डायरीची पाने: चुडा : एक सौभाग्यलेणं

0
1
डायरीची पाने:  चुडा : एक सौभाग्यलेणं


मुंबई6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अगदी प्राचीन काळापासून भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याच्या लेण्यांमध्ये ‘बांगड्या’ हे एक अपरिहार्य लेणं मानत आली आहे. त्यामुळंच बांगड्यांना विविध प्रकारची नावं आहेत. कासार बांधव व्यवसायानिमित्ताने एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असल्यामुळं या गावातल्या नातेवाईकांचा निरोप त्या गावातल्या नातेवाईकांना देण्याचं कामही ते करायचे. जुन्या काळात कासार बांधवांना ‘वैराळ’ असं म्हटलं जात असे. त्यामुळं लोकगीतांमध्ये एक प्रसिद्ध गीत होतं…

वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान मातेच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण कंस मामाच्या नगरीत जाऊन केलाय मुक्काम… कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्णानं वैराळाचं रूप घेऊन कंसाच्या राजवाड्यात प्रवेश मिळवला, असं या लोकगीतात म्हटलं होतं. या वैराळ म्हणजे कासारांवर अशी अनेक लोकगीतं पाहायला मिळतात. माझी बहीण जात्यावर एक ओवी म्हणायची. त्या ओवीत वैराळाचा निरोप्या हा गुण सांगितला आहे. ती ओवी अशी… हेतं वैराळ दादा तुला कोठवरी जाणं खुशालीचा वर्तमान सांग वाड्यात जाऊन… आपण खुशाल आहोत, असा आपल्या आई-वडिलांच्या वाड्यात जाऊन त्यांना निरोप दे, असं ही सासुरवाशीण कासाराला सांगते, तेव्हा तो जणू तिचा भाऊच असतो. हातात बांगडी भरणं हे आदीकाळापासूनच चालत आलं असावं. कारण खूप जुन्या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये बायकांनी हातात कंकण घातल्याचा पुरावा सापडतो. हडप्पा आणि मोहेंजोदडो इथं सापडलेल्या स्त्रियांच्या जुन्या मूर्ती आणि त्यांच्या अवशेषांच्या पुराव्यातून हेच सिद्ध होतं की, त्या काळापासून स्त्री हातात कंकण घालत होती. त्या काळात अर्थातच काचेचा शोध लागलेला नव्हता. पण, तेव्हा हस्तिदंताच्या बांगड्या बायका घालत असत, असा पुरावा सापडतो. अजूनही बंजारा आदिवासी स्त्रिया हस्तिदंत नसलं, तरी त्यासारख्याच धातूच्या बांगड्या हातात घालताना दिसतात. सरकारी दस्तावेज सीलबंद करण्यासाठी जी लाख वापरली जाते, तिच्यापासूनही बांगड्या बनवल्या जात. माझ्या लहानपणी चांदगडच्या म्हणजे चंद्रपूरच्या देवीच्या यात्रेला गेलेल्या बाया लाखेच्या बांगड्या घेऊन येत. त्या बांगड्या देवीचा प्रसाद म्हणून आणल्या जात आणि आपल्या मैत्रिणींनाही दिल्या जायच्या. त्या लाखेच्या बांगड्यांचं सगळ्या स्त्रियांमध्ये मोठं कौतुक होतं. या बांगड्या अर्थातच फार टिकावू नसत, पण त्यावर सुंदर रंगरंगोटी आणि वेलबुट्टी केलेली असे.

अगदी प्राचीन काळापासून भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याच्या लेण्यांमध्ये ‘बांगड्या’ हे एक अपरिहार्य लेणं मानत आली आहे. त्यामुळंच बांगड्यांना विविध प्रकारची नावं आहेत. विवाहाआधी जे घातलं जातं ते ‘काकण’ म्हणजे ‘कंकण’. हा शब्द स्त्रीलिंगी नाही. कारण विवाहपूर्व काळात स्त्रिया ‘कंकण’ हा शब्द वापरत. विवाहनंतर घातला जातो तो ‘चुडा’. म्हणूनच त्याला ‘सौभाग्याचा चुडा’ म्हटलं जायचं. त्याचा आकार गोल असतो, म्हणून मग ती ‘बांगडी’ आणि नंतर ती काचेची झाली म्हणून ‘बिलवर’ अशी विविध नावं तिला पडलेली दिसतात.

