
- Marathi News
- Opinion
- Acharya Prashant And The Emotional Journey From Seeker To Seeker Divya Marathi Rasik Article By Hemkiran Patki
हेमकिरण पत्की5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आचार्य प्रशांत हे एक समकालीन आध्यात्मिक वेदांती, दार्शनिक, लेखक, अद्वैत शिक्षक, पशुप्रेमी, शुद्ध शाकाहाराचे प्रचारक आणि पर्यावरण संरक्षक म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांनी जीवनाविषयीच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीसह ‘प्रशांत अद्वैत फाऊंडेशन’ची स्थापना केली. भगवद्गीता आणि उपनिषदांच्या अभ्याससत्रांचं आयोजन या संस्थेमार्फत केलं जातं. मानवाच्या चेतनेचं सखोल परिवर्तन व्हावं, हा हे फाऊंडेशन स्थापण्यामागचा आचार्य प्रशांत यांचा उद्देश आहे.
आचार्य प्रशांत यांची प्रतिभा वेदांताच्या अभ्यास-आकलनानं तेजाळली आहे. त्यांच्या वाणीत जगातील विविध आध्यात्मिक धारांचा संगम असून, ती विशिष्ट परंपरेमुळं सीमित झालेली नाही. प्रशांतजींची जीवनसरणी कबीरांना आत्मीयतेनं अनुसरणारी आहे. ‘पानी में मीन प्यासी’, ‘हमन है इश्क मस्ताना’, ‘राम निरंजन न्यारा रे’, ‘प्रेम प्याला जो पिए’, ‘कबीर साहेब’, ‘भागे भला न होएगा’, ‘संत कबीर विचारदर्शन’ ही कबीरांवरील त्यांची ग्रंथसंपदा याची उत्तम साक्ष आहे.
प्रशांतजींनी कबीरांच्या दोह्यांवर, पदांवर उत्स्फूर्तपणे केलेलं भाष्य श्रोत्यांना, वाचकांना अंतर्मुख करायला लावणारं आहे. व्याकूळ होऊन ईश्वराचा शोध घेणाऱ्या साधकासाठी कबीरांच्या पदांतून व्यक्त झालेलं भावसत्य आपण समजून घेण्यासारखं आहे.
मोंको कहाँ ढूँढे बंदे,
मैं तो तेरे पास में,
ना मैं देवल ना मैं मसजिद,
ना काबे कैलास में।
ना तो कौने क्रिया-कर्म में,
नहीं योगबैराग में,
खोजी होय तो तुरतै मिलिहौं
पलभर की तालास में।
कहै कबीर सुनो भाई साधो,
सब स्वासों की स्वास में…
भक्तहृदयाला आर्त करणाऱ्या कबीरांच्या या पदात स्वत: भगवानच भक्ताला ‘नेति नेति’च्या अध्यात्मरीतीनं आपला वास श्वासाच्या अनुभूतीत असल्याचं, म्हणजे भक्तातच असल्याचं सांगतात. कबीर म्हणतात, ईश्वराचा शोध घेणारा त्याला अंत:करणाबाहेर म्हणजे देवळात, मूर्तीत, ग्रंथांत, विविध उपासनापद्धतीत, तीर्थक्षेत्रात, योगरीतींमध्ये शोधत राहतो. साधकांची ही बहि:र्मुख वृत्ती जाणून प्रशांतजी त्यांना प्रश्नांकित करतात, ते असं – हा ईश्वराचा शोध घेणारा कोण असतो? त्याच्या शोधामागची तळमळ कशासाठी असते? ईश्वराच्या शोधासाठी असते की स्वतःसाठी असते? हा जो शोधक असतो त्याचं मन अपुऱ्या इच्छांनी भरलेलं असतं का? तो या अपुऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी तर ईश्वराचा शोध घेत नसतो? मग त्या इच्छा भौतिक सुखासाठीच्या असोत किंवा जन्ममृत्यूच्या येरझारीतून मोकळं करणाऱ्या मुक्तीच्या असोत…
प्रशांतजी आपलं ध्यान कबीरांच्या पदातील शोधकावर केंद्रित करतात आणि कबीर या पदातून दर्शवतात तसा एक दुसराही शोधक असतो. त्याच्यापर्यंत साधकाच्या जाणिवेचा प्रवास घडवतात. या शोधकाला शोधायची वस्तू स्वतःहून प्रिय असते. त्याला आत्मभावाचं अप्रूप असतं. यासाठी तो आपले प्राणही समर्पित करायला तयार असतो. एखाद्या भोगसुखाच्या प्राप्तीनंतर किंवा जिवलगांच्या कायमच्या ताटातुटीनंतर काही शोधक ईश्वराच्या प्राप्तीचा शोध थांबवतात. मग हा शोध महत्त्वाचा की शोधक? ईश्वराच्या शोधात शोधक स्वतःचं अस्तित्व विसरून जाईल तेव्हाच त्याच्या ध्यानात येईल की, शोधप्रक्रिया आणि शोधण्याचा हेतू यांहून आपण महत्त्वाचे नाही. कारण त्याच्या जाणिवेचा आशय अहंभावाचा आहे.
स्वतःला जाणून घेतल्यावर ईश्वरप्राप्तीचा शोध घेता येईल, असं प्रशांतजी येथे सूचित करतात. आपण आपल्या मनाच्या आंदोलनांशी प्रामाणिक असलो, तर आपल्यातला ईश्वरशोधक केवढ्या विसंगतींनी भरलेला आहे, ते आपल्याला जाणवेल. आपल्याला वस्तुस्थितीचं यथार्थ भान नाही हे कळेल.‘मी’पणाचा आशय आपल्याला उमजलेला नाही, याचा बोध होईल. या ‘मी’वर कबीरांचं ध्यान केंद्रित असल्यानं प्रशांतजी आपल्याला तिकडं घेऊन जातात. त्यासाठी बाह्य जगाच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचा उपदेश करतात.
कबीरांना बाह्य जगाविषयी अनासक्ती आणि अंतिम सत्याप्रति प्रेम वाटत होतं, हेच प्रशांतजीही सूचित करतात. कबीर आणि प्रशांतजी यांच्यातील हा एकात्म भाव आणि ईश्वराचा शोध घेणारा शोधक एकच असल्याचं भावसत्य आपल्याला जाणवतं. कबीरांच्या या पदातील… खोजी होय तो तुरतै मिलिहौं पलभर की तालास में… या चरणावरील प्रशांतजींचं चिंतन आपल्यातील चेतनेला उंच करत ईश्वराचा शोध घेणाऱ्या खऱ्या शोधकाशी जोडतं. समाजमनाची नस जाणलेल्या, व्यक्ती-व्यक्तींतील बंध सहजतेनं दृढ होण्यासाठी आणि त्यांची संवेदना स्वाभाविकतेनं उमलण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या थोर व्यक्ती स्थलकालाच्या भिन्न अवकाशातही समान धारणांसह आणि जीवनसूत्रांसह जीवन व्यतित करत असतात, हेच कबीर आणि आचार्य प्रशांतजी यांच्या विचार सायुज्यातून आपल्या लक्षात येतं. तसंच पूर्वसूरींनी दिलेलं भावसंचित पुढील पिढीनं सदोदित आपल्या जगण्याचं पाथेय म्हणून ओंजळीत जपायचं असतं, हेही उमजतं.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)