
डॉ. श्याम टरके2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मनसोक्त जीवन जगणारा अवलिया. झाडं करपू लागलीय की, ज्यांचं मन ही करपू लागतं, असं निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा निसर्गप्रेमी. बालकांसोबत रमणारा, कामात तसूभरही चालढकल न करणारा, कोणत्याच बंधनात न अडकणारा मुक्त पत्रकार. स्वत:चं स्वतंत्र पठडीतलं लिखाण, फेसबुकवर त्यांच्या लिखाणाचे अनंत चाहते, शंभरीच्या जवळपास ग्रंथाचे लेखक. तरीही ‘मला साहित्यिक म्हणू नका’, असा आर्जव.
एवढ्या रहाटगाड्यात आरोग्याची काळजी घेणारा. समाजभान जपत ‘सेवालया’स तनमनधनाने भरभरून अर्पण करणारा. त्याचा गाजावाजा न करणारा. पत्रकार मित्राच्या मृत्यूने अस्वस्थ होणारा, हळव्या मनाचा ‘बाप’ माणूस. कोविडनं जगाला भयभयीत केलं, अनेकांच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजवलं, जीवन निरर्थक झाल्यासारखं भासलं, अशा काळात ‘रानसोबती’ ही मात्रा शोधणारा सिद्धहस्त लेखक, ज्येष्ठ पत्रकार महारूद्र मंगनाळे.
लॉकडाऊनच्या काळातील शेती, शेतीसमोरील आव्हाने, कष्टकऱ्यांचं तत्त्वज्ञान, वेळेचा सदुपयोग. शारीरिक श्रमाचे मोल, वाचन, ग्रंथांचा प्रेमी ‘रानसोबती’तून कळतो. शेती जगणारा, नवं तंत्रज्ञान आत्मसात करणारा, इतरांचे भले व्हावे, असे चिंतणारा. स्वत:च्या ढंगाने जगणारा, जसं जगत आहे, तो अचूक शब्दात गुंफणारा अविलया ‘रानसोबती’त कळतो. प्राण्यांना जीव लावणारा. या ग्रंथातून प्राण्यांवर न प्रेम करणारेही त्यावर प्रेम करतील, असं लेखन करणारा. तसंच मृत्यूची व मृत्यूनंतरची वास्तविकता अन् नियोजन करणारा व्यक्ती असं कृतीशील जीवन जगणारा व्यक्तीही या ग्रंथातून कळतो.
मला रानसोबती या पुस्तकानं तर खरंच भारून टाकलंय. लेखक मंगनाळे यांचं निसर्गासोबतचं रानसोबती होऊन जगणं आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं. आजच्या काळात निसर्गाशी एकरूप होऊन, असं कोणीतरी जगतयं, याचंच आश्चर्य वाटतं. हेवा वाटतो. कारण हे जगणं सोपं नाही. यासाठी व्यावहारिक जगातून बाहेर पडावं लागतं!
खरं तर निसर्ग सगळ्यांनाच आवडतो. निसर्गासोबत जगावं वाटतं. पण ते शक्य नाही. याचं कारण निसर्गाचं जग व व्यावहारिक जग ही दोन वेगळी आहेत. या दोन्ही जगात एकाचवेळी एकरूप होऊन जगणं तसं कठीणच. अपवादात्मक लोक सोडले तर सगळेजण जगण्याच्या संघर्षात अडकून पडलेत. कौटुंबिक आयुष्य जगायचं तर केवळ निसर्गात राहून भागत नाही. व्यावहारिक जगातच ही लढाई लढावी लागते. या जगात ‘निसर्ग’ हा शब्द तोंडी लावण्यापुरताच असतो.
भारतीय माणूस घाण्याच्या बैलासारखं एक चाकोरीबद्ध जीवन जगतो. बालपण, शिक्षण, नोकरी वा व्यवसाय, लग्न, लेकरं आणि पुन्हा लेकरांच्या करिअरसाठी कष्ट करणं. यात आयुष्य कधी संपून जाते, ते कळतही नाही. अपवाद सोडले तर बहुतेकजण या चौकटीतच जगतात. कुटुंबव्यवस्था म्हणजे ही चौकट. ती ओलांडण्याचं धाडस अपवादात्मक लोक करतात. साहजिकच मूठभर लोकांच्या वाट्याला असं वेगळं जगणं येतं
शाळेची पायरी चढेपर्यंतचं जगणं निरागस, बालपणाचं! तोपर्यंतच ते त्याच्या मनाला वाटेल तसं जगू शकतं. मातीत, चिखलात लोळू शकतं. पाण्यात खेळू शकतं. वस्तुंची फेकाफेक, कागदं फाडणं, वाटेल तसे हातवारे करणं, आरडाओरडा करणं आणि भूक लागली, की जोरात रडणं…असं सर्व काही ते करू शकतं. हे करण्यावर बंधनं घालणं म्हणजे त्याचं बालपण संपलं, हे घोषित करणं.