मधल्या काळात धातूच्याही बांगड्या वापरात आल्या. सोन्या – चांदीबरोबरच लोखंड, पितळ, तांबे या धातूच्याही बांगड्या करण्याचा रिवाज होता. त्या आधी, म्हणजे या धातूंचा शोध लागण्याच्याही आधी, आदिम अवस्थेत स्त्रिया रानवेलीच्या बांगड्या करून हातात घालत होत्या, असं काही जुन्या प्रेमकथांमधून पाहायला मिळतं. फुलं आणि वेली ही स्त्रीच्या साजशृंगाराची पहिली साधनं मानली जातात. त्यामुळं आजही बांगड्यांवर वेलीफुलांच्या आकृती काढल्या जातात. सोन्याच्या बांगड्या आजही वापरल्या जातात. आर्थिक कुवतीनुसार लोक हौसेनं सोन्याच्या बांगड्या तयार करून घेतात. अर्थात, नावं वेगवेगळी असली, तरी सर्वच स्त्रिया बांगड्या मात्र आवर्जून घालतात. हिंदी सिनेमांमध्ये तर ‘बांगडी’ या विषयावरची पुष्कळ गाणी पाहायला मिळतात. ‘चुडिया’ आणि ‘कंगन’ असलेली अक्षरशः शेकडो हिंदी गाणी सापडतील. मराठीतही अशी गाणी पुष्कळ आहेत. कविताही आहेत. विठ्ठल वाघांच्या ‘बिल्वर’ कवितेला एकेकाळी खूप लोकप्रियता मिळाली होती. जात्यावरच्या अनेक ओव्याही बांगडी या विषयावर आहेत. या बांगड्या प्रामुख्यानं माहेरची माणसं भरतात. त्यात आई-वडील असतात. वेगवेगळे उद्देश वा निमित्त असले, तरी प्रामुख्यानं सौभाग्याचं लेणं म्हणूनच त्या भरल्या जातात. लग्नसमारंभात सृजनाचा रंग म्हणून सगळ्या वऱ्हाडणींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या जातात. गरोदर स्त्रीलाही हिरवा चुडाच भरला जातो. हा चुडा भरण्याचेही काही संकेत आहेत. टिचलेला चुडा हातात ठेवू नये, कारण त्यामुळं भावाला गरिबी येते, अशीही एक धारणा आहे. त्यामुळं चुडा टिचला की, तो लगेच फोडून टाकला जातो. असे बहिणीचे रिकामे हात दिसले, तर भाऊ लगोलग तिला बांगड्या भरण्याची व्यवस्था करतो. कारण ती त्याची जबाबदारीच आहे, असं समजलं जातं. असेच काही संकेत आणि भावभावना व्यक्त करणाऱ्या जात्यावरच्या या काही ओव्या…

वैराळ दादाची याची पेटारी रीती झाली, मायबाई म्हणे माझ्या लेकीनं हौस केली।। वैराळ दादा सांग तुझ्या बांगडीचं मोल, लाडाची माझी लेक मैना आली काल।। मोकळा माझा हात बंधुनं बघितला, सई वैराळाचा नंदी दारामधी उभा केला।। बाई हिरवी बांगडी कशामुळं गं टिचली? वहिनी म्हणिते गोऱ्या हाताला दिष्ट झाली।। बांगड्या भरीते एका रुपयाच्या नऊ नऊ, मधी बापाजिचं नाव मागं पुढी उभे भाऊ।। हे तू वैराळ दादा कशाला देतू पाल? चुडा भरणारी लेक सासरी गेली काल।। बांगडी फुटली तर करू नका हळहळ, जव्हरं मायबाप तव्हर कशाचा काळ।। बारा जणी जावा तेरावी माझी सासू, चुडा भरताना येतं कासाराला हसू।। फुटली बांगडी तर करू नको हळहळ, भाऊ माझा गं भाग्याचा देतो राजवर्खी ढाळ।। वैराळ हाक मारी भाग्याची भागीरथी, हाती धरल्यात नाती मागून लेकी सुना येती।।

इंद्रजित भालेराव inbhalerao@gmail.com



Source link