माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा ‘शोले’चा क्लायमॅक्स पुन्हा चित्रित करण्याची झाली होती तयारी!

0
1
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा ‘शोले’चा क्लायमॅक्स पुन्हा चित्रित करण्याची झाली होती तयारी!


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘शोले’च्या क्लायमॅक्सचे दृश्य, ज्यामध्ये ‘जय’ या पात्राचा मृत्यू होतो. हे दृश्य दुसऱ्यांदा चित्रित करण्याचा निर्णय घेतला गेला होता. 

अमजद खान यांना ‘शोले’ कसा मिळाला, हे मी तुम्हाला गेल्या आठवड्यात सांगितलं. हा एवढा मोठा चित्रपट होता आणि त्याचे इतके किस्से आहेत की ते एका भागात सांगणे अशक्य आहे. म्हणून आज ‘शोले’च्या आणखी एका किश्श्याबद्दल मी सांगणार आहे.

कदाचित तुम्हाला माहीत असेल की, शोले रिलीज झाला तेव्हा त्याला फ्लॉप ठरवण्यात आले होते. हा सिनेमा खूप मोठा आणि बराच खर्च केलेला होता. त्यामुळे सगळ्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सगळ्यांनी त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती. जावेद साहेबांनी मला सांगितले की, ट्रेड मॅगझिनने एक विशेषांक काढला होता. त्याचा विषय होता ‘शोले फ्लॉप का झाला?’ अमितजींनी मला सांगितले होते, की या सिनेमाच्या क्लायमॅक्समुळे सर्व जण खूप दुःखी आणि निराश झाले होते. सिनेमाच्या शेवटी ‘जय’ मरतो, हे प्रेक्षकांना पसंत पडले नसल्याचे सगळे सांगत होते. जयाजींनी जी विधवेची व्यक्तिरेखा साकारली होती, तिचा अमितजींनी साकारलेल्या ‘जय’शी विवाह झाला असता, तर कदाचित तो सिनेमाचा चांगला शेवट ठरला असता.

मग एक तातडीची मीटिंग बोलावण्यात आली. सलीम-जावेद, जी. पी. सिप्पीजी, रमेश सिप्पीजी इ. सर्व जण जमले. या सर्वांनी चर्चा करुन ठरवले की, बेंगलोरला जायचे आणि रामगढला पोहोचून शेवटचे दृश्य पुन्हा चित्रित करायचे. आधीच्या जागी हा क्लायमॅक्स जोडून शक्य तितक्या लवकर फिल्म प्रिंट करून त्या देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पोहोचवायच्या. तयारी सुरू झाली, पण संपूर्ण युनिट इतक्या कमी वेळात मुंबईहून बेंगलोरला नेणं शक्य नव्हतं. मग बेंगलोरवरुनच युनिट मुंबईला बोलावण्याची तयारी सुरू झाली. त्याचवेळी, सलीम-जावेद यांनी ट्रेड मॅगझिनमध्ये स्वत:च्या वतीने एक जाहिरात दिली की, ‘शोले’ने प्रत्येक टेरिटरीमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय केला, तर आम्ही लेखन बंद करू. तेव्हा प्रत्येक टेरिटरीत सिनेमाचा एक कोटीचा व्यवसाय होणे ही अशक्य गोष्ट होती. जावेद साहेबांनी सांगितले की, आम्ही चुकीचे सिद्ध झालो. ‘शोले’ने प्रत्येक टेरिटरीत एक कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केला. त्यांचा आत्मविश्वास पाहून रमेश सिप्पीजी म्हणाले की, सोमवारच्या रात्रीपर्यंत आणखी वाट बघू, काही कलेक्शन वाढले तर ठीक, नाहीतर बेंगलोरला जाऊन नवा क्लायमॅक्स चित्रित करू. पण, सोमवारपासून कलेक्शन असे वाढत गेले की ‘शोले’ने चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. याच गोष्टीवरुन मला अजीज नबील यांचा एक शेर आठवतोय…

क़लम है हाथ में

किरदार भी मिरे बस में

अगर मैं चाहूँ कहानी

बदल भी सकता हूँ।

जावेद साहेबांनी मला सांगितले… हा सिनेमा पाहिल्यावर त्यावेळचे एक मोठे अभिनेते मला म्हणाले की, हा सिनेमा चालणारच नाही. मला सांगा, एखादा आपल्या मित्राचे स्थळ घेऊन त्याच्या प्रेयसीच्या मावशीकडे जातो आणि तिथं जाऊन मित्राची निंदानालस्ती करत असेल, तर तो संबंध जोडायला गेलाय की बिघडवायला? ज्या सिनेमात असे सीन आहेत, तो चालूच शकत नाही. पण बघा, सिनेमा चाललाच आणि त्यातील प्रत्येक छोट छोटेे पात्रही सुपरहिट झाले. एवढंच नव्हे, तर मावशीचा तो सीनही संस्मरणीय झाला. हा एकमेव असा सिनेमा आहे, ज्यामध्ये गर्दीतील लोक आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांचे डायलॉगही हिट झाले. उदाहरण द्यायचे तर.. वीरू पाण्याच्या टाकीवर चढतो आणि ‘सुसाइड.. सुसाइड’ ओरडतो, तेव्हा खाली उभा असलेला गावकरी विचारतो, ‘भाई, ये सुसाइड क्या होता हैं?’ त्यावर दुसरा उत्तर देतो, ‘अंग्रेज लोग जब मरते हैं, तो उसको सुसाइड कहते हैं।’ यावर पहिला म्हणतो,‘लेकिन अंग्रेज लोग मरते क्यों हैं?’ मग धर्मेंद्रजींचे पात्र म्हणते, ‘गुड बाय, गुड बाय..’ तेव्हा एक गावकरी विचारतो, ‘भाई, ये गुड बाय क्या होता हैं?’ त्यावर दुसरा म्हणतो, “अंग्रेज लोग जब जाते हैं, तो गुड बाय बोलते हैं।’ पहिला गावकरी पुन्हा विचारतो, ‘मगर अंग्रेज लोग जाते कहाँ हैं?’

जावेद साहेबांनी सांगितले होते की, मूळ स्क्रिप्टमध्ये हे डायलॉग नव्हते. मी बेंगलोरहून मुंबईला येत असताना विमानतळावर गाडीतून खाली उतरलो, तेव्हा असिस्टंट खलिश साहेब म्हणाले, ‘रमेश साहेबांनी सांगितलंय की टाकीच्या दृश्यात खाली उभ्या गावकऱ्यांच्या काही रिअॅक्शन लिहिल्या असत्या तर चांगले झाले असते.’ जावेद साहेबांनी त्याच क्षणी गाडीच्या बोनेटवर कागद ठेवून हे डायलॉग लिहून दिले होते. ते संस्मरणीय झाले आहेत. या गोष्टीवर ‘शोले’तील हे गाणे ऐका…

कोई हसीना जब

रूठ जाती हैं तो,

और भी हसीन

हो जाती हैं…

स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link