
ज्ञानेश्वर मुळे13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केरळमध्येही भ्रष्टाचार आहे, पण त्याचबरोबर जनतेची कामे होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ही जनता आपल्या प्रश्नाबाबत गंभीर आणि सतर्क आहे. ती लोकप्रतिनिधींवर दबाव टाकते. आपल्यासारखे लोकप्रतिनिधींना अव्वाच्या सव्वा महत्त्व दिल्याचे इथे दिसत नाही.
पाऊस धो धो कोसळत होता. इतका की, हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून फारसे काही दिसतही नव्हते. ढग भरून आले होते, दिवसा अंधारून आले होते. खाली रस्त्यावर वाहनांची वाहतूक मात्र नेहमीप्रमाणे सुरू होती. सतत पाऊस पडत असूनही एकदाही वीज गेली नाही आणि सगळे व्यवहार व्यवस्थित सुरू होते. मॉन्सून लवकर आला म्हणून शहर कोलमडले नाही. त्यामुळे आमच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्याची गरज वाटली नाही.
हे आहे केरळमधील कोची किंवा कोचीन. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे की, राज्याराज्यांत काही समानता आणि अनेक फरकही जाणवतात. हे फरक जसे प्रशासनात दिसतात, तसे माणसांच्या स्वभावातही जाणवतात. केरळचे वैशिष्ट्य हे आहे की, चार कोटींच्या या राज्यातील जवळपास एक कोटी म्हणजे २५ टक्के लोक विदेशात आहेत. विदेशात साधारण साडेतीन कोटी भारतीय राहतात, त्यात एक कोटी मल्याळी लोक आहेत. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे पंजाबी, गुजराथी, राजस्थानी, तेलुगु या राज्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात विदेशात स्थायिक झाले आहेत? मराठी माणूस आजही फार अल्प प्रमाणात विदेशात दिसतो. मॉरिशस आणि इस्रायल सोडल्यास अन्य ठिकाणी तर त्यांची संख्या अत्यल्प आहे. आपल्या लोकांचं म्हणणं असतं की, महाराष्ट्रात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले लोक बाहेर जात नाहीत. पण, याही पलीकडे जाऊन काही कारणे असतील आणि त्यातले एक कारण म्हणजे, मराठी माणूस हा बऱ्यापैकी अंतर्मुख झाला आहे आणि तो अल्पसंतुष्टही आहे. याच कारणाने आजही आपल्याला मोठे मराठी उद्योगपती तुरळक प्रमाणात दिसतात. सतराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत संपूर्ण देशावर प्रभाव टाकणाऱ्या मराठी माणसाचे हे अंतर्मुख होणे कोड्यात टाकणारे आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत केरळच्या एकूण उत्पन्नाच्या ३७ टक्के हे विदेशातून मल्याळी लोकांनी पाठवलेल्या रकमेचे होते. आता ही रक्कम कमी होऊन १३ टक्क्यांवर आली आहे. कारण केरळ बदलत चालला आहे आणि तरुणांमध्ये आखाती देशात जाण्यासाठी पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही. शिवाय, आखाती देशात मिळणाऱ्या आणि केरळमध्ये मिळणाऱ्या पगारात फारसा फरक राहिलेला नाही. विदेशात जाण्यासाठी मानसिक किंमत द्यावी लागते, कुटुंबापासून दूर जावे लागते. तरुण पिढीमध्ये स्वत:चा उद्योग असावा, असा विचार वाढला आहे.
केरळमध्ये फिरताना, रस्त्यावर असो वा मॉलमध्ये; आर्थिक संपन्नता स्पष्टपणे जाणवते. माझ्या वास्तव्यात तिथे एकही भिकारी किंवा फाटलेल्या कपड्यात फिरणारी व्यक्ती मला दिसली नाही. विमानतळापासून हॉटेलपर्यंत नेणाऱ्या रस्त्यापर्यंत एकही छोटा किंवा मोठा खड्डा असल्याचे जाणवले नाही. इथले विमानतळही इतर विमानतळांसारखे काचेच्या पेटीसारखे दिसत नाही. त्याला एक मंगलोरी कौलारु व्यक्तिमत्व आहे. या विमानतळावर विश्वास बसणार नाही इतके मोठे टर्मिनल आहे. कोचीमधून अनेक देशांत विमाने जातात आणि त्यामुळे विमानतळ प्रवाशांनी खच्चून भरलेले दिसते.
माझ्याबरोबर असणाऱ्या हरिकृष्ण या युवकाचे विचार ऐकताना मला केरळमधला युवक हा अत्यंत जागृत असल्याचे जाणवले. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तीनही समुदायांची लोकसंख्या असणाऱ्या केरळात अजून तरी अपवादानेच वाद – प्रतिवाद किंवा दंगली होतात. इथे भ्रष्टाचार आहे, पण त्याचबरोबर जनतेची कामे होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ही जनता आपल्या प्रश्नाबाबत गंभीर आणि सतर्क आहे. ती लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्यात यशस्वी होते. आपल्यासारखे लोकप्रतिनिधींना अव्वाच्या सव्वा महत्त्व दिल्याचे इथे दिसत नाही. माझ्या एका कार्यक्रमाला स्थानिक आमदार आले होते. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने या आमदारांचे नाव घेईपर्यंत ते तिथे उपस्थित आहेत, हेही अनेकांना कळले नसेल. त्यांचे भाषण तीन मिनिटांचे होते आणि तेही त्यांनी वाचून दाखवले. या लहानशा गोष्टीतूनही केरळची संस्कृती कळते.
केरळच्या संपन्नतेचा एक भाग म्हणून तिथल्या मॉलकडे पाहता येईल. अतिशय भव्य असे मॉल तर आहेतच; पण भारतातील सर्वात विशाल मॉलही केरळमध्येच आहे. अशाच एका मॉलमध्ये भटकताना मला तिथे फार मोठे पुस्तकाचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र दिसले. इतकेच नव्हे, तर अनेक आबालवृद्ध उभे राहून त्या पुस्तकांचा आनंद घेत होते.
दिल्लीतील मॉलमध्ये पुस्तकांचे दुकान पाहिल्याचे मला आठवत नाही. मल्याळी लोक मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतात. पण, नव्या पिढीमध्ये हळूहळू पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी होत आहे, हेही मी ऐकले. आणखी एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे या ठिकाणी नेत्यांचे, मग ते केंद्रातले असो किंवा राज्यातल्या असो; पोस्टर्स किंवा जाहिराती अजिबात दिसल्या नाहीत. ही एक डोळ्यांना समाधान देणारी गोष्ट होती. वाहतुकीत लेन सोडून इकडेतिकडे वाहन चालवणारेही मला दिसले नाहीत आणि हॉर्न नावाचा प्रकार ऐकायला मिळाला नाही. धर्म आणि राजकारण याविषयी जवळपास कोणीही चर्चा केली नाही. त्यात कुणालाही फारसा रस दिसला नाही.
ज्ञानेश्वर मुळे dmulay58@gmail.com