
राजेंद्र भामरे10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘हिट अँड रन’सारख्या घटनांमुळे सामान्यांचे बळी जात असताना समाज म्हणून आपण मूक राहून चालणार नाही. कायदे-नियमांना न जुमानण्याची सामाजिक मानसिकता आपल्याला मुळातून बदलावी लागेल. त्यासाठी कुटुंब, समाज आणि पोलिस – प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर व्यापक काम करावे लागेल.
अलीकडे ‘हिट अँड रन’च्या घटना लागोपाठ घडत आहेत. विशेषत: शहरांमध्ये आणि त्यातही अल्पवयीन व तरुण मुलांकडून त्या घडत आहेत. अपघात नेहमीच होतात, पण ‘हिट अँड रन’च्या घटनांतील चालकांमध्ये, मानवी जीव मारला गेल्यावरही कीडा- मुंगी मारल्यासारखी मानसिक सहजता कशाने आली असावी, हा चिंतेचा विषय आहे. यामध्ये काही गोष्टी एकसमान आहेत. उदा. तरुण वाहनचालक, त्यांनी केलेले अमली पदार्थांचे सेवन, त्यांची गर्भश्रीमंती आणि त्यांच्या पालकांचे राजकीय संबंध. या अनुषंगाने काही मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल.
नियम मोडण्याचा असाही ‘संस्कार’ :
बालवाडीपासून मुलांची शालेय कारकीर्द सुरू होते. त्यांना पालक शाळेत सोडतात किंवा रिक्षा-बसने सोडले जाते. अनेक जण दुचाकीवर तीन-चार मुलांना घेऊन जातात. बहुतांश पालक सिग्नल पाळत नाहीत. रिक्षा, बसचे ड्रायव्हरही सिग्नल तोडतात, एकेरी मार्गाचे उल्लंघन करतात. अशातच पादचारी किंवा इतर वाहनचालकांशी भांडण झाले, तर ते अर्वाच्य शिवीगाळही करतात. हे सगळं मुले बघत असतात. त्यांच्या मनावर याचा विपरीत व दूरगामी परिणाम होतो. नियम-कायदे मोडायचे आणि त्याचा खेद वा खंतही बाळगायची नाही, हे ‘संस्कार’च त्यांच्यावर असे नकळत होतात.
सामाजिक वर्तनाचे शिक्षण नाही :
बालवयातील मुलांना सामाजिक वर्तन कसे असावे? समाजात वावरताना कुठले भान ठेवावे? याविषयी आपण फारसे शिकवत नाही. रस्त्याने पायी जात असू वा वाहन चालवत असू; वाहतुकीचे नियम कसे पाळावे, इतरांची काळजी कशी घ्यावी, हे त्यांना शाळेत शिकवले जात नाही. त्यामुळे लहानपणीच मुलांना सोप्या भाषेत वाहतुकीचे नियम आणि ते मोडण्याचे परिणाम यांची माहिती दिली पाहिजे. असे विषय ‘ऐच्छिक’ ठेवले जातात. वास्तविक, सार्वजनिक वर्तन आणि वाहतुकीचे नियमपालन हा प्राथमिक शिक्षणातील अनिवार्य विषय असला पाहिजे. पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत शहरात ‘ट्रॅफिक पार्क’ उभे करणे आणि शाळांनी मुलांना तेथे नेऊन प्रात्यक्षिकाद्वारे नियम शिकवले पाहिजेत.
लायसन्स : सहज मिळते अन् टिकतेही!
आपल्याकडे छोट्या ग्राउंडवर, थोडा वेळ गाडी चालवली की सहज ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. पण, त्या उमेदवाराला वाहतूक नियमांचे, चिन्हांचे किती ज्ञान आहे? ते पाळण्याचे किती भान आहे? वैद्यकीयदृष्ट्या तो गाडी चालवण्यास सक्षम आहे का? हे फारसे पाहिले जात नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेणाऱ्या एका क्लासमध्ये ‘पीएसआय’च्या उमेदवारांचे मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी परवाच मला बोलावले होते. त्यावेळी मी अनेकांंना, ‘ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?’ ‘महामार्गावरील अमुक वाहतूक चिन्हांचा अर्थ काय?’ असे विचारले, तर 10 टक्के मुलांनाही ते सांगता आले नाही. आपल्याकडे लायसन्स दिल्यावर त्या चालकाकडून अपघात वा गुन्हे घडले, तरी ते शक्यतो रद्द होत नाही. परदेशात वाहतूक नियमभंगाच्या सामान्य घटनेतही लायसन्स निलंबित केले जाते, पुन्हा तशी घटना घडली तर ते कायमचे रद्द होते.
दंड आणि शिक्षा किती परिणामकारक?
