रसिक स्पेशल: प्रजासत्ताकाचा आत्मशोध…

0
2
रसिक स्पेशल:  प्रजासत्ताकाचा आत्मशोध…




आता धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. समाज एक गर्दी बनला आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग… ढीगच राहतो. पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं सैरभैर झालं आहे. यातून सावरत त्याला आत्मशोध घ्यावा लागेल… पंचाहत्तर वर्षांपूर्वी… भारतात १९५० मध्ये प्रथमच सिंहासनावर कोणीच बसणार नव्हतं. राजा – राणी इतिहासजमा झाले, सिंहासन संग्रहालयात गेलं होतं. सिंहासनासारखीच एक खुर्ची लोकसभेत बसवण्यात आली. त्या खुर्चीवर सभापती बसले. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचं सभागृह ते चालवू लागले. देशाचं सरकार चालवणारी माणसं या सभापतींसमोर उभं राहून, आपण काय काय करणार आहोत, ते सांगू लागली. सभागृहातले लोक नागरिकांच्या वतीनं गाऱ्हाणी आणि मागण्या मांडू लागले. कोट्यवधी लोकांच्या वतीनं त्यांचे हे प्रतिनिधी देशाचा कारभार हाकू लागले. राज्यघटनेनं लोकांना कारभार करण्याचा अधिकार दिला, त्यांच्या वतीनं प्रतिनिधी संसद, विधिमंडळे चालवू लागले. एका अर्थाने हे प्रजेची सत्ता आल्याचं द्योतक होतं. *
आज प्रजा आणि सत्ता यात नातं उरलेलं नाही. प्रजेची इच्छा सत्तेला कळत नाही. प्रजा आणि सत्ता यांच्यात थेट दुतर्फा संबंध राहिलेला नाही. सत्ता स्वतःच्या वळणानं चालत राहते. त्यातून प्रजेचं जे काही व्हायचं ते होत राहतं. भारतात आणि जगातही. सत्ता म्हणजे सरकार. सरकार म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षानं चालवलेलं सरकार. लोकशाही अगदी बाल्यावस्थेत होती, तेव्हा रोम – ग्रीसमध्ये नगरजन चौकात गोळा होत, चर्चा करत, निर्णय घेत. नगरं मोठी झाली. कारभार नगरांपुरता नव्हे, तर अधिक मोठ्या लोकसंख्येसाठी करावा लागला. इतकी माणसं थेट गोळा होणं शक्य नव्हतं. लोकांनी प्रतिनिधी निवडावेत आणि प्रतिनिधींनी राज्य करावं, हे ठरलं. भारतात १९७२ – ७४ च्या सुमाराला असंतोष होता. गुजरात आणि बिहारमध्ये, काही अंशी देशात जनता असंतुष्ट होती, तिच्या मनासारखं होत नव्हतं. त्या राज्यात आणि देशात लोकांनीच निवडून दिलेली सरकारं होती आणि तरीही लोकांना वाटत होतं की, ही सरकारे आपलं मन ओळखू शकत नाहीत. या स्थितीला सत्ताधारी काँग्रेस पक्ष कारणीभूत आहे, त्या पक्षातला भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असं काही लोकांना वाटलं. ते एकत्र आले. जेपी अर्थात जयप्रकाश नारायण यांनी असंतोषाचं नेतृत्व केलं. आपला प्रतिनिधी नीट काम करत नसेल तर त्याला परत बोलवावं, असा विचार त्यांनी मांडला. काँग्रेसचे समर्थक म्हणाले की, हा सारा विरोधी पक्षांचा डाव आहे. लोकप्रतिनिधींना परत बोलावणं व्यवहार्य नाही. सतत लोकप्रतिनिधींना परत बोलवत राहिलं, तर कारभार होणार कसा? सरकारं चालू द्यावीत, जनता आणि सरकारांमध्ये संवाद घडवून आणावा. जेपींची चळवळ यशस्वी झाली. काँग्रेसची सरकारे पडली. विरोधकांची सरकारे निवडून आली. त्यानंतर आजवर असं दिसतंय की, कोणतंही सरकार आलं तरी बहुतांश जनता असंतुष्ट असते. आज भाजपची सरकारे आहेत. हा पक्ष म्हणतो की, त्यांनी उत्तम कारभार केलाय, जनता अत्यंत सुखात आहे. त्यासाठी तो काही आकडेही देतो. विरोधक अनेक उदाहरणं देऊन जनता दुःखात आहे, असं सांगतात. अर्थशास्त्र जाणणारे शक्यतो तटस्थपणे काही उदाहरणं आणि आकडे देतात. त्यातून जनता म्हणतात तशी सुखात नाही, असं दिसतं. ही १९७५ सारख्या स्थितीची लक्षणे तर नाहीत ना, असं वाटू लागतं. *