लेकरू खेड्यात, गावात जन्मलं असेल तरच त्याचा शेती, मातीशी, निसर्गाशी थोडातरी संबंध येतो. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या लेकराचा निसर्गाशी संबंध येतोच. मात्र, मूल फ्लॅट संस्कृतीत जन्मलेलं असेल तर, त्याचा निसर्गाशी संबंध येत नाही. त्याला हळूहळू निसर्ग कळतो, तो शहरातील बागेत, पुस्तकातून नाही तर टीव्हीच्या माध्यमातून.
पुढे मोठा झाल्यावर पर्यटनातून. पण एवढ्यातून त्याला निसर्ग किती कळणार ? आणि त्याला निसर्गाबद्दल प्रेम तरी कसं निर्माण होणार ? हे समजून घेण्याची गरज आहे. लेकरू शाळेत चाललं, की त्याच्यावर संस्कार केले जातात. म्हणजे…हे करू नको. ते करू नको..हे चांगलं, ते वाईट… हे खा, ते खाऊ नको..वगैरे…वगैरे! असं बरचं काही मुलांच्या डोक्यात भरलं जातं. यात मुलांना काय हवं, याचा विचारच नसतो.
आपल्या शिक्षण व्यवस्थेत लेकरांची इच्छा काय आहे ?, याचा कुठंच विचार व्हायला हवाच. मुलांनी काय शिकावं, हेही मोठी माणसंच ठरवतात. गंमत म्हणजे यात काही चुकीचं आहे, असं कोणाला वाटत नाही. मी मंगनाळे सरांची बरीच पुस्तकं विद्यापीठात शिकत असल्यापासून वाचलीत. अजूनही वाचत आहे. फेसबुकवरचं त्यांचं लिखाण वेळ मिळेल, तसं वाचत असतोच.
‘रानसोबती’ नुकतंच वाचलं. या पुस्तकांमधील हर्ष, गबरू,अन्वी या लेकरांचं निसर्गासोबतचं स्वच्छंदी जगणं बघून माझ्या मनात हे सगळं येऊन गेलं. शाळेबाहेरचं निसर्ग शिक्षण या लेकरांना इथं मिळतयं. हे शिक्षण म्हणजे आयुष्यभराची अमूल्य अशी शिदोरीच. निसर्गात राहणं, फिरणं सगळ्याच लेकरांना आवडतं. पण ते फार कमी मुलांच्या वाट्याला येतं. दररोजच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक मुलांना घरी वेळ देऊ शकत नाहीत. ते त्यांना काय निसर्गात घेऊन जाणार ?
डोंगरावर फिरणं, पक्षी, प्राणी बघणं, झाडांची, वेलींची माहिती घेणं, झाडावर चढणं, मातीत घसरगुंडी खेळणं, चिखलात फिरणं, पावसात भिजणं या सगळ्या गोष्टी प्रत्येक लेकराला हव्या हव्याशा वाटणाऱ्याच असतात. असं जगण्याचं भाग्य ‘रानसोबती’मधील लेकरांना लाभलंय. त्यांच्या जगण्याचाही मला हेवा वाटतोच. तसा तो इतरांनाही वाटल्याशिवाय राहणार नाही. मी हे बालपण बऱ्याच प्रमाणात अनुभवलंय. पण ते माझ्या लेकरांच्या वाट्याला देण्याचा प्रयत्नही करायला हवा.
लेखक केवळ स्वत:च रानसोबती बनत नाही तर, सोबतच्या लेकरांनाही रानसोबती बनण्याची संधी देतो, ही बाब मला खूप मोलाची, प्रेरणादायी वाटते. रूद्रा (लेखकाचं शॉर्ट नाव) लेकरांना माळावर फिरायला नेतो. तिथं कुठल्या तरी अज्ञात प्राण्यानं छोटासा बोगदा केलाय. रूद्रा त्याला कोल्ह्याचं घर म्हणतो. लेकरंही त्याला तेच म्हणतात आणि आश्चर्य म्हणजे एके दिवशी त्या बोगद्यातून कोल्ह्याची छोटी-छोटी पिलं निघतात. ती पाहून लेकरं खूष होतात. त्याचे फोटो काढले जातात.
