कबीररंग: यह संसार कागद की पुडिया, बूँद पडे घुल जाना हैं…

0
2
कबीररंग:  यह संसार कागद की पुडिया, बूँद पडे घुल जाना हैं…


हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘संसार’ हा शब्द आपण कितीएक वेळा उच्चारत असतो. एखाद्या गृहस्थ असलेल्या मित्राची विचारपूस करताना त्याला आपण सहज विचारतो की, ‘कसा चाललाय संसार?’ कधी कधी आपण आपल्या दैनंदिन कामकाजाला कंटाळतो, वैतागतो. मनात येतं.. ‘अगदी वीट आला आहे या संसाराचा!’ आपल्याला असा अनुभव येतो, तेव्हा काय आशय असतो ‘संसार’ या शब्दाचा? ‘संसार’ म्हणजे पत्नी – मुलं, घर, धन, बाजार आणि दुकान असतं का? की आणखी याहून अधिक काही वेगळं असतं? कबीरांच्या दृष्टीतला, बोधातला ‘संसारा’चा अर्थ जाणून घेणं आपल्यासारख्या सांसारिकांसाठी खूप हिताचं आहे. कारण संसाराची स्पष्टता असणं ही गोष्ट मनाची भ्रान्ती जाणून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. मन भ्रांतिमुक्त असल्याशिवाय मुक्तिधाम आपल्या दृष्टीत उतरणार नाही. मुक्तीची उत्कट आस आपल्या हृदयाला लागणार नाही. कबीर अत्यंत उत्कट होऊन गातात…
रहना नहिं देस बिराना हैं…
कबीरांच्या एका आर्त पदातली ही ओळ आपल्या हृदयाला स्पर्श करते. देह वास करतो, मन वास करतं ते ठिकाण, तो देश कबीरांना वैराण वाटतो. तिथं त्यांना राहावं वाटत नाही. कबीरांना देहा-मनानं निर्मिलेल्या देशाचा कंटाळा आला आहे का? वैताग किंवा वीट आला आहे का? की याहून वेगळा भाव त्यांच्या हृदयात आहे? कबीर या पदाच्या पुढल्या ओळीतून आपल्या हृदयीचा भाव गडद करतात…
यह संसार कागद की पुडिया।

बूँद पडे घुल जाना हैं।।
कबीरांच्या या ओळींवरून त्यांना देहा-मनाचा देश वैराण का वाटतो आणि तिथं का राहावं वाटत नाही, ते आपल्या ध्यानात येतं. संसार म्हणजे कामना असते. कामना म्हणजे सुख मिळवण्याची इच्छा. या देहभोगाच्या इच्छांनी मन पूर्ण भरून गेलेलं असतं. इच्छा संपत नाहीत आणि मन काही मोकळं होत नाही. मनाची ही स्थिती आयुष्यभर असते. कुठल्याही सुखाची आस मनावेगळी होत नाही. सुखाची मागणी करणारं देहा-मनाचं भिक्षापात्र जवळ नसतं, तेव्हा संसार क्षणभंगुर वाटतो, अशाश्वत वाटतो. हे सुखाच्या इच्छेचं जग म्हणजेच हा संसार कसा असतो, हे कबीर खूप तळमळीनं व्यक्त करतात. एखादी कागदाची पुडी असावी तसा हा संसार असतो. कागदाची पुडी म्हणजे आपला देह असतो आणि पुडीतली वस्तू म्हणजे सुख मिळवण्याची इच्छा असलेलं मन असतं. एका थेंबाचा स्पर्श व्हायचा अवकाश की कागद, बांधणी आणि आतली वस्तू पाण्यात मिसळून जाते. पुडीतली वस्तू आपलं असणं गमावते. इंद्रियांनी निर्माण केलेल्या संवेदना कितीही मनानं ताब्यात ठेवू पाहिल्या, तरी त्या निसटून जातात.
कबीर म्हणतात…
यह संसार कांट की बाडी।
उलझ-पुलझ मरि जाना है।।
कबीरांच्या दृष्टीत हे देहसुखाच्या इच्छांनी व्यापून राहिलेलं मनाचं जग काटेरी वन असतं. बोटांवर मोजता येतील एवढ्याच इच्छा पुऱ्या होतात; तर असंख्य अपुऱ्या राहतात. त्यांचाच हा संसार म्हणजे काटेरी वन असतं. हे सारं जाणिवेत येण्याआधी जीव क्षणिक गंधांच्या लालसेनं या काट्यांच्या वनात अडकतो. आपल्या स्वाभाविक फुलण्याला मुकतो. काट्यांच्या वनातून बाहेर पडणं जीवासाठी असंभव असतं का? सुखाची आस या काट्यांतून त्याला बाहेर पडू देत नसते का? जीव काट्यांतच का अडकून राहतो?
यह संसार झाड और झांखर।
आग लगे बरि जाना है।।
आणखी एका दाखल्याच्या आधारे सुखेच्छेच्या जगाचं क्षणिक असणं कबीर आपल्याला समजावून सांगतात. संसार हा झाडझाडोऱ्यासारखा असतो. हिरवा असेतोवर उपयोगी असतो आणि वाळला की त्याचं सरपण होतं. आपली इंद्रिये जोवर कार्यशील असतात, तोवर सुखाचा लाभ होतो. निष्क्रिय झाली की तीच अग्निसंस्कारासाठी तयार असतात. आपण निर्मिलेल्या संसाराची गत ही अशी असते. कबीर या संसाराच्या बोधातून आपल्यासाठी एक स्थिती निर्देशित करतात.
एकदा का या संसाराची भ्रान्तस्थिती आपल्याला उमजली, तिचं स्वरूप ध्यानात आलं की अधिक सुखाची धाव संपून जाते. संसार आपल्या आत असतो. तो बाहेर कुठंही नसतो, हे उमजतं. अनंतानं ठेवलेल्या स्थितीची जाणीव मग आपल्या हृदयात उमलू लागते. स्वतःतलं अपुरेपण हेच या संसारात असण्याचं कारण असतं, ही शहाणीव आपलं हृदय सद्गुरूनामाशी जोडते…
कहत कबीर सुनो भाइ साधो।
सतगुरूनाम ठिकाना हैं।।
आपल्याच ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या कोषातून बाहेर पडत, स्वतःतल्या परिस्थितीनिरपेक्ष आनंदाला प्राप्त होणं, हे मुक्त होणं आहे. कबीर याच स्थितीला ‘सद्गुरूनाम ठिकाना’ म्हणतात. इच्छांनी न बांधलेलं हे आपल्याच असण्याचं शुद्ध स्मरण, आपलं मुक्तिधाम असतं. ‘रहना नहिं देस बिराना हैं..’ या पदातून संसाराची भ्रान्तस्थिती कबीर सूचित करतात. आपल्याला देहाच्या आणि मनाच्या पलीकडला सद्गुरूनामाचा आत्मदेश दाखवतात.

(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)



Source link