रसिक कव्हर स्टोरी: तेलाचा तडका… आरोग्याला चटका

0
1
रसिक कव्हर स्टोरी:  तेलाचा तडका… आरोग्याला चटका




मन की बात… या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना स्थूलत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारातील खाद्यतेलाचे प्रमाण दहा टक्के कमी करण्याचे आवाहन केले. एकीकडे आहारातील खाद्यतेलांचा अतिवापर ही आपल्या आरोग्यापुढची मोठी समस्या बनली आहे, तर दुसरीकडे रिफाइंड तेलामुळे एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आरोग्याला चटका आणि अर्थकारणाला तडका देणाऱ्या तेलाचा हा लेखाजोखा… भारतीयांमध्ये वाढणारे स्थूलत्वाचे प्रमाण आणि त्यामुळे जडणारे विकार यांमुळे दस्तुरखुद्द पंतप्रधान चिंतित आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतानाही त्यांनी या मुद्द्याला स्पर्श केला होता. भारतीयांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत जीवनशैलीशी निगडीत आजारांत सातत्याने वाढ होत आहे. आहारातील खाद्यतेलाच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व वयोगटांत, विशेषत: किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यातूनच मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. कोणत्याही वयात सुदृढ, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा ठरतो. हा आहार केवळ संतुलितच नव्हे, तर सुयोग्य असायला हवा. आजकाल धावपळीच्या दिनक्रमामुळे बहुतांश लोक असा आहार घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत. त्यातही मुलांमध्ये फास्ट फूड, जंक फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा पदार्थांमुळे स्थूलत्वाच्या साथीने लहान वयातच शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी आणि दोष निर्माण होत आहेत. साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी सकस आणि चौरस आहारामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांचा फारसा धोका नव्हता. पण, नंतर आहारात आलेल्या अनेक घटकांमुळे या व्याधी सुरू झाल्या. आहारात असा परिणामकारक बदल घडवणाऱ्या घटकांपैकी ‘खाद्यतेल’ हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कधी काळी घाण्यावरील तेलापासून सुरू झालेला आपल्या खाण्याच्या तेलाचा प्रवास आता ‘डबल-ट्रिपल रिफाइंड ऑइल’पर्यंत पोहोचला आहे. सर्व प्रकारच्या तेलबियांपासून बनणाऱ्या अशा खाद्यतेलांसाठी प्रामुख्याने पामतेलाचा वापर केला जातो. कारण वनस्पतिजन्य तेलांपेक्षा पामतेल जवळपास २० ते २५ टक्के स्वस्त आहे. तथापि, सुमारे ४५ वर्षांच्या प्रयत्नांनंतरही भारतात अपेक्षेइतके पाम उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी आयात केलेले पामतेल आणि विविध प्रकारच्या तेलबिया यांपासून बनलेले रिफाइंड तेल आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनले आहे. या तेलाच्या उत्पादन आणि बाजारपेठेतून एकीकडे मोठी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, त्याचवेळी आपल्या आरोग्यापुढे त्याहून मोठे प्रश्नचिन्हही उभे राहिले आहे. भारताचे ‘तैलचित्र’…
– जगातील एकूण तेलबियांच्या उत्पादनापैकी ५ ते ६ टक्के उत्पादन भारतात होते.
– गरजेच्या ५७ % खाद्यतेल अन्य देशांकडून घेणारा भारत हा सर्वांत मोठा आयातदार देश आहे.
– इंडोनेशिया, अर्जेंटिनाकडून कच्चे खाद्यतेल, तर मलेशियाकडून कच्च्या पामतेलाची आयात.
– ब्राझील, रशियाकडून कच्चे सोयाबीन तेल, तर युक्रेनकडून सूर्यफूल तेलाची आयात.
– कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी शून्य सीमाशुल्क, ते सप्टेंबर २०२४ मध्ये २० % करण्यात आले.
– देशांतर्गत उत्पादनातील वाढ आणि तुलनेने कमी मागणी यामुळे आयातीच्या प्रमाणात काहीशी घट. देशात २०२३-२४ मध्ये झालेले खाद्यतेलाचे उत्पादन
– मोहरीचे तेल : ३६.४ लाख मे. टन
– शेंगदाणा तेल : २२.९ लाख मे. टन
– सोयाबीन तेल : २०.८ लाख मे. टन
– एरंडाचे तेल : ५.६६ लाख मे. टन
– तिळाचे तेल : २.३८ लाख मे. टन
स्त्रोत : नीती आयोग आणि अन्य संस्थांचे खाद्यतेलविषयक अहवाल. कसे तयार होते रिफाइंड तेल?
रिफाइंड तेल बनवताना पहिल्यांदा आयएनएस ३१९ / टीबीएचक्यू, आयएनएस ९०० ए , ई ९०० ए आणि डीएमपीएस यांसारख्या ६ ते ७ रसायनांचा वापर केला जातो. हे तेल दुसऱ्यांदा रिफाइंड करताना अशी १० ते १२ रसायने वापरली जातात. तेल पूर्णपणे रिफाइंड होईपर्यंत सुमारे अर्धा तास २०० अंश सेल्सिअस तापमानात तापवले जाते. त्यानंतर तेलातील नैसर्गिक उग्र वास घालवण्यासाठी दुर्गंधीनाशन (Deodorization) प्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी हे तेल पुन्हा दोनदा तापवले जाते. त्यामुळे तेलाची नैसर्गिक चव आणि गंध नाहीसा होतो. काही रिफाइंड तेलांमध्ये नंतर कृत्रिम स्वाद आणि सुगंध मिसळले जातात.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
