सातारा : प्रोत्साहनपर अनुदानाच्या तिसर्‍या यादीची प्रतीक्षा | पुढारी

0
2









उंडाळे; वैभव पाटील :  नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेतून पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या गोष्टीनंतर दोनदा वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित असून, या योजनेंतर्गत तिसरी यादी केव्हा जाहीर होणार? याकडे लक्ष लागले आहे.

पहिली यादी जाहीर होताच तातडीने शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले; परंतु दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण करून तब्बल एक महिना ते दीड महिना उलटून गेला आहे. मात्र असे असूनही, शेतकर्‍यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होऊ लागले असून आजअखेर ही प्रक्रिया सुरूच आहे. दुसर्‍या यादीतील शेतकर्‍यांचे पैसे अद्याप जमा होत असून या यादीतील शेतकर्‍यांचे संपूर्ण पैसे जमा झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही असेच काही चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तिसरी यादी नेमकी केव्हा जाहीर होणार? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच राज्यातील शेतकर्‍यांना पीक कर्जमाफी केली होती. पण नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना यामध्ये काहीच लाभ नसल्याने या सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर केली होती. या योजनेची पहिली यादी दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर ही योजना संथ गतीने राबवली जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अजूनही दुसर्‍या यादीतील सर्व शेतकर्‍यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शासनाकडून तिसरी यादी केव्हा जाहीर होणार? या यादीत आपले नाव असणार का? याकडे राज्यातील शेतकर्‍यांचे डोळे लागून राहिले आहेत. सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातील शेतकरी याला अपवाद नाही. त्यामुळे राज्य शासनाने गतीने या योजनेची अंमलबजावणी करून संकटात असणार्‍या बळीराजाला मदत करावी, असे मत व्यक्त होत आहे.

अजूनही लाखभर शेतकरी वंचितच…

सातारा जिल्ह्यात तीन लाख 87 हजार 265 लाभार्थी आहेत. पहिल्या यादीत 84 हजार 902 शेतकर्‍यांना अनुदान मिळाले. या यादीनंतर 1 लाख 23 हजार 135 शेतकर्‍यांची दुसरी यादी जाहीर झाली. यातील शेतकर्‍यांचे अद्याप अनुदान वाटप सुरू आहे. त्यामुळे तिसर्‍या यादीतील 1 लाख शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे.











Source link