रसिक स्पेशल: बलुचिस्तानचा प्रश्न

0
1
रसिक स्पेशल:  बलुचिस्तानचा प्रश्न


डॉ. सुखदेव उंदरे3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बलुचिस्तानातील सिब्बी जिल्ह्यात ११ मार्चला क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला चढवून ही ट्रेनच हायजॅक करण्यात आली. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हा हल्ला केला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या फतेह स्क्वाडचीही साथ त्यांना मिळाली. या हल्ल्यातून पाकिस्तान सरकार आणि लष्कर सावरण्याआधीच ‘बीएलए’ने नुकताच, १६ मार्चला पाकिस्तानी लष्करी बसच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्यात ९० सैनिक मारले गेल्याचा दावा ‘बीएलए’ने केला. पाकिस्तानातील या घटनांनी जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे बलुचिस्तान आणि तिथल्या संघर्षाकडे इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल.

पाकमध्ये सामील व्हायचे नव्हते : बलुचिस्तान प्रांत हा मुख्यत्वे चार संस्थानात विभागलेला होता. कलात, खरहान, लॉस बेला आणि मकरा. यापैकी कलात सर्वांत शक्तिशाली संस्थान होते. कलातच्या खानाला सार्वभौम राहायचे होते. भारताच्या फाळणीनंतर कलात म्हणजेच बलुचिस्तान सुमारे २२७ दिवस स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य राहिले. या प्रांताला पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते आणि मोहम्मद अली जिनाही सुरूवातीला या भूमिकेशी सहमत होते.

भू-राजकीय, सामरिक महत्त्व : पाकिस्तानातील पंजाब, खैबर पख्तुनख्वाह आणि सिंध या अन्य तीन प्रांतांपेक्षा बलुचिस्तान क्षेत्रफळाने मोठा आहे. पाकिस्तानचा जवळपास ४४ टक्के भूभाग या प्रांताने व्यापला असून, तिथली लोकसंख्या सुमारे दीड कोटी आहे. पाकिस्तानी नौसेनेचे तीन तळ बलुचिस्तानात आहेत. या प्रांतातील चगाईमध्ये अणुचाचणी करूनच पाकिस्तान आण्विक शक्ती बनला. पाकिस्तानची २० टक्के नैसर्गिक संसाधने याच प्रांतात आहेत.

चळवळीचे पुनरुत्थान : बलुच लोकांचे सार्वभौम हित आणि अधिकारांसाठी लढत असल्याचा ‘बीएलए’चा दावा आहे. २००० च्या दशकाच्या प्रारंभी या संघटनेचा उदय झाल्याचे मानले जाते. पण, काही विश्लेषक या संघटनेला पूर्वीच्या बलुच बंडखोरीचे, विशेषत: १९७३ ते १९७७ च्या स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे पुनरुत्थान मानतात. पाकिस्तानच्या निर्मितीपासून बलुच प्रांत अविकसित राहिला आहे. पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे तिथे स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. ‘बीएलए’मुळे तिला पाठबळ मिळाले. या भागातील चीनच्या प्रवेशानंतर तिथली परिस्थिती अधिकच चिघळत गेली. पाकिस्तानने बलुचिस्तानातील ग्वादर बंदर चीनला भाडेपट्ट्यावर दिले. स्थानिक बलुच लोकांमधील असंतोष वाढण्यामागचे हेही एक कारण आहे.

भारताची भूमिका काय? बलुच बंडखोरांना भारताचा पाठिंबा असल्याचे आरोप पाकिस्तानकडून सातत्याने केले जातात. भारताने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. तथापि, बलुच लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे महत्त्व समोर ठेऊन भारताने अनेकदा संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय मंचांवर बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. बलुचिस्तानच्या मुद्द्यावर भारताची भूमिका पाकिस्तानसोबतच्या संबंधात राखल्या जाणाऱ्या नाजूक संतुलनामुळे जास्त गुंतागुंतीची बनली आहे. तूर्तास बलुचिस्तानातील लोकांच्या आशा-आकांक्षांचा आदर करणाऱ्या अर्थपूर्ण वाटाघाटींमध्ये या समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग सापडू शकतो. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत भारताचा राजनयिक पाठिंबा आणि हातभार भविष्यात निर्णायक ठरेल.

(संपर्कः sukhadevsundare@gmail.com)



Source link