कबीररंग: मेरा मुझ में कुछ नहीं…

0
14
कबीररंग: मेरा मुझ में कुछ नहीं…


हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणूस समाजात अनेक नातेसंबंधांसह वावरतो. त्याला संपर्कात राहणं, अनेकांशी व्यवहार करणं आवडतं. कधी अपरिहार्यतेतून, तर कधी उपयुक्ततेतून हे व्यवहार घडत असतात. देवघेवीचे असे कितीएक व्यवहार तो शब्दांतून पार पाडतो. माणसाच्या असण्याचा आवाका हा त्याच्या समाजशील वृत्तीतून जन्मला आहे. तो समानशील माणसांच्या सहवासाचा अनुभव घेतो; तसंच स्वभावतः आपल्याहून भिन्न असलेल्या माणसांचाही अनुभव घेतो. आपली सुख-दुःखं आणि क्वचित कधी हृदयाला ओझरता स्पर्शून गेलेला आनंद त्याला दुसऱ्याला सांगावासा वाटतो. तो सांगतोही. त्याचं दुसऱ्याला सांगणं कधी त्याला अनुभवातून मोकळं करतं, तर कधी बांधून टाकतं. अनुभवाचं कथन त्याला बांधून टाकतं तेव्हा तो आंतरिक वेदनेनं एकाकी होतो. हे एकाकीपण निरर्थक नसतं. इथंच त्याच्या हृदयाला अज्ञातातून पुढं-पुढं चालत राहणाऱ्या आध्यात्मिक सांगातीची ओढ वाटू लागते.

माणसाचा दुसऱ्या एका माणसाशी किंवा अनेकांशी असलेला नुसता संपर्क महत्त्वाचा नसतो. अशा संपर्काला बहुतेक वेळा व्यावहारिक उपयुक्ततेची पार्श्वभूमी असते. पण, आपलं असणं केवळ उपयुक्ततेशी जोडलेलं नसतं. अस्तित्व म्हणजे सर्जन असतं. निर्माण करणारा दुसरा कोणीही नसतो, हे ध्यानात येतं तेव्हा भौतिक जगापलीकडल्या व्यवहाराची, संवादाची तातडी तीव्रतेनं जाणवायला लागते. इंद्रियगत सुखांच्या पलीकडंही एक सुख आहे, याची खूण दृष्टीत तरळू लागते. ही खूण केवळ मनाच्या शांततेची मागणी करत नाही. मनाला आता नुसत्या तणावरहित अवस्थेचं आकर्षणही वाटत नाही. हे तरल मन…

कह कबीर आनन्द भयो है

बाजत अनहद ढोल रे…

या चरणाच्या आनंदकंदाला मिटल्या डोळ्यांनी पाहत राहतं. ‘मी’ – ‘तू’पणाचा अनुभव माणूस जन्मभर घेतो. पण त्याला ‘मी’पणाचा अर्थ कळतो का, त्याचा आशय त्याच्या जाणिवेत येतो का? चेतना एकच असते, असे कबीर आपल्या गीत – दोह्यांतून वारंवार सांगतात. पण, आपण त्या चेतनेचे भाग करतो. त्या चेतनेचा एक छोटासा तुकडा आपण जाणिवेत घेतो. त्या तुकड्यात ‘मी’नं गोळा केलेले विशिष्ट आदर्श, नीतिनियम, विविध धर्म, शास्त्रं, सिद्धान्त, गुरू, मंदिरं, पूजा – प्रार्थना असतात. असतेपण या ‘मी’पणापलीकडंही केवढं तरी विस्तारलेलं असतं. ते ‘मी’च्या जाणिवेत येतं का? यावर कबीर उद्गारतात…

मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा,

तेरा तुझकौ सौंपता क्या लागे है मेरा।।

आपलं ‘मी’पण आपल्याला पूर्णपणे जाणवल्याशिवाय या दोह्यांतलं कबीरांचं ‘मी’पण आपल्या ध्यानात येईल का? आपलं ‘मी’पण सदान् कदा भौतिक जगातल्या सुखदायक वस्तूंशी तसंच इंद्रियगत सुखांशी जोडलेलं असतं. मग या ‘मी’ला कबीर म्हणतात त्या.. ‘माझ्याजवळ माझं काही नाही, जे आहे ते सर्व तुझंच आहे,’ या चरणाचा अर्थ कसा उमजेल बरं! कबीरांनी आपल्या ‘मी’ला, आपल्या ‘अहम्”ला ‘तू’शी जोडलं आहे. हा ‘तू’ सद्भाव जागवणारा, बंधनमुक्त करणारा कधी ‘अवधू’, “ठाकूर’, ‘राम’, ‘रहीम’, “साहेब’, “साईं’ , ‘हरि’, ‘प्रभू’, ‘स्वामी’, “संत’, ‘सतगुरू’ आहे, तर कधी ‘पियारा’, “प्रीतम’, “मन’, ‘सिरजनहारा’ आहे. कबीरांच्या ‘मी’ नं या ‘तू’ला परमप्रेमानं आपल्या हृदयात उतरून घेतलंय. कबीरांचा हा प्रेमभाव आपल्या ध्यानात आल्यावर या दोह्याच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ आपल्याला उमजतो. ‘जेव्हा माझं असणंच तुझं आहे; तेव्हा ते तुला अर्पित करताना माझी हानी ती कुठली!’ हा आशय मनात उजेडतो. कबीरांच्या या समरसतेतून ‘मी – तू’पणाचं विसर्जन झालेलं आपल्याला जाणवतं. ही जाणीव आपल्याला भवतीच्या निरर्थक भौतिक आणि दैवी गुंतवळ्यातून बंधनमुक्त जीवनाची दिशा दाखवते.

मेरी मिटी मुक्ता भया, पाया अगम निवास,

अब मेरा दूजा नहीं, एक तुम्हारी आस।।

माझंपण संपून गेलंय. या माझेपणाशिवाय असलेला निव्वळ ‘मी’ आता उरलाय. मी आता ‘आहेपणा’च्या आसऱ्याला आलोय. आता कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीची आस मनी उरली नाहीय. देही – विदेही केवळ संतुष्टी भरून राहिलीय. कबीरांची ही भावस्थिती ‘आनंद भयो है’ सारखी आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांचा ‘मी’ नुसते इच्छेचे आकार धारण करतो. तिच्या पूर्ततेमागे मरेपर्यंत धावतो. इच्छा संपत नाही. ‘मी’पण संपत नाही. आपण स्वत:च निर्माण केलेल्या जगाचा निरोप घेतो. जाणिवेच्या आकाशाला जोडणाऱ्या ‘तू’शी म्हणजेच गुरूंशी, ईश्वराशी आपल्याला मैत्र का साधावं वाटत नाही? अविनाशी आनंदापासून वंचित ठेवणाऱ्या ‘मी’पणाच्या सावलीतच आपण वावरतो. आपल्या खऱ्या ‘मी’चा आनंदस्वरूप ‘तू’शी संवाद व्हावा, हीच तर कबीरांची तळमळ आहे. आणि हा ‘तू’ कुठे बाहेर नाही, तर देवकुळीच्या एकांतात आपल्या जाणिवेत येणारं आपल्या आतलंच चैतन्य आहे. आपल्या आत वास करणाऱ्या चैतन्याची अनुभूती यावी, यासाठी कबीर आपल्याला एक आध्यात्मिक आवाहन करत आहेत…

मैं मेरा घर जालिया, लिया पलीता हाथ,

जो घर जारो आपना, चलो हमारे साथ ।।

मी ‘माझेपणा’चा आसराच नष्ट केलाय आणि आता आसऱ्याचं नाहीपण घेऊन निघालोय. ज्यांना ‘मी’ आणि ‘माझेपणा’चं विसर्जन करायचंय, त्यांनी सोबत यावं. माझंपण संपलेलं ‘मी’पण कबीरांमध्ये आहे. आता शुद्ध अस्तित्वाशिवाय त्यांच्यापाशी काही नाही. कबीर आता निरिच्छ झालेत. फकीर झालेत. इच्छेपल्याडचे अज्ञात जाणून घेऊ पाहणाऱ्यांसाठी केवळ कबीरच ‘तू’ होऊ शकतात. सखासांगाती होऊ शकतात.

संपर्क : ९४०३७६८८९१

hemkiranpatki@gmail.com



Source link