फास सैल होतोय?: स्वातंत्र्याच्या दिशेने शेतकऱ्यांची अभूतपूर्व धडपड, वाचा किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांचा लेख

0
1
फास सैल होतोय?:  स्वातंत्र्याच्या दिशेने शेतकऱ्यांची अभूतपूर्व धडपड, वाचा किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांचा लेख


  • Marathi News
  • Opinion
  • Amar Habib Farmer Struggle Write Up; Kisanputra Movement Against Land Laws And Systemic Neglect

अमर हबीब । किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलीकडच्या 20-25 वर्षात, शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) कायद्यांनी जखडलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी स्वातंत्र्यासाठी अपूर्व अशी धडपड केली आहे. त्यांनी सुरुवातीला आपल्या पाल्यांना शेतीतून बाहेर काढण्याचे काम केले. अलीकडे भाडे तत्वावर शेती देऊन एका नव्या व्यवस्थेची सुरुवात केली आहे. या धडपडीला नेता नाही, हे विशेष.

नेते भाव मागण्यात, कर्जमाफी मागण्यात गर्क आहेत. त्यांच्याकडे लक्ष न देता शेतकरी आलेल्या रस्त्याने पुढे जात आहेत. नेत्याशिवाय शेतकऱ्यांची ही लढाई आजही तुमच्या अवतीभोवती सुरू आहे. शेतकरीविरोधी कायद्यांच्या दूष्प्रभावाला निष्प्रभ करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.

विखंडीत शेतीचा देश

जगात सर्वात जास्त शेत जमिनीचे विखंडन भारतात झाले आहे. आजचे सरासरी होल्डिंग 2 एकर सुद्धा राहिलेले नाही. याचा अर्थ हे शेतकरी अन-इकॉनॉमिक होल्डिंगवर शेती करीत आहेत. इतकी विखंडीत शेती करणारा जगात दुसरा देश नाही. दीड-दोन एकर शेतीवर कितीही भाव दिला तरी शेतकरी कुटुंबाची उपजीविका भागू शकत नाही, हे भाव मागणाऱ्या नेत्यांना अजूनही कळले नाही, याचे मला आश्चर्य वाटते.

परिणाम काय झालाय?

विखंडीत शेती व शेतकरीविरोधी कायद्यांचा पहिला मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यात झाला. आज पर्यंत सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जगातील कोणत्याच देशात इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. चार वेळा कर्जमाफी झाली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतात. कारण त्यांना लुटणारे कायदे कायम असतात. असे असताना पुन्हा कर्जमाफीसाठी लोक आंदोलन करतात याची मला गंमत वाटते. शेती कदापी परवडणार नाही हे लक्षात आल्यावर शेतकरी पालकांनी आपल्या पाल्यांना शेतीच्या बाहेर काढले. 90 च्या नंतर स्थलांतराला वेग आला. घरा घरातील मुले, मुली बाहेर पडले.

शेतीवरील घटते अवलंबन

शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असणाऱ्या कुटुंबांची संख्या किती असेल? किती कुटुंबांमध्ये शेतीबाह्य उत्पन्नातील पैसे येऊ लागले आहेत? किती शेतकरी कुटुंबातील एक तरी व्यक्ती शेतीबाह्य काम करून पैसे कमवत आहेत? ही आकडेवारी ना सरकार देते, ना कोणते विद्यापीठ याचा अभ्यास करते. माझ्या नजरी अंदाजानुसार केवळ शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असलेली कुटुंबे आता केवळ 10 ते 15 टक्के राहिली आहेत. बहुतेक शेतकरी कुटुंबात शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. ज्यांच्याकडे शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले आहे, अशा कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी शेती हा जोडधंदा झाला आहे. शहरांच्या जवळच्या जमिनी व्यापारी, व्यावसायिक, भ्रष्ट अधिकारी, राजकीय पुढारी यांनी काबीज केल्या आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे त्यांची शेती हिरवी दिसून येते.

भाडे तत्वावर शेती

बटाई किंवा खंडाने शेती देण्याची पद्धत जुनीच आहे. पण अलीकडे भाड्याने शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 20 ते 40-50 एकर क्षेत्र कसणारे व्यक्ती ठिकठिकाणी दिसून येतात. अलीकडे 100 ते 200 एकर जमीन भाड्याने घेऊन कसणारे लोक दिसू लागले आहेत. ज्या अर्थी लोक भाड्याने घेऊन कसताना दिसतात त्या अर्थी त्यांना शेती परवडते आहे. त्यांना शेती परवडण्याचे मुख्य कारण ‘इकॉनॉमिक होल्डिंग’ हे आहे. शेती भाड्याने घेऊन करण्यात सीलिंगचा अडथळा नाही. सीलिंगचा अडथळा किती घातक ठरला आहे, हे यावरून दिसून येते.

शेतकरीविरोधी कायदे यांच्या दुष्परिणामांनी टोक गाठले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची आकांक्षा असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याची ही अभूतपूर्व धडपड आहे. ती तुमच्या गावात दिसून येईल. नीट पाहा व त्याची नोंद करा!

(संपर्कः 841190990)



Source link