आपल्याकडे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी असलेल्या दंडाची रक्कम अत्यल्प असते. नियमभंग करणाऱ्याला पकडले की, एक तर तो चिरीमिरी देऊन सुटतो किंवा राजकीय पुढाऱ्याला, ओळखीच्या अधिकाऱ्याला फोन करून पोलिसांवर दबाव आणतो. अशाने पोलिसांचे खच्चीकरण होते आणि नियम मोडणाऱ्याचे मनोबल वाढते. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना तडजोड न करता जबर दंड व्हायला हवा. हीच बाब शिक्षेच्या बाबतीतही लागू होते. खरे तर, ‘हिट अँड रन’सारख्या गंभीर घटनांसाठी कायद्यांत कठोर तरतुदी व्हायला हव्यात. अल्पवयीनांसाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदींचाही फेरविचार झाला पाहिजे. अल्पवयीनांसाठीच्या कायद्याचा, त्यातील पळवाटांचा कसा गैरफायदा घेतला जातो, हे पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आपण पाहिलेच आहे.
डान्स – ड्रग – किक अन् हिट…
अलीकडे घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणांचा अभ्यास करताना लक्षात येते की, अमली पदार्थांचे सेवन हेही यामागचे एक प्रमुख कारण आहे. पुणे, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये पबचे प्रमाण खूप वाढले आहे. पब वाढले की अमली पदार्थांची विक्री वाढते, हे समीकरणच आहे. पुण्यासारख्या शहरात अमली पदार्थांचे मोठे साठे पकडले गेल्याने या गोष्टीला दुजोरा मिळतो. या पबमध्ये मुले सात-आठ तास नाचत असतात. त्यासाठी प्रचंड स्टॅमिना लागतो. त्यामुळे तिथे येणारी बरीच मुले ड्रग्जचे सेवन करतात. मद्यपान ही त्यांच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट झालेली असते. बहुतांश प्रकरणात अशा अमली पदार्थांच्या सेवनानंतर त्या मुलाकडून किंवा मुलीकडून भयानक अपघात घडल्याचे दिसते. त्यामुळे असे अमली पदार्थ पुरवणारे रॅकेट तसेच संबंधित पब अथवा बारचालकांवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांना मद्य विकणारी दुकाने, हॉटेलांवरही कडक आणि सातत्याने कारवाई होणे आवश्यक आहे. खरे तर, पोलिस, अन्न-औषध प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणांचे कुठे तरी लागेबांधे असल्याशिवाय ड्रग्जचे उत्पादन – पुरवठा होत नाही. त्यामुळे ड्रगसाठे सापडतात तेव्हा संबंधित दोषी अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला, तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. बऱ्याचदा कनिष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. पण, जसे पाणी वरुन खाली पाझरते, तसा भ्रष्टाचारही वरून खालच्या दिशेने मुरत गेलेला असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
दबाव झुगारण्याचे बळ हवे :
आपल्याकडं बक्कळ पैसा आहे, पाठीशी राजकीय ताकद आहे, त्यामुळं आपण काहीही करू शकतो, ही मानसिकता फार भयानक आहे. ‘हिट अँड रन’च्या अलीकडील बहुतांश घटनांना तीच कारणीभूत आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यावर धनदांडगे लोक वा राजकीय नेते बेकायदेशीर गोष्टी करायला सांगत असतील, तर पोलिसांनी ते झुगारले पाहिजे. माध्यमे आणि समाजानेही यंत्रणेवर दबाव ठेवायला हवा. मी असे बघितले आहे की, गुन्ह्याच्या प्रकरणात बेकायदेशीररित्या सामील झालेल्या लोकप्रतिनिधींना साधे चौकशीसाठीही बोलावले जात नाही. त्यावर माध्यमेही आवाज उठवत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाईचे धाडस दाखवले पाहिजे. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावेल, दरारा निर्माण होईल आणि सामान्य पोलिसांचे मनोबलही वाढेल.
एकूणच, ‘हिट अँड रन’सारख्या घटनांमुळे सामान्यांचे बळी जात असताना समाज म्हणून आपण मूक राहून चालणार नाही. लहानपणीच मुलांवर सामाजिक वर्तन आणि नियमपालनाचे संस्कार करणे, त्यासाठीचे औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण देणे, वाईट गोष्टी-व्यसनांपासून त्यांना दूर ठेवणे आणि त्यातूनही गुन्हा घडल्यास कुटुंब, समाज आणि राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेने कायदेशीर प्रक्रियेला साथ देणे या गोष्टी आपल्याला निग्रहाने कराव्या लागतील. त्यासाठी कायदे-नियमांना न जुमानण्याची आपली सामाजिक मानसिकता मुळापासून बदलावी लागेल. त्यापासून आपल्याला पळ काढता येणार नाही.
(संपर्कः acprmbhamare@gmail.com)