
हेमकिरण पत्की11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मनाच्या समाधानासाठी आपण कितीतरी कर्मे करतो. आपल्याला आतून असा विश्वास वाटत असतो की, ही सारी कर्मे केली तर आपल्याला समाधान आणि शांती लाभेल. कोणती कर्मे असतात ही? देवपूजा, साधनांच्या मदतीने करता येईल अशी दुसऱ्यांची सेवा, देवाची आठवण सतत जागवली जाईल असा नियम, एखादं तहान-भूक नियंत्रित करणारं व्रत किंवा यांसारखी आणखी काही कर्मे आपण करतो. पण, ती सारी करूनही आपल्या मनाला समाधान आणि शांतीचा लाभ होतो का? आपल्या आध्यात्मिक परंपरेनं माणसाच्या मनाचा अभ्यास करून काही उपासना पद्धती विकसित केल्या आहेत. आसक्ती – मोहाला साक्षीभावानं जाणून घेण्यासाठी विशिष्ट आचरणाची रीत दाखवली आहे.
कबीरांना वाटