषी कपूर यांना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला. ‘या चित्रपटात तुम्हाला आजोबांची भूमिका करायची आहे,’ असं सांगताच ते म्हणाले, ‘मी तुझ्या चित्रपटात काम करणार नाही.’ आमचे चेहरे पडले. आम्ही विचारलं, ‘का?’ तर म्हणाले, ‘नाही, मी तुम्हाला कारण नाही सांगू शकत…’
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज तुम्हाला प्रसिद्ध, दिग्गज अभिनेते “प्राण’ साहेबांबद्दल काही सांगणार आहे. प्राण साहेबांचा चित्रपट प्रवास १९४० मध्ये लाहोरमधून पंजाबी चित्रपट “यमला जट’ आणि १९४२ मध्ये “खानदान’ या हिंदी चित्रपटांपासून सुरू झाला. नूरजहाँ या ‘यमला जट’मध्ये बालकलाकार होत्या आणि त्याच ‘खानदान’मध्ये प्राण साहेबांच्या नायिका होत्या. म्हणजे नूरजहाँ प्राण साहेबांच्या पंजाबी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांमध्ये होत्या.
असो. प्राण साहेबांनी अनेक चित्रपट केले. पण दरम्यान १९४७ मध्ये फाळणी झाली तेव्हा ते मुंबईत आले आणि त्यांना पुढचे काही महिने अडचणीत काढावे लागले. मग सआदत हसन मंटो यांनी, प्रसिद्ध लेखिका इस्मत चुगताई यांचे पती शाहिद लतीफ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. ते “जिद्दी’ हा चित्रपट बनवत होते आणि त्यांनी प्राण साहेबांना त्यामध्ये काम दिले. यामध्ये देव आनंद आणि कामिनी कौशल हे मुख्य कलाकार होते. प्राण साहेब काही नवीन कलाकार नव्हते, ते लाहोरमध्ये खूप काम आणि नाव कमावून आले होते. फाळणीने त्यांच्या कारकीर्दीला नक्कीच ब्रेक लावला होता, पण त्यामुळे ते थांबले नाहीत. त्यांनी भारतात “जिद्दी’तून पुनरागमन केले. जिद्दी सुपरहिट झाला आणि त्यांच्या कारकिर्दीची गाडी धावू लागली. त्यानंतर प्राण साहेबांना आयुष्यभर चित्रपटांची कमतरता भासली नाही. खलनायक म्हणून त्यांनी इतके चांगले काम केले की, लोकांच्या मनात त्यांनी स्वतःबद्दल इतका तिरस्कार निर्माण केला की, लोक आपल्या मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्याचे टाळू लागले.
दुसरीकडे, मनोज कुमार यांनी मात्र मोठी जोखीम पत्करून प्राण साहेबांच्या या प्रतिमेवर नव्हे, तर त्यांच्या अभिनयावर आणि प्रतिभेवर विश्वास ठेवत त्यांना आपल्या “उपकार’ चित्रपटात सकारात्मक भूमिका दिली. ही व्यक्तिरेखा प्राण साहेबांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की ती अजरामर झाली. त्यानंतर त्यांनी अभिनयात खूप प्रयोग केले. वेगळा लूक, वेगळा गेटअप, व्हॉइस मॉड्युलेशन असे विविध प्रयोग केले. नकारात्मक, सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही केल्या. ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘साधू और शैतान’ यांसारख्या अनेक चित्रपटांत कॉमेडीही केली. पण, माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी एक अशी घटना सांगणार आहे, जिचा मी स्वत: साक्षीदार आहे. प्राण साहेब किती भावुक होते आणि नात्यांच्या बाबतीत ते किती संवेदनशील होते, हे त्यातून सिद्ध होते.
