डायरीची पाने: नवं साल, नवा गडी

0
1
डायरीची पाने:  नवं साल, नवा गडी




नव्या सालगड्याला पाडव्याच्या संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला त्या दिवशी बनवलेले कानवले खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. पाडव्याला घराघरावर गुढ्या उभारल्या जातात. याच दिवशी शेतकऱ्यांचं नवं वर्ष सुरू होत असतं. आमच्या गावात महानुभावीय दत्त मंदिर आहे. पाडव्याच्या दिवशीच या मंदिराच्या कळसावर निशाण म्हणजे पताका लावण्याची पद्धत आहे. ही शुभ्र पांढऱ्या कपड्याची पताका असते. घराघरातून अशा पताका घेऊन, सनई आणि हलगीच्या सुरात, गावातून सगळ्या लोकांची मिरवणूक निघते. इतक्या सगळ्या पताका मंदिरावर कशा लावणार? म्हणून लोक मंदिराशेजारच्या झाडा-झाडांवर जागा मिळेल तिथे पताका लावतात. त्यामुळे पूर्वी मंदिराभोवतीची झाडेही या पताकांनी पांढरी होऊन जात. जणू काही त्यावर बगळ्यांचे थवे बसले आहेत, असे वाटावे. पाडव्याच्या दिवशीच मंदिरात सगळे गावकरी जमा व्हायचे आणि तेथेच सालगडी ठरवले जायचे. ज्याला कुणाला जुना मालक सोडायचा आहे, असा सालगडी नवा मालक धरीत असे आणि ज्याला कुणाला जुना गडी सोडायचा आहे, असा मालक नवा गडी धरीत असे. त्यांचं साल, सालचंदी आणि बाकीच्या बोलाचाली इथेच होत असत. सगळ्यांसमोर हे ठरवलेलं असल्यामुळं एका अर्थाने गाव पंचायतीच्या मान्यतेची मोहरच त्यावर उमटलेली असायची. नंतर वर्षभर गडी काही कामचुकारपणा करू लागला, तर त्याला जाब विचारता यायचा. पण मला आठवतं, असं फार क्वचित होत असे. शक्यतो आधीचेच सालगडी जुन्या मालकांकडं नव्याने साल धरीत असत आणि वर्षभर राबत असत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच मालकाकडं काम करणारे सालगडी त्या काळात होते. इतकंच नव्हे, तर आमच्या चुलत्यांच्या शेतात कामावर असलेल्या सोयऱ्या मामा नावाच्या गड्याने तर संपूर्ण आयुष्य तिथेच काढलं. ते आप्तच लागत असल्यामुळं त्यांना सगळे सोयऱ्या मामा असंच म्हणायचे, तर त्यांच्या पत्नीला सगळा गाव सोयरी मामी म्हणत असे. हे जोडपं आमच्याच घरातल्या एका बाजूला राहायचे. यांना अपत्य नव्हते. त्यांचे साल काय ठरत असे? ते पैसे कुठे ठेवत असत? यांची काही जमापुंजी होती का? बँकेचं खातं होतं का? याची काही माहीत नाही. बहुदा यातलं काही नसावंच, असं मला वाटतं. कारण या सोयऱ्या मामाचं निधन आमच्या चुलत्याच्या घरात झाले आणि आमच्या गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सोयऱ्या मामांवर मी एक कविताही लिहिली आहे. कृषी संस्कृतीमध्ये एक काळ असा होता की कामावर राहिलेला सालगडी आयुष्यभर साल सोडत नसे. आणि आज असाही एक काळ आला आहे की बहुतांश सालगडी कधीच साल शेवटाला नेत नाहीत. एकतर मधूनच पैसे घेऊन पळून जातात किंवा ‘मला तुमच्या घरचे काम निभत नाही,’ असं सांगून निघून जातात. सगळेच शेतमालक हैराण आहेत. माणसांना कामं मिळेनाशी झाली आहेत आणि कामांना माणसं मिळेनाशी झाली आहेत. