कबीररंग: धीरे धीरे रे मना…

0
16
कबीररंग: धीरे धीरे रे मना…


हेमकिरण पत्की6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सामान्य माणूस मनोनिर्मित जगाचा अनुभव घेत असतो आणि तरीही त्याला त्याच्या मनापलीकडचं जग खुणावत असतं. त्याच्या मनानं निर्माण केलेल्या जगात ‘मी आणि माझं’ असं एक जग असतं. मनात उमटलेल्या विचारांनी, शब्दांनी आणि ‘मी’नं निर्माण केलेल्या मानसिक काळानं ते संपादित केलेलं असतं. हे जग म्हणजे ‘मी’नं निर्माण केलेला एखाद्या कोळीष्टकासारखा कोष असतो – तंतुमय, तरल आणि सीमित वावराचा. जाणत्या माणसाच्या दृष्टीला हा मनोमय कोष पडल्यावर त्यापलीकडच्या जगाची चैतन्यपूर्ण खूण त्याला खेचून घेते का? ही खूण त्याच्या ध्यानात येते का? आणि ती हृदयाशी सहजच जोडली गेल्यावर मनापलीकडल्या जगातील सृष्टीचं त्याला अप्रूप वाटतं का? हे डोंगर कुणाच्या हातांनी दगड-माती रचली गेल्यानं उंच होत नाहीत, या नद्या कुणाच्या धक्क्यानं पुढे पुढे वाहत नाहीत, पावसाचे थेंब कुणाच्या प्रयत्नांमुळं बरसत नाहीत, सूर्य – चंद्र – तारे कुणी कळ दाबल्यानं दृष्टीस पडत नाहीत वा दृष्टिआड होत नाहीत. या सृष्टीचं एक चक्र आहे, एक स्वतंत्र व्यवस्था आहे. ती माणसानं निर्माण केलेल्या जगाची नाही. माणसाच्या ज्ञानातून, प्रज्ञेतून सृष्टी जन्माला आलेली नाही. जाणत्या माणसाला आपल्या प्रयत्नांची मर्यादा उमजते. ज्ञात जगाचा सारा परिसर त्याच्या दृष्टीत येतो, तर्काचं मोल कळतं आणि त्यापलीकडच्या अज्ञात अस्तित्वाचंही मोल त्याला कळतं. अशाच मनापलीकडचं जग जाणू पाहणाऱ्या माणसाला कबीर आपलंसं करतात. त्याच्यावर उपदेशाचा मेघ होऊन बरसतात.

रूखडा बोला पान से, सुन पत्ते मेरी बात। इस घर की यहि रीति है, इक आवत इक जात।। झाडाला पालवी फुटणं, पानांची झड होणं ही तर ऋतुगती असते. नवीन पानासाठी आधीच्या पानानं फांदी मोकळी ठेवावी लागते. झाडाचं झाडपण यामुळंच अखंड असतं. कबीर याच ऋतुगतीला निरखतात. या निरखण्यातून जन्म-मृत्यूचा दाखला देणारा यथार्थ दोहा आपल्यासाठी सिद्ध होतो. झाडावरच्या पानांच्या येरझारी ही सृष्टीची रीत असते. ऋतुचक्रासारखी ती नित्य असते. तिच्या क्रमात बदल होत नाही. आपले जन्म – मृत्यू मनुष्यनिर्मित जगातील नसतात. त्यामागे अज्ञाताचा कायदा असतो. तो विचार-तर्कापलीकडचा असतो. तो हृदयानं जाणून घ्यावा, सद्बुद्धीनं अनुसरावा असा असतो. हे जाणून घेणं, हे अनुसरणं सहज व्हावं, यासाठीच कबीरांची व्यक्त होण्याची तळमळ आहे. माणसाचं मन स्वत:च्या मनानं निर्माण केलेल्या जगात राहत असलं, तरी त्याला त्यापलीकडल्या अस्तित्वाच्या स्थितीगतींना जाणून घेण्याची उत्कट आस असते. हीच तर प्रत्येक जीवाची खरी तहान असते. कधी कधी हे मन व्याकूळ होतं. धीर अमाप असतो, हे त्याला उमजत नाही. सहनबळ केवळ देहामनाचं नसतं, हे त्याला समजत नाही. इच्छेचा जन्म आणि तिची पूर्तता, यांची एक ऋतुगतीसारखीच आंतरव्यवस्था असते. ती प्रत्येकाला बाह्य संस्कार प्रभावांपासून अलिप्त राहून जाणून घ्यावी लागते. पण, मन इच्छेच्या अधीन होतं आणि आपली नैसर्गिकता हरवून बसतं. कबीरांनी सामान्य माणसाच्या या मन:स्थितीला कसं व्यक्त केलं आहे, ते पाहा… धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय। माली सिंचै सौ घडा, ऋतु आये फल होय।। हे मना… तू धीर धर. धीरापोटीच तुझी आस पुरी होईल, फळझाडाची निगराणी करणाऱ्या माळीदादानं झाडबुडाला शंभर घड्यांतून पाणी शिंपलं, तरी फलधारणेचा ऋतू आल्याशिवाय झाडाला फळ येणार नाही. तसंच तुझी आस उचित वेळेसच पुरी होईल, आधी होणार नाही. आपल्या मनाचं जग आपल्या इच्छापूर्तीच्या प्रयत्नांशी जोडलेलं असतं. पण, मनापलीकडच्या जगात प्रयत्नांचं कितीसं मोल असतं! तिथं वाट पाहणं, शब्दांशिवाय सहन करणं आणि अस्तित्वाच्या गतीवर प्रेम करणं हीच आपल्या ठायी असलेल्या सत्त्वाची परीक्षा असते. हेच जीवनावर प्रेम करणं असतं. आपल्या चंचल मनाला हृदयाच्या स्थिरतेसह जाणून घेणारी काही अपवादभूत माणसं या जगात असतात. ती मनानं निर्माण केलेल्या गोष्टींवर अवलंबून नसतात. परतत्त्वाचा स्पर्श त्यांच्या साध्या, सरळ हृदयाला झालेला असतो. या अनुभूतीमुळं ती सर्जनशील असतात; सृष्टीत घडणाऱ्या परिवर्तनांशी आतून जोडलेली असतात. त्यांच्या दृष्टीतून आनंद ओसंडत असतो. या परिवर्तनानं घडणाऱ्या दर्शनासाठी त्यांना शब्दांचा आधार अपुरा वाटतो. निसर्ग दर्शनातून प्रतीत होणारं सत्य शब्दांच्या पलीकडंच राहतं, हा बोध कबीर मार्मिकतेनं सूचित करतात. पाणी ही ते हिम भया, हिम व्है गया बिलाय। जो कुछ था सोई भया, अब कुछ कह्या न जाय। पाणी गोठलं आणि त्याचा बर्फ झाला. बर्फ पुन्हा वितळून पाणी झालं. गोठण्या-वितळण्यानं पाण्याची फक्त स्थिती बदलली; मात्र पाणी पाणीच राहिलं. स्थितींचा आकार धारण करून प्रवाही असलेलं अस्तित्वही असंच आहे. कबीरांच्या दृष्टीत हे अस्तित्वच चैतन्य आहे आणि ते शब्दातीत आहे.

hemkiranpatki@gmail.com

संपर्क : ९४०३७६८८९१



Source link