कोल्हे बघायला मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो. रूद्रा लेकरांसोबत फिरता फिरता त्यांना झाडा-झुडपांची, पक्ष्यांची माहिती सांगतो. त्यांच्या आवाजाची नक्कल करायला शिकवतो. त्यांना त्यांच्या मनासारखं वागायचं स्वातंत्र्य देतो…यातून नकळतपणे मनात रूजतात ते खरेखुरे संस्कार ! जे, की आयुष्यभर टिकून राहतात. लेकरं आपल्या आवडत्या व्यक्तीचं कळत नकळत अनुकरण करत असतातच. रुद्राचं वृक्षप्रेम लेकरांमध्येही उतरलंय. या पुस्तकातील ही नोंद बोलकी आहे.
“मळ्यात झाडांची कटींग करीत असताना अचानक हर्षनं प्रश्न केला, बाबा आपण ट्री सर्व्हंट आहोत का? …मी म्हटलं, हो…माणसांचे नोकर होण्यापेक्षा वृक्षाचे नोकर बनून जगणं खूप आनंददायी….हर्ष बोलला, मी ट्री सर्व्हंट बनणार बाबा…मी म्हटलं, माझा पाठिंबा आहे तुला !” हा संवाद किती बोलका आहे. मुलांना झाडं लावण्याचं महत्त्व सांगून परिणाम होण्याची खात्री नाही. पण हर्षनं रुद्रा हट परिसरात बाबानं जोपासलेलं जंगल बघितलं. त्याला वाटलं,आपण टी सर्व्हंट व्हायला हवं.
रीद्रा पुस्तकप्रेमी. सतत लिहितो. वाचतो. हटवर त्याचं छोटसं ग्रंथालयही आहे. त्या प्रभावामुळे हर्ष हा सहावी-सातवीत शिकणारा मुलगाही जाडजूड पुस्तकं वाचू लागतो. गांधी आणि रजनीश वाचून त्यांचे वाढदिवस साजरे करण्याची आठवण करून देतो, तेव्हा मीही हे वाचून चकीत होतो. रानसोबती ४४८ पृष्ठांच्या नोंदींमध्ये शेकडो बाबी आहेत. निसर्ग आहे, पाऊस, पीकं, पाणी आहे. शेतीतल्या समस्या आहेत. शेतकामांच्या विस्तृत नोंदी आहेत आणि क्षणाक्षणाला बदलणारा आनंददायी निसर्गही आहे. कोरोनामुळं निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा आहे. जनावरांचा बाजार आहे. तिथले बारकावे, उलाढाली आहेत. ज्याला लेख म्हणता येईल अशा तीन-चार पानांच्या ४०-५० नोंदी आहेत. मला तर या नोंदीत काही कादंबरीची बीजं दिसतात.
रूद्रा हटवरच्या माणसांसोबतच जनावरं, कुत्र्या-मांजरांवरही यात भरभरून लिहिलंय. रुद्राच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, कुठलीही माहिती देताना तिला तो ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी बनवतो. साहजिकच तो मजकूर अधिक वाचनीय बनतो. वाचनीयता हे या लेखनाचे बलस्थान आहे. एखादी नोंद वाचायला घेतली की, वाचक ती वाचत वाचत पुढे सरकतो. सामान्य वाचकही यात रमून जातो.
रॉकी या कुत्र्याचा अपघाती मृत्यू झाला. काळविटाचे शिंग कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यात अडकल्याने तो दगावतो. ही घटना नोंदवताना लेखक, रॉकीचा संपूर्ण इतिहास सांगतो. रॉकीचं बालपण, त्याच्या गंमतीजमती तो जिवंतपणे आपल्या समोर उभं करतो. हे लेखन वाचून वाचकही गहिवरल्याशिवाय राहणार नाही, हे महारूद्र यांच्या लिखाणाचं बलस्थान.
हॅप्पी नावाच्या कुत्रीचं बाळंतपण, तिच्या सहाही पिल्ल्यांचा जन्मानंतर काही तासात झालेला मृत्यू, ही घटनाही वाचकांना अशीच अस्वस्थ करते. पिल्लांच्या मृत्यूवर लिहिलेल्या कविता वाचताना आपणही त्या दु:खाचे भागीदार बनतो. हॅप्पीवर दोन कुत्र्यांनी केलेला हल्ला, तिचं जखमी होणं हा प्रसंगही लेखक आपल्या समोर घडत असल्यासारखा उभा करतो. याचं कारण कुत्रे लेखकासाठी केवळ प्राणी नाहीत तर, त्याचे रानसोबती आहेत. प्राण्यांवर जीवापाड प्रेम असल्याशिवाय कोणी असं लेखन करू शकत नाही.