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. असे कशामुळे झाले? याविषयी चिंतन करावे लागेल. हे चिंतन निरपेक्ष असायला हवे. ते मालक आणि नोकर या दोघांच्याही बाजू समजून घेणारे असले पाहिजे. पण, आज या विषयी कुठली तरी एकच बाजू घेऊन विचार मांडले जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला ते मान्य नसतात. दोन्ही बाजूंचा विचार करून कुठे तरी मेळ बसवायलाच हवा. कामं पडलेली आहेत आणि माणसंही रिकामी आहेत. तेव्हा या दोघांना एकत्र आणणारी काही तरी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. परिस्थितीत असणारे दोष दूर करायला हवेत. माणसं माणसाजवळ यायला हवीत. म्हणजे माणसं कामाजवळही येतील. माणसं माणसाजवळ यायची असतील, तर सर्वांना निरपेक्ष माणुसकी जपावी लागेल. पाडव्याच्या दिवशी मंदिरात केवळ सालगडीच ठरत असे नाही, तर इतरही अनेक गोष्टी ठरायच्या. गावाचे काही निर्णय घेतले जायचे. गावात काही महानुभाव साधू भिक्षा मागायला येत. त्यांना त्या दिवशी तिथे भिक्षा कबूल करून नंतर ती दिली जायची. असे काही सार्वजनिक निर्णय मंदिरात घेतले जात. सगळ्यांनीच घरून येताना एकेक नारळ आणलेला असे. तो देवासमोर फोडला जाई. त्यासोबत गुळ किंवा साखर असे. ती वाटली जायची. पाडव्याचं असं सार्वजनिक रूप साजरं केलं जायचं. यावर्षी ठरलेल्या नव्या सालगड्याला संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं जायचं. त्याला खास त्या दिवशी बनवलेले कानवले वाढले जायचे. कानवले हा ग्रामीण भागात बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे. कणीक लाटून, त्यात करंजीसारखं खसखशीचं गोड सारण भरून मग त्याला तव्यावर भाजायचं. त्या सारणात गुळ असल्यामुळं आपोआपच त्याच्यात पाक तयार होऊन तो पोळीत मुरायचा. ही एका अर्थाने मोठ्या आकाराची पण पसरट करंजीच म्हणायची. कारण या कानवल्याचा आकार अर्धगोलाकार असे. हा चविष्ट कानवला तुपासोबत खाल्ला जायचा. सालावर ठेवलेल्या गड्याला हा गोड पदार्थ खाऊ घालून आपल्या कुटुंबात दाखल केलं जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो कामावर येत असे. आम्ही मंदिरातून मांडव राखण्यासाठी परस्पर शेतावर निघून जायचो. दुपारी मोठा भाऊ आमच्यासाठी गावाकडून कानवले घेऊन यायचा. दुपारच्या प्रहरी शेतातल्या मांडवात बसून, बैलाच्या पाठीला पाठ लावून मस्तपैकी हा कानवला खाणे आणि मांडवाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या बिनगीतलं थंडगार पाणी पिणे, याच्यासारखं सुख नाही! हे सुख पाडव्याच्या दिवशी आणखीनच गोड व्हायचं. या कानवल्याची चव खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहायची. पण, असा कानावला अध्येमध्ये खाऊ वाटला म्हणून कुणीही करून खात नसत. त्यासाठी पुन्हा पुढच्या वर्षीचा पाडवाच यावा लागायचा. पुरणाच्या पोळ्या, तिळगुळाच्या पोळ्या वर्षभरात कधी खाव्याशा वाटल्या, तर आपण अजूनही त्या करून खातो. पण, कानवला कुणी असा अधूनमधून करून खाल्लाय, असे आठवत नाही. तो फक्त आणि फक्त पाडव्याच्या दिवशीच बनवला आणि खाल्ला जायचा. तो त्याचा मान असायचा. बाकी पाडव्याच्या इतर गोष्टी सगळीकडं सारख्याच असल्यामुळं त्यांची इथे उजळणी करण्याची गरज नाही. (संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link