निवडणुकीचा खर्च फार वाढलाय. प्रचार महाग झालाय. लोकांना पैसा खाऊ घालण्याचा खर्च खूप वाढलाय. सभेसाठी, मिरवणुकीसाठी माणसं गोळा करावी लागतीत, ती पैसे मागतात. पुढारी पैसा कमावत असतील, तर आम्हाला त्यात वाटा का मिळू नये, असं लोक उघडपणे बोलतात. पक्षांना पैसा गोळा करावा लागतो. तो पैसा ६० टक्के लोकसंख्या असलेल्या गरिबांकडून येणं शक्य नाही. लोकसंख्येत ३५ टक्के असलेल्या मध्यम – उच्च मध्यमवर्गीयांकडून थोडासा पैसा येतो. पण, हा वर्ग एक पैसा देतो आणि दहा पैशाचा गवगवा करतो. मग उरतात समाजातले १ ते ५ टक्के श्रीमंत. ते नाना वाटांनी राजकीय पक्षांना पैसे देतात. सत्ताधारी पक्षाला पैसे देणाऱ्यांचा फायदा पाहावाच लागतो. ते तरी दिलेला पैसा परत कसा मिळवणार? सरकारकडं (ते चालवणाऱ्या पक्षांकडं) येणारा बहुतेक पैसा धनिकांकडून येतो. गरीब माणूस कर भरत नाही. आपण वापरतो त्या प्रत्येक बारीकसारीक वस्तूवर कर भरून बहुसंख्य जनता सरकारला पैसे देते.
रस्ते खराब. हवा खराब. रोगराई भरपूर. औषधपाणी करता करता खिसा रिकामा होतो. शिक्षण मिळते, पण शिकणाऱ्यांची आकडे साक्षरता, भाषा साक्षरताही जेमतेमच असते, तर्कशक्ती वगैरे सोडूनच द्या. राजकीय पक्ष सरकार आणि माध्यमांच्या आधारे एवढा धुरळा उडवतात की देशातील सामान्य माणूस डोळे चोळत राहतो, त्याला सभोवतालच्या वास्तवाचा अर्थ कळत नाही. निवडणूक येते तेव्हा धुरळा फार वाढतो. हा माणूस आपल्यापुढं काय चाललंय ते पाहू लागतो, तेव्हा पक्षांनी दिलेले पैसे, मांस, मद्य, कपडे, भांडी समोर येतात. त्याचाही अर्थ त्याला कळत नसतो. तो मतदान करून बसतो. कधी कधी आपण मत कोणाला दिलं आणि कोण निवडून आला, याचा पत्ता त्याला लागत नाही. *
जाहिरात, माध्यमांतून येणाऱ्या प्रतिमा आणि शब्द, इव्हेंट यांवर या गणराज्यातील प्रजेचं विचार करणं अवलंबून आहे. ती आपल्या बाबतीतले निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. या लोकांच्या ज्ञानात आणि माहितीत भर पडते, ती सार्वजनिक माध्यमातून. पण, त्यातील बहुतांश आता धनिकांनी ताब्यात घेतली आहेत. लोकांनी काय खावं, कसे कपडे घालावेत, औषधं कोणती घ्यावीत, पोरं कुठल्या शिक्षण संस्थात घालावीत, मतं कोणाला द्यावीत, कोणता राजकीय विचार करावा, हे सारं ते ठरवतात. उंची कपडे, उत्तम प्रकाशयोजना, उत्साहवर्धक संगीत, प्रभावी सूत्रधार आणि परिणामकारक पात्रं यांचा वापर ते करतात. गायक, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर, कलाकार अशी मंडळी दिखाऊ पद्धतीनं पोकळ आशय लोकांसमोर पोहोचवतात. माणसांची डोकी आणि मन या आशयावर पोसली जातात. धनिक, नोकरशहा आणि राजकीय पक्ष विचार करतात. लोकांना विचार करण्याची सवय उरली नाही. त्यांनी विचार करण्याची आवश्यकता नाही, अशी स्थिती तयार झाली आहे. माणसं जगण्याच्या चक्रात इतकी अडकलीत की त्यांना विचार करायला वेळच मिळत नाही. अशातच त्यामध्ये जात येते, धर्म येतो, पंथ येतो. मग प्रत्येकाची स्वतंत्र आर्थिक स्थिती येते, कौटुंबिक स्थिती येते. हज्जार झेंगटं… परिणामी माणूस व्यक्ती म्हणून विस्कटलेला आहे. कुटुंबं विस्कटलेली आहेत. समाज ही एक गर्दी बनली आहे, एक ढीग झाला आहे. ढीग कोणीही कसाही हाताळावा, ढिगाचं काहीही करावं, ढीग स्वतः काहीही करू शकत नाही. सत्ता ढिगातून हवं ते वेचते, बाकीचा ढीग.. ढीगच राहतो. दुर्दैवाने पंचाहत्तरीतील प्रजासत्ताक असं काहीसं सैरभैर झालं आहे. * मग यावर मार्ग काय? समोरचा माणूस सांगेल – हे वस्त्र वापरा, ही टूथपेस्ट वापरा, हा पदार्थ खा, अमूक शाळेत जा, तमूकला फॉलो करा; त्यामुळं तुम्हाला स्वर्गसुख लाभेल, चिरंजीव आनंद मिळेल.. सांगू दे त्याला. काहीही सांगू देत.
आपण आपला विवेक वापरावा. आपल्या कृतीमुळं निसर्गावर काही विपरीत परिणाम होत नाही ना? आपल्या वागण्यानं कोणाला त्रास होत नाही ना? आपल्यामुळं कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाहीय ना? असा विचार करुन नंतरच निर्णय घ्यावा. पटलं नाही तर नम्रपणे नकार द्यावा. आपले हात – पाय, डोकं वापरात राहील, एकूण शरीर आणि बुद्धी सुदृढ राहील, अशा रीतीनं आपण जगावं. हे शक्य असल्याचं गांधीजींनी दाखवून दिलं होतं. व्यापार करता येतो, कारखानदारी करता येते, पैसे कमावता येतात आणि त्याचवेळी समाज सुखी ठेवण्यासाठी संस्थाही उभारता येतात, हे टाटांनी दाखवून दिलं. गांधीजी आपल्यातलेच होते आणि टाटाही आपल्यातलेच होते. एवढं पुरेसं नाही काय? (संपर्कः damlenilkanth@gmail.com)



Source link