
जावेद साहेबांनी दोन दिवसांपूर्वी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्त खंडाळ्यातील ‘सुकून’ या आपल्या बंगल्यात त्यांनी काही खास लोकांना बोलावले होते. मी पत्नीसह तिथे पोहोचलो, तेव्हा आपणही त्या खास लोकांमध्ये आहोत, याची मला जाणीव झाली. त्यामुळे आ
.
जावेद साहेबांसोबत मी कितीतरी संध्याकाळी, रात्री अन् तास घालवले आहेत. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आठवणीत जपावा असा आहे. ते लिहायला बसलो तर पुस्तके तयार होतील, ऐकवू लागलो तर आठवडेही पुरणार नाहीत. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो, आजही शिकतो आहे. सारे जग त्यांच्या कविता, त्यांच्या नज्म, त्यांचे संवाद, त्यांची विनोदबुद्धी यावर फिदा आहे. त्यांच्या वाढदिवशी मला खूप काही आठवत होते, मी भावूकही झालो होतो.
मी मुंबईत आलो तेव्हा मी फारसे कुणाला ओळखत नव्हतो. ज्या दोन-चार लोकांनी मला प्रेम दिले, ज्यांच्यामुळे मला मुंबईत राहण्याचे बळ मिळाले, त्यापैकी एक जावेद साहेब होते. एका लहान शहरातला एक मुलगा एवढ्या मोठ्या शहरात आला होता. जावेद साहेब त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठे व्यक्ती होते, आजही आहेत. पण, ते माझे फोन घ्यायचे, मला घरी बोलवायचे. कधी घरी, कधी हॉटेलमध्ये खाऊ घालायचे. तासन् तास आपल्यासोबत बसवून घ्यायचे. अनेदका असे व्हायचे की, हॉटेलात बसलेलो असायचो आणि अगदी सकाळपर्यंत आमच्या गप्पा रंगायच्या. जो पुढे काही बनेल की नाही हेही माहीत नाही, अशा माझ्यासारख्या २०-२१ वर्षांच्या मुलाला ते आपल्यासोबत बोलवायचे, खाऊ घालायचे. हे खरे तर त्यांचे मोठेपण होते. मी एका खोलीत राहात होतो, तेव्हाही ते माझ्याकडे यायचे. मला अशा सगळ्या गोष्टी आठवताहेत. मी लेखनामध्ये, दिग्दर्शनामध्ये कुणाचा सहायक म्हणून काम केले नाही. मी फिल्मी मॅगेझीन वाचत नव्हतो; शिवाय त्या काळात इंटरनेट, लॅपटॉप असे काही नव्हते. जी गोष्ट मी पहिल्यांदा पाहिली-ऐकली ती म्हणजे एखाद्या कहाणीचे कथन. अशा नॅरेशनच्या बाबतीत मला थोडेफार माहीत होते. एखादी कहाणी सुरूवातीपासून शेवटपर्यंत सलगपणे ऐकवणे किंवा वाचून दाखवण्याला नॅरेशन म्हणतात, हे मी ऐकून होतो. पण, मी कधी प्रत्यक्षात असे नॅरेशन ऐकले नव्हते. मला आठवतेय, मी त्या काळात खूप त्रासलो होतो. लोक मला गांभीर्याने घेत नव्हते. मी भोपाळमध्ये नाटकात कामे करायचो, म्हणून मग इथेही पृथ्वी थिएटरमध्ये अॅक्टिंग करायला सुरूवात केली. मुंबईत पाय रोवण्यासाठी काही नाही जमले तर अॅक्टिंग करावी, असा विचार मी करत होतो.
त्या दरम्यान जावेद साहेबांचा ‘मैं आजाद हूँ’ हा सिनेमा तयार होत होता. त्यांनी मला हॉटेल हॉलिडे इनमध्ये बोलावले. म्हणाले, रूमी साहेब, आज मी तुम्हाला माझ्या सिनेमाचे नॅरेशन देतो. मी आतून खूप एक्साइट झालो. जावेद साहेबांनी मला तीन तास समोर बसवून प्रत्येक व्यक्तिरेखा आणि अगदी कॉमा, फुलस्टॉपसह इतके चांगले नॅरेशन दिले की, आख्खा सिनेमा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यादिवशी मला नॅरेशन कशाला म्हणतात आणि ते कसे देतात, हे समजले. जावेद साहेबांचे नॅरेशन तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. नॅरेशन ऐकवल्यावर ते म्हणाले, हा सगळा सिनेमा तुम्ही ऐकला आहे. यामध्ये काही तरुणांच्या भूमिका आहेत, काही डायलॉग आहेत. मला नाही वाटत की असे काम करुन तुम्हाला काही फायदा होईल. उलट नुकसानच होईल. मी ही कहाणी एवढ्यासाठीच ऐकवली की, मी तुमच्याबाबतीत गांभीर्याने विचार करत नाही, असे तुम्हाला वाटू नये. त्यांच्या बोलण्याने मी भावूक झालो. मनात विचार आला की, चला, जावेद साहेबांचे माझ्यावर इतके प्रेम आहे. ते माझा, माझ्या भल्याचा विचार करताहेत. मुंबईसारख्या शहरात आपल्याला साथ देणारे, आपल्या भल्याचा विचार करणारे लोक कुठं भेटतात? या गोष्टीवरून मला जावेद साहेबांनी लिहिलेला एक शेर आठवतोय… तुम ये कहते हो कि मैं ग़ैर हूँ फिर भी शायद निकल आए कोई पहचान ज़रा देख तो लो। जावेद साहेबांचे माझ्यावर किती प्रेम आहे, याचा प्रत्यय मला अनेकदा आला आहे. १९९७ मध्ये माझे लग्न झाले तेव्हा याची सर्वांत मोठी प्रचिती आली. माझे लग्न मुंबईत झाले आणि अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठे रिसेप्शन झाले, ज्याला सगळी फिल्म इंडस्ट्री आली होती. भोपाळमध्ये माझे मित्र मुकेश नायक यांच्या बंगल्यावर तिथल्या नातेवाईक आणि मित्रांसाठी एक रिसेप्शन ठेवले होते. मुंबईतील माझ्या रिसेप्शनच्या वेळी जावेद साहेब दिल्लीत होते आणि त्यांची रात्री दहाची शेवटची फ्लाइट चुकली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की, रूमी साहेब, माझ्याकडून मोठी चूक झालीय की मी तुमच्या रिसेप्शनला येऊ शकलो नाही. तुम्ही माझे भाऊ आहात आणि तुमच्या रिसेप्शनला मी येणार नाही, असे होऊ शकत नाही. तुमचे भोपाळचे रिसेप्शन कधी आहे? मी म्हणालो, २ नोव्हेंबरला आहे. त्यांनी सांगितले की, मी भोपाळला येऊन तुमच्या रिसेप्शनला हजेरी लावेन. त्या काळी मुंबईहून भोपाळला सकाळी ५.४० वाजता एकच फ्लाइट होती. त्यासाठी पहाटे चारला घरातून निघावे लागायचे. त्यावेळी जावेद साहेब सकाळी इतक्या लवकर उठत नसत, हे मला माहीत होते. ही फ्लाइट पकडण्यासाठी तर रात्रभर जागावे लागायचे.
मी भोपाळमध्ये आमच्या घरी झोपलो होतो. मला बहिणीने उठवले आणि जावेद साहेबांचा फोन आहे, असे सांगितले. मी लगेच फोन घेतला. जावेद साहेब म्हणाले, ‘रूमी साहेब, मी भोपाळला पोहोचलोय, अशोका हॉटेलमध्ये चेक इनही केलंय. मला सांगा, रिसेप्शन किती वाजता आहे आणि कुठं यायचंय?’ माझी झोपच उडाली. जावेद साहेब आले आहेत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी लगेच तयार झालो आणि त्यांना भेटायला हॉटेलवर गेलो. माझ्यावर किती प्रेम आहे, हे त्यांनी भोपाळला येऊन सिद्ध केले. त्यांचे हे प्रेम, ही साथ आयुष्यभर अशीच लाभावी, हीच माझी प्रार्थना. जावेद साहेबांसाठी त्यांनी लिहिलेले ‘मिस्टर इंडिया’तील हे गाणे ऐका… ज़िन्दगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा. परवा, १७ जानेवारीला जावेद अख्तर यांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. जावेद अख्तर यांचे नॅरेशन संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.