गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी हे गुन्हे उघडकीस आणणे आवश्यक ठरते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रम आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. मी लातूरला १९९४ ते ९७ या काळात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा दरोडा पडला. त्यामध्ये दोन लोकांचा बळी गेला होता. क्राइम ब्रँचची टीम घेऊन आम्ही सगळे तिथे तातडीने दाखल झालो. संपूर्ण परिसराची घेराबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. त्या दरम्यान आमच्या एका अधिकाऱ्याला एक डायरी सापडली. त्यामध्ये पाच लोकांची नावे मिळाली. माहिती घेतली असता हे सगळे अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या गावात पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. हे सगळे लोक त्यांच्या घरीच सापडले. त्यांची चौकशी केली असता, या लोकांनी गुन्हा केला नसावा, असे तपास पथकाला वाटले. मग प्रश्न पडला की ही डायरी कोणाची? आणि तिच्यात या लोकांची नावे कशी काय आली? त्यामुळे त्या लोकांकडे आणखी विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा दरोडा एका वेगळ्या टोळीच्या लोकांनी टाकला आहे आणि ती आमची दुश्मन टोळी आहे. म्हणून त्यांनी आमची नावे मुद्दाम त्या डायरीत लिहिली आणि ती सार्वजनिक ठिकाणी फेकून दिली, जेणेकरुन पोलिसांनी आम्हाला अटक करावी. मग याच लोकांच्या मदतीने पोलिस पथकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा तपास सुरू केला आणि ती आख्खी टोळी जवळच्या जंगलात हाती लागली. दरोड्यामध्ये लुटलेला सगळा मुद्देमाल त्या टोळीकडून हस्तगत करण्यात आला. गंभीर गुन्ह्यांचा तपास हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यामध्ये पहिल्यांदा घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे ठरते, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. त्यानंतर फिर्यादीची विचारपूस तसेच घटनेच्या साक्षीदारांचा जबाबही तितकाच आवश्यक असतो. गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी कशी आहे? म्हणजे ते कशा पद्धतीने गुन्हे करतात, हे लक्षात येणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. शिवाय, अन्य भागाशी; विशेषत: आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क असणे आवश्यक असते. अशा गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक टीमही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे नेटवर्कही चांगले असायला हवे. गंभीर आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांच्या तपासात दिवसरात्र एक करावा लागतो. अशावेळी तपास पथक हे एक टीम म्हणून काम करते. त्यामुळे त्यांच्यातही चांगला समन्वय गरजेचा असतो. या पथकाला वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणेही महत्त्वाचे असते. नागपूर जिल्ह्याचा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक असताना, क्राइम कॉन्फरन्समध्ये मला पहिल्यांदा एक असा गंभीर गुन्हा दिसला, ज्यामध्ये वर्षभरापूर्वी एका सहायक फौजदाराची हत्या करण्यात आली होती. खूप प्रयत्न करूनही हा गुन्हा उघडकीस आला नव्हता. त्यामुळे या तपासासाठी आम्ही क्राइम ब्रँचची एक चांगली टीम तयार केली. ही हत्या सुनियोजित असल्याचे टीममधील सर्वांचे मत होते. पण, खूप तपास करुनही काही निष्पन्न झाले नाही. एकेदिवशी संध्याकाळी मी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अब्दुल रजाक यांच्यासोबत याच विषयावर बोलत मैदानात वॉकिंग करत होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की, सर, मला तरी हा गुन्हा सुनियोजित वाटत नाही, तो अचानक घडला असावा. मग मी त्यांना त्या दिशेने तपास करण्यास सांगितले. ते जलालखेडा पोलिस ठाण्यात गेले आणि तिथेच सात दिवस तळ ठोकला. त्या परिसरात घडलेल्या सगळ्या जबरी चोऱ्यांची माहिती घेतली. त्यांना लक्षात आले की, हा गुन्हा घडला त्या काळात त्याच भागामध्ये रस्त्यावरील लुटीच्या अनेक घटना घडल्या होत्या आणि त्यातील बहुतांश उघडकीला आल्या नव्हत्या. त्यांनी त्या घटनांचा नव्याने तपास सुरू केला तेव्हा, या सगळ्या जबरी चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, हे लक्षात आले. आणखी तपास केल्यावर ही टोळी मध्य प्रदेशची असल्याचे समोर आले. त्यातूनच लूटमारीचे हे सर्व गुन्हे उघडकीला आले आणि त्या सहायक फौजदाराची हत्याही याच टोळीने केली होती, हे निष्पन्न झाले. त्याचे असे झाले होते की, ही टोळी एकदा रस्त्यावर ट्रॅप लावून बसली होती. हा अधिकारी त्याच रस्त्यावरुन दुचाकीने जात होता. त्याला या टोळीने घेरले आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांनी गळा दाबून त्याचा खून केला. या गुन्ह्याच्या तपासाचा अहवाल ‘सीआयडी’ला पाठवण्यात आला आणि या कामगिरीला ‘बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड’ही मिळाले. गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते, हे पोलिस दलातील ३४ वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे उघडकीला आणणे खूप आवश्यक असते. अनेकदा गंभीर आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आले नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रमांची तयारी आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. पोलिस दलात असे अनेक अधिकारी, कर्मचारी असतात, ज्यांना गुन्हे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत चैन पडत नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून गुन्हे उघडकीस आणणारे अनेक अधिकारी, अंमलदार मी पाहिले आहेत. मुंबई क्राइम ब्रँच अशा प्रकारचे आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणण्यात तरबेज आहे. गुन्ह्यांचा योग्य तपास करुन गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात एकणूच महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी संपूर्ण देशात अव्वल मानली जाते. आपल्या पोलिस दलाला ही देदीप्यमान परंपरा लाभली आहे. ती पुढेही आणखी लखलखत राहावी, ही अपेक्षा. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)
Source link