रूद्रा हा केवळ लेखक नाही. तो एक पत्रकार आहे. पत्रकार हा कुठल्याही घटना-घडामोडीकडे तटस्थतेने बघू शकतो. त्याचं योग्य मूल्यमापन करू शकतो. लेखक स्वत: शेतीत कष्ट करतो. यादृष्टीने तो शेतकरी आहेच. तरीही तो शेतीतील प्रश्नांकडे तटस्थपणे बघतो. सर्वसाधारण शेतकऱ्याला ते शक्य नाही. शेतीचे प्रश्न तो नेमकेपणानं मांडतो. यात भाबडेपणा,दीनवाणेपणा किंवा आक्रस्ताळेपणा नाही. तो सरकार वा अन्य कोणाकडून अवास्तव अपेक्षा व्यक्त करीत नाही, की, रडगाणे गात नाही. निसर्ग हा त्याच्या नियमांनी बद्ध आहे. त्याप्रमाणेच तो चालणार. निसर्गाच्या लेखी माणूस नावाचा प्राणीच नाही. त्यामुळं कोणाचं भलं-बुरं करण्याशी त्याचा संबंध नाही, हे वास्तव तो वारंवार नोंदवतो. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तो सूचकपणे उपाय सांगतो. पण तो कोणाला सल्ला वा मार्गदर्शन करीत नाही. हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं.
‘रानसोबती’मधील लेखनात सगळीकडं रूद्रा आहे. आपलं नित्याचं जगणं इतक्या खुलेपणाने क्वचितच कोणी मांडलं असावं. उठल्यापासून ते झोपेपर्यंतचा अख्खा दिनक्रमचं तो वेगवेगळ्या नोंदीतून सहजतेने मांडतो. पेरणी, पेरणी पूर्वीची मशागत, यामध्ये दुबार, तिबार पेरणी, छाटणी, हरित क्रांती, प्राध्यापक पेशा सोडून अर्धांगिनीची मिळालेली साथ यांचं महत्तव, यासह शेतीतील पायकुटी, कोळपणी, मूग वापणे, तुरीची धाट आदीप्रकारचे शब्दही कळतात. याचबरोबर ‘रानसोबती’ वाचताना असं वाटतं की, आपणच रुद्रा हटवर, माळावर त्याच्यासोबत फिरतोय. काम करतोय. फोटोसह केलेल्या खाण्याच्या नोंदी आपली भूक जागी करतात.
वाटतं आपणही दही,चटणी,भाकरी खायला हवी. चिवड्याची चव अनुभवायला हवी. काळा चहा असो की, काळी कॉफी, ती लेकरांसोबत पिताना त्याचाही तो उत्सव करतो. रानसोबती या पुस्तकात सगळ्या तारीखवार (01 जानेवारी 2020 ते 27 जून 2021) नोंदी आहेत. एकप्रकारची ही रोजनिशीच आहे. यातून लेखकाचं निसर्गासोबतचं जगणं साकार झालंय. साधी, सोपी प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक कोणीही वाचू शकतो. ‘जगलं, अनुभवलं अन् ते लिहिलं’ अशी लेखकाची भूमिका आहे. त्यामुळे यात कल्पनारम्य असं काही नाही.
निसर्गासोबतचं वास्तव जगणं यात आहे. यात आलेल्या विषयांची व्याप्ती बघितली तर, भविष्यात रानसोबती याच नावाची कादंबरी होऊ शकते, असं मला वाटते. ती व्हावी यासाठी मी शुभेच्छा देतो. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी वेळ काढून हे पुस्तक वाचायलाच हवं, असं मला वाटतं. हे पुस्तक तुम्हाला एका वेगळ्या जगण्याचा परिचय नक्कीच करून देईल, असा माझा विश्वास आहे.
ज्येष्ठ कवीवर्य, साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनीही ‘रानसोबती’च्या लेखनाला ‘अभिजात साहित्याचा दर्जा मिळवून देणारं पुस्तकंय. मराठीतला असा अनमोल ठेवा आहे. थोरोच्या लेखनाचं कौतुक असणारांनी हेही लेखन वाचून पाहिलं तर त्यांना थोरोनं पुनर्जन्म घेतल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही’, असं नमूद केलंय. त्यामुळंही ‘रानसोबती’ वाचायलाच हवं. लातूरच्या मुक्तरंग प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. हे पुस्तक वाचताना कवी ना. धों. महानोर यांच्या दोन वेगवेगळ्या कवितेतल्या ओळी आठवतात. ते म्हणतात…
बिलगले गवत पायात,
निळे अस्मान उन्हाला हसले,
क्षितिजाच्या कडा चिंब,
झाल्या गुलालात!
(लेखक सहायक संचालक (माहिती) असून ते विभागीय माहिती कार्यालय लातूर येथे कार्यरत आहेत.)