
रूमी जाफरी। लेखक, दिग्दर्शक4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एक दुर्मिळ छायाचित्रात लता मंगेशकर यांच्या समवेत खय्याम.
अलीकडेच महामहीम राष्ट्रपतींंच्या हस्ते अनेक मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेकांंचाही यावेळी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावरून मला पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटसृष्टीतील काही जुन्या लोकांची आठवण आली. पद्मभूषण प्राप्त झालेल्यांपैकी एक होते महान संगीतकार मोहंमद जहूर हाश्मी ऊर्फ खय्याम. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये खय्याम साहेबांबद्दल…
हे बऱ्याच जणांना माहीत आहे की, खय्याम साहेबांचा जन्म पंजाबी मुस्लिम कुटुंबात झाला होता, पण त्यांनी दिल्लीत आपल्या भावाच्या घरी राहून संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते लाहोरला गेले. तेथे त्यांनी प्रसिद्ध पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिश्तीजी यांचे सहायक म्हणून काम केले. काही महिन्यांनी ते दिल्लीला परतले. नंतर काही वर्षांनी ते मुंबईला आले. नौशाद, सी. रामचंद्र, सलील चौधरी, हेमंतकुमार, वसंत देसाई, मदनकुमार, मदन मोहन, अनिल विश्वास, एस. डी. बर्मन, चित्रगुप्त अशा मोठ्या संगीतकारांच्या काळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. पण, या सर्वांमध्ये आणि त्यांच्यापेक्षा वेगळे संगीत देऊन आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात खय्याम साहेब यशस्वी झाले.
इतक्या वर्षांत खय्याम साहेबांसोबत माझी अनेकदा भेट झाली. एकदा प्रियंका चोप्राच्या घरी मेजवानी ठेवली होती. प्रियंकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांना संगीताची खूप आवड होती. त्यांचा माझ्यावर खूप लोभ होता, ते माझे खूप चांगले मित्रही होते, शिवाय स्वतःही खूप चांगले गायचे. त्या कार्यक्रमाला शबाना आझमी, शौकत आझमी अशी इंडस्ट्रीतील बरीच मोठी मंडळी उपस्थित होती. असो. गीत-संगीताची मैफिल संपली आणि मला खय्याम साहेबांसोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. बोलायला सुरुवात केल्यावर त्यांनी, फाळणीनंतर आपण मुंबईतच थांबलो, असे सांगितले. नुकतीच देशाची फाळणी झाली होती. खय्याम साहेबांनी पंजाबमधील दंगल पाहिली होती. त्यामुळे त्यांनी आपले एक सहकारी रहमान वर्मा यांच्यासोबत ‘शर्माजी आणि वर्माजी’ या नावाने जोडी बनवली आणि स्ट्रगलला सुरुवात केली. त्यांनी एक-दोन चित्रपटांना संगीतही दिले.
तथापि, देशातील परिस्थिती पाहून रहमान साहेबांनी त्यांना सुचवले की, येथे काम करणे जरा अवघड आहे, आपण पाकिस्तानला जाऊ.. खय्याम साहेब मला सांगत होते. ते म्हणाले, ‘मी पाहिले होतेे की मोहंमद रफी आणि साहिर लुधयानवीसारखे लोक पाकिस्तान सोडून भारतात आले. कारण इथले वातावरण अतिशय चांगले होते. इथे भेदभाव वगैरे काही नव्हते.’ त्यानंतर खय्याम साहेबांनी इथेच थांबून चित्रपटांना संगीत देण्याचा निर्णय घेतला. रहमान साहेब पाकिस्तानला गेले. खय्याम साहेबांनी इथे राहून ‘खय्याम’ नावाने संगीत देण्यास सुरुवात केली.
खय्याम साहेब सांगितले की, मुंबईमध्ये, विशेषत: चित्रपटसृष्टीवर फाळणीचा काही खास परिणाम झाला नव्हता. एवढंच झालं की, काही चांगले कलाकार तेथेच थांबले किंवा तिकडे निघून गेले आणि काही चांगले कलाकार इकडे आले किंवा इथेच राहिले. अशा लोकांच्या नावाची खूप मोठी यादी आहे. मी भारतात राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला. मी ईश्वराचे आभार मानतो की, त्याने मला इथे थांबण्याची बुद्धी दिली. कारण जितक्या चांगल्या चित्रपटासाठी काम करण्याच्या संधी मला इथे मिळाली, ती पाकिस्तानात कधी मिळाली नसती. मी भारतीय म्हणून जन्माला आलो, भारतीय म्हणून काम केले, भारतीय म्हणून जगतोय आणि भारतीय म्हणूनच मरेन, याचा मला अभिमान आहे. यावर मला राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आठवतोय…
हम अपनी जान के दुश्मन को
अपनी जान कहते हैं,
मोहब्बत की इसी मिट्टी को
हिंदुस्तान कहते हैं।
त्या दिवशी प्रियंका चोप्राकडूल मैफलीत सगळ्यांनी गाणी-गझला गायल्या होत्या. मला फर्माईश केली, तेव्हा मी काही शायरांचे निवडक शेर ऐकवले. ते ऐकल्यावर खय्याम साहेब म्हणाले, ‘भाई, तुम्ही लेखक तर आहातच; पण तुम्ही इतके चांगले शेर-गझलही एेकवताय, मग स्वत:च शायरी का करत नाही?’ त्यावर मी म्हणालो, ‘खय्याम साहेब, दुसऱ्यांचे शेर ऐकवणे आणि स्वत:चे शेर सांगणे यात खूप फरक आहे. हे उस्तादांचे काम आहे. मला चित्रपटाच्या कथा लिहिता येतात, त्याच लिहीत राहीन. शायरी करणे माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही. माझेे बोलणे ऐकून ते हसले आणि गमतीच्या स्वरात म्हणाले, चला, तुम्ही प्रामाणिक तरी आहात. आपण शायर नाही, हे किमान मान्य करताय. माझ्याकडे असे लोक गझला घेऊन येतात, ज्यांना ना शायरीची जाण असतेे, ना रदीफ, काफिया, वजनाचे ज्ञान असते. आणि तरीही म्हणतात, मी शायर आहे, या माझ्या गझला आहेत. त्यांना तुम्ही चाल लावून द्या.
खरं तर एकापेक्षा एक सरस संगीत दिग्दर्शक झाले. पण, गझल, शेर, नज्म समजून घेण्याची खय्याम साहेबांची जी प्रतिभा होती, ती तशी खूप कमी लोकांकडे होती. आज खय्याम साहेबांच्या आठवणीत त्यांच्या “उमराव जान’मधील हे गाणं ऐका…
दिल चीज़ क्या है,
आप मेरी जान लीजिये..
बस एक बार मेरा
कहा मान लीजिये।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.
(संपर्कः rumyjafrywrites@gmail.com)