
देशातील ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. रतन टाटा यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्तावही कॅबिनेटच्या बैठकीत संमत करण्यात आला.