हा किस्सा माझ्याच चित्रपटाशी संबंधित आहे. १९९७ मध्ये ऋषी कपूर यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली होती आणि ते दिग्दर्शनात पाऊल टाकण्याच्या तयारीत होते. चित्रपटाला कथा माझी होती. कलाकार निवडण्याची वेळ आली तेव्हा नायकाच्या म्हणजेच अक्षय खन्नाच्या आजोबांच्या भूमिकेवर खूप विचार करण्यात आला. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. अनेक नावांचा विचार केल्यावर चिंटूजी अर्थात ऋषी कपूर म्हणाले की, आपण प्राण साहेबांना घेऊयात. “आरके’ला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. प्राण साहेब “आरके’चे सर्वात जुने अभिनेते आहेत, त्यांच्याशी आपले कौटुंबिक नातेही आहे.
या कल्पनेने सर्वांनाच उत्साह आला आणि आम्ही सगळे प्राण साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलो. प्राण साहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी ऋषी कपूर, रणधीर कपूर यांना खूप प्रेमाने, आदराने वागवले आणि “आरके”ला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याचा त्यांना खूप आनंद झाला. ऋषी कपूर यांचे अभिनंदन करुन त्यांना नव्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. ज्या कामात (दिग्दर्शनात) ते पाऊल टाकणार आहेत, त्यात यशस्वी व्हावं, असा आशीर्वादही दिला. यात तुम्हाला आजोबांची भूमिका करायची आहे, असं सांगताच ते म्हणाले, “मी तुझ्या चित्रपटात काम करणार नाही.’ आमचे चेहरे पडले. आम्ही विचारलं, “का?’ तर म्हणाले, “नाही, मी तुम्हाला कारण नाही सांगू शकत…’ मग आम्ही म्हणालो, “तुम्ही कथा तर ऐका. कथा आवडली नाही, भूमिका आवडली नाही तर करू नका.’ ते म्हणाले, “नाही, मी चित्रपटच करणार नाही.’ मग चिंटूजींनी आग्रह केला आणि म्हणाले, ‘तुम्ही कारण तर सांगा.’ त्यावर ते म्हणाले, “हे बघ चिंटू! माझं वय झालं आहे, माझी तब्येतही ठीक नाही. तुझं चित्रीकरण अर्ध्यात आल्यावर मला काही झालं तर मी वर जाऊन राज कपूरला काय तोंड दाखवू की मुलांचं नुकसान करून आलो म्हणून? त्यामुळं मी तुझा चित्रपट करणार नाही. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.’
प्राण साहेब हे अशा महान विचारांचे माणूस होते. त्यांची ही गोष्ट आजतागायत माझ्या मनात घर करून आहे. कलाकार म्हणून मी त्यांचा खूप आदर करायचो, पण त्या दिवसापासून माणूस म्हणूनही मी त्यांचा मोठा चाहता झालो. प्राण साहेबांनी त्या दिवशी जिगर मुरादाबादींचा एक शेर ऐकवला होता, तो मी तुमच्यासाठी इथं लिहितो आहे…
गुदाज़-ए-इश्क़ नहीं कम जो मैं जवान ना रहा, वो ही है आग मगर आग में धुआँ ना रहा।
सुदैवाने मला त्यांच्यासोबत ‘साजन की बाहों में’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचे संवाद मी लिहिले होते. शूटिंग सुरू असलेल्या मढ आयलंडच्या बंगल्यात मी पोहोचलो तेव्हा पाहिलं की, सहायक प्राण साहेबांना सीन वाचून दाखवतोय आणि ते स्वत: उर्दूमध्ये लिहून घेताहेत. मी म्हणालो, “प्राण साहेब, तुम्ही म्हणाला असतात तर मी तुम्हाला उर्दूमध्येच लिहून दिले असते.’ ते म्हणाले, “आजकालच्या मुलांना येत नाही आणि या निमित्ताने माझाही सरावही होत राहतो.’ असो. शूटिंगदरम्यान त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या, ज्या मी पुढे कधी तरी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये लिहीन. तूर्तास तुम्ही प्राण साहेबांच्या “उपकार’मधील हे गाणे ऐका.. क़समे वादे प्यार वफ़ा, सब बातें हैं, बातों का क्या? स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.
– रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे
लेखक, दिग्दर्शक






