
यंदा राज्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं अनेक भागातील पिके करपू लागली आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान,राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.