*नैसर्गिक खाद्यतेलामुळे शरीराला चरबी आणि स्निग्धतेसोबतच प्रथिनेही मिळतात. पण, तेल रिफाइंड केल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात. शिवाय, उत्पादनवेळी होणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या तसेच अतिउच्च तापमानाच्या वापरामुळे असे तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याच्या नियमित आणि अतिरिक्त सेवनाने अनेक गंभीर विकार होऊ शकतात. स्थूलत्वासोबतच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि काही प्रमाणात कर्करोगाचा धोकाही त्यामुळे निर्माण होतो. शिवाय, हाडे आणि सांध्यांच्या व्याधी जडणे, विचार प्रक्रिया व आकलनक्षमतेवर परिणाम होणे अशी लक्षणेही दिसतात.
दहा टक्के कपात आरोग्यापेक्षा अर्थकारणासाठी जास्त उपयुक्त – डॉ. जगन्नाथ दीक्षित, स्थूलत्व आणि मधुमेहतज्ज्ञ भारत खाद्यतेलांच्या आयातीवर १.३१ लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यात १० % घट झाली तर ते अर्थकारणासाठी नक्कीच चांगले आहे. दुसरीकडे, अतिकर्बोदके असलेले, तसेच गोड, तेलकट, खूप प्रक्रिया केलेले पॅकेज्ड् अन्नपदार्थ, कोल्ड्रिंक यांचे वारंवार सेवन आणि व्यायामाचा अभाव ही भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची मुख्य कारणे आहेत. यात सर्वात जास्त वाटा कोल्ड्रिंक आणि प्रोसेस्ड् अन्नपदार्थांचा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांना व्यायामासाठी मोफत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याशिवाय, आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी विविध आरोग्य शिक्षण मोहिमा राबवणे, आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देणे आणि अनारोग्य पसरवणाऱ्या गोष्टींना कायद्याने चाप लावणे, या गोष्टी बिघडते आरोग्य सुधारण्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. आहारातील अतिरिक्त तेलामुळे वाढला अनेक व्याधींचा धोका – डॉ. शशांक शहा, संचालक, लॅप्रो ओबेसो सेंटर, पुणे देशात स्थूलत्वाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. तरुणांमध्ये एकूण कॅलरींचे प्रमाण वाढत आहे. आहारातील तेल कमी केल्यास ते घटू शकेल. कॅलरी नियंत्रणासाठी तेल कमी करण्यासोबतच आहारात फळे – पालेभाज्यांचे प्रमाण वाढवले पाहिजे. वारंवार उकळलेल्या तेलातील ट्रान्सफॅट हृदयाला हानिकारक ठरतात. शरीरात इन्फ्लमेशन वाढते, इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होऊन मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे अतिलठ्ठ असलेल्यांच्या आहारातील अतिरिक्त तेल कमी झाले, तर त्यांचे वजन आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी आपोआप नियंत्रणात येतात. अतिरिक्त तेल फॅट अर्थात मेदाच्या रुपामध्ये हृदयात, यकृतात गोळा होते. फॅटी लिव्हरमुळे वेगवेगळे स्त्राव तयार होऊन नवे आजार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील तेल कपातीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे पालन करणे सर्व भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. स्थानिक तेलाचा वापर वाढल्यास शेतकरी, उत्पादकांना होईल फायदा – ललित गांधी, अध्यक्ष, महा. चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आहारात देशी खाद्यतेलाऐवजी परदेशातून आयात केलेल्या रिफाइंड तेलांचा वापर खूप वाढला आहे. या तेलांच्या उत्पादनात होणारा रसायनांचा वापर अनेक आजारांना आमंत्रण देणारा तर आहेच; शिवाय आयातीमुळे आपल्या परकीय गंगाजळीलाही कात्री लावणारा आहे. आयात खाद्यतेलाचे प्रमाण १० टक्के कमी झाले, तरी दरवर्षी साधारण १५ ते २० हजार कोटींचे परकीय चलन वाचेल. स्थानिक तेलबियांपासून बनलेल्या तेलांचा वापर वाढला, तर तेलबियांचे उत्पादन वाढेल. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल आणि स्थानिक उत्पादकांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आहारातील रिफाइंड तेलाचा वापर कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन सर्वांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. भारतीयांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच देशाच्या खाद्यतेल उद्योगावर आणि तेलबिया उत्पादनावर याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल.



Source link