माझ्या हिश्श्याचे किस्से: लगान – जावेद अख्तरपासून ते अमिताभपर्यंत… सर्वांनी केली होती ‘फ्लॉप’ होण्याची भविष्यवाणी

0
1
माझ्या हिश्श्याचे किस्से: लगान – जावेद अख्तरपासून ते अमिताभपर्यंत… सर्वांनी केली होती ‘फ्लॉप’ होण्याची भविष्यवाणी


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘लगान’ने गेल्या वर्षी २१ वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने आमिर खान यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह संपूर्ण टीमला आपल्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले होते, त्या वेळचे छायाचित्र.

जावेद साहेबांनी मला सांगितले की, आशुतोषने यामध्ये गरिबी, उपासमारी, दुष्काळ अशा गोष्टी घातल्या होत्या, ज्या लोकांना चित्रपटात पाहायला आवडत नाहीत. आणि गाण्यांचे प्रसंग तर पाहा.. पाऊस येत नाही म्हणून गाणे, क्रिकेट खेळताना गाणे, भजन… म्हणजे कोणतीच अशी गोष्ट यात नव्हती, ज्यामुळे हा चित्रपट, त्याचे संगीत चालेल…

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक चित्रपट बनले, परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच चित्रपटांनी ज्यांनी इतिहास रचला. अशा मोजक्या चित्रपटांपैकी एक होता ‘लगान’. माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज तुम्हाला ‘लगान’बद्दल काही सांगण्याची माझी इच्छा आहे.काही दिवसांपूर्वी ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो. त्या वेळी आशुतोष यांनी सांगितले की, आमिर खान यांनी कथा ऐकून हा चित्रपट करण्यास नकार दिला होता, वास्तविक, आमिर आणि आशुतोष यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकमेकांना चांगले ओळखतही होते, मित्र होते. आमिरने आशुतोष यांच्या ‘बाजी’ या चित्रपटात कामही केले होते. पुढे आशुतोष हे कथानक घेऊन अभिषेक बच्चनकडे गेले. पण, जे. पी. दत्तांचा ‘रिफ्युजी’ साइन केला असल्याने त्यांनीही नकार दिला. आशुतोष यांना मात्र आपल्या स्क्रिप्टवर आणि त्यापेक्षाही स्वतःवर इतका विश्वास होता की, त्यांनी पुन्हा आमिरकडे जाऊन प्रयत्न करण्याचे ठरवले. ते आमिरकडे गेले आणि ही कथा पुन्हा एकदा ऐकावी, असे त्यांना सांगितले. आमिर यांनी कथा पुन्हा ऐकली. या वेळी ते अगदी उत्साहित झाले आणि म्हणाले की, या चित्रपटात मी भूमिका तर करेनच, पण त्याची निर्मितीही मी स्वत: करेन. आणि मग एका ऐतिहासिक चित्रपट बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

आशुतोष यांनी चित्रपटाच्या प्रत्येक विभागावर काम करायला सुरुवात केली. प्रॉडक्शन डिझाइन, कॉश्च्युम डिझाइन, लूक डिझाइन, संगीत.. प्रत्येक ठिकाणी त्यांनी जीव लावून मेहनत घेतली. जावेद साहेबांनी मला सांगितले, ‘जेव्हा मला लगानसाठी गाणी लिहिण्यास सांगितले गेले आणि सगळी कथा ऐकली तेव्हा मी अस्वस्थ झालो. हा खूप मोठा फ्लॉप चित्रपट ठरणार. असेच मला वाटले. चित्रपटात ज्या गोष्टी नसायला हव्या होत्या, त्या सगळ्या आशुतोषने यात टाकल्या होत्या. उदा. खेडेगावावर आधारित चित्रपट चालणार नव्हता. आता आधुनिक काळ आहे, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ‘कुछ कुछ होता है’ नंतर चित्रपटांचा लूक आणि कॅरेक्टर, सगळेच बदलले होते. अनिवासी भारतीयांना समोर ठेवून चित्रपट बनवले जात होते. त्यामुळे गावांवर आधारित चित्रपट चालणार नाही असे मला वाटत होतेे. आता लोकांना धोती-कुर्त्यातला हीरो आवडणार नाही. तो दिलीपकुमार यांचा काळ होता आणि तेेव्हा धोती-कुर्तावाला हीरो चालून जायचा. आणखी एक अडचण म्हणजे हे ब्रिटिशकालीन कथानक होते. ते नव्या पिढीला आवडले नसते. आणि क्रिकेटवरचा चित्रपट तर आजवर कधी चालला नाही. त्यामुळे त्यावर चित्रपट बनवूच नये. आशुतोषने यामध्ये गरिबी, उपासमारी, दुष्काळ यांसारख्या गोष्टी घातल्या होत्या, ज्या लोकांना चित्रपटात पाहायला आवडत नाहीत. आणि गाण्यांचे प्रसंग तर पाहा.. पाऊस येत नाही म्हणून गाणे, क्रिकेट खेळताना गाणे, भजन… म्हणजे कोणतीच अशी गोष्ट यात नव्हती की, ज्यामुळे हा चित्रपट चालेल किंवा याचे संगीत चालेल असे वाटावे.

’मला अजूनही चांगले आठवतेय. त्या वेळी माझा ‘हम किसी से कम नहीं’ हा चित्रपट तयार होत होता. त्यात बच्चन साहेब होते. बच्चन साहेब मला म्हणाले होते, ‘यार, हे आशुतोष गोवारीकर, आमिर खानसोबत एक चित्रपट बनवताहेत आणि मला त्यात व्हॉइस ओव्हर द्यायला सांगताहेत.. मी त्यांना समजावून सांगतोय की, आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या चित्रपटात मी व्हॉइस ओव्हर दिला, ते कधी चाललेच नाहीत. मी खूप समजावलं, पण ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळं मी व्हॉइस ओव्हर द्यायचं ठरवलं आहे.’ म्हणजे ‘लगान’मध्ये अशी प्रत्येक गोष्ट करण्यात आली, ज्यामुळे चित्रपट चालत नाहीत. जावेद साहेब मला म्हणाले होते, ‘नासीर हुसेन साहेबांमुळे आमिरशी माझे जुने नाते होते. त्यामुळे मी आमिर खानशीही बोललो, त्याला समाजवले की हा चित्रपट बनवू नको. पण, बरं झालं, आमिरने माझे ऐकले नाही आणि चित्रपट बनवला.

‘लगान’ हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर ती आशुतोष गोवारीकर यांची जिद्द होती. या गोष्टीवर मला शकील आज़मी यांचा एक शेर आठवतोय…

हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है।

आशुतोष यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येकाने यात काम केले. जावेद साहेबांनी गाणी लिहिली, बच्चन साहेबांनी व्हॉइस ओव्हर दिला, रेहमाननी संगीत दिले, आमिरने अभिनय केला आणि “लगान’ने इतिहास रचला. जगभरात भारताचा सन्मान झाला. फिल्मफेअरपासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत, अगदी ‘ऑस्कर’पर्यंत हा चित्रपट गेला आणि आशुतोष गोवारीकरांनी ‘लगान’द्वारेच स्वतःची ओळख निर्माण केली. ‘लगान’मधील हे गाणे ऐका…

बार बार हाँ, बोल यार हाँ,अपनी जीत हो, उनकी हार हाँ।

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

(चुकीची दुरुस्ती : गेल्या रविवारी या सदरात दिलेल्या शेरमध्ये ‘ख़ुद’ऐवजी ‘ख़ुदा’ शब्द प्रसिद्ध झाला होता. त्याबद्दल आम्हाला खेद आहे.)



Source link