‘तुमच्या काँग्रेस पक्षाने…,’ शीख तरुणाने 1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरुन सुनावलं; राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

0
1
‘तुमच्या काँग्रेस पक्षाने…,’ शीख तरुणाने 1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरुन सुनावलं; राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा


Rahul Gandhi on 1984 Riots: 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींमधील काँग्रेसच्या भूमिकेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. मी तिथे नसताना, यातील अनेक चुका घडल्या अशी कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे. यादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात केलेल्या सर्व चुकांची आपण आनंदाने जबाबदारी घेण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील वॉट्सन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेयर्समध्ये (Watson Institute for International and Public Affairs at Brown University) संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमात एका शीख तरुणाने राहुल गांधींना प्रश्न विचारला. शीख तरुणाने राहुल गांधींच्या आधीच्या विधानाचा उल्लेख केला ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, “भारताचा लढा हा शिखांना पगडी घालण्याची परवानगी द्यायची की नाही, शिखांना कडा घालण्याची परवानगी द्यायची का किंवा गुरुद्वारात जाण्याची परवानगी द्यायची का याबद्दल आहे.”

“तुम्ही शिखांमध्ये भाजपा भविष्यात कसा असेल याबद्दल भीती निर्माण करता, तुम्ही राजकारण कसं निर्भय असावं याबद्दल बोललात. पण आम्हाला फक्त कडे घालायचे नाहीत, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे, जे पूर्वी काँग्रेस पक्षाच्या काळात नव्हतं,” असं शीख तरुणाने राहुल गांधींना सांगितलं.

आनंदपूर साहिब ठराव दलितांच्या हक्कांबद्दल बोलतो आणि त्यात अलगाववादाचा काहीही उल्लेख नाही, परंतु तत्कालीन काँग्रेसने त्याला अलगाववादी कागदपत्र म्हटलं आहे असंही तरुणाने अधोरेखित केलं. “हे तुमच्या पक्षाने केलं आहे. तुमच्या पक्षात आपण केलेल्या चुका स्वीकारण्याची परिपक्वता दिसत नाही,” असंही तो म्हणाला. 1984 च्या दंगलीशी संबंधित हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचा उल्लेख करताना त्याने काँग्रेसमध्ये आणखी बरेच सज्जन कुमार बसले आहेत असं सुनावलं. 

“तुम्ही आम्हाला ‘भाजप इंडिया’ कशी दिसेल याबद्दल मनात भिती बाळगण्यास सांगता. पण तुम्ही शिखांशी समेट करण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही नेमके कोणते प्रयत्न करत आहात. कारण तुम्ही असंच सुरु ठेवलं तर भाजप पंजाबमध्येही प्रवेश करेल,” असा प्रश्न तरुणाने विचारला.

तरुणाच्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधींनी शिखांना कोणतीही गोष्ट घाबरवते असं वाटत नसल्याचं म्हटलं. “मी जे विधान केले ते असं होतं की, आपल्याला असा भारत हवा आहे का जिथे लोक त्यांचा धर्म व्यक्त करतानाही अस्वस्थ असतील? काँग्रेस पक्षाच्या चुकांबद्दल बोलायचं झाले तर, मी तिथे नसताना बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात केलेल्या सर्व चुकांची जबाबदारी मी आनंदाने स्विकारण्यास तयार आहे,” असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. 

“80 च्या दशकात जे घडलं ते चुकीचं होतं हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. मी अनेक वेळा गोल्डन टेम्पलमध्ये गेलो आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत,” असं राहुल गांधींनी सांगितलं. 

1980  च्या दशकात, इंदिरा गांधी सरकारने पंजाबमध्ये कट्टरपंथी धर्मोपदेशक जर्नेलसिंग भिंद्रनवाले वरील कारवाईसाठी शीख धर्माच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या सुवर्ण मंदिराच्या आत सैन्य घुसवलं होतं. अकाल तख्त उद्ध्वस्त करणाऱ्या लष्करी कारवाईमुळे समुदायात प्रचंड संताप निर्माण झाला होता. काही महिन्यांनी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर शिखांविरुद्ध हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराला अनेक काँग्रेस नेत्यांनी खतपाणी घातल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि इतर ठिकाणी जवळपास 3 हजारांहून अधिक शीख मारले गेले अशी माहिती आहे. 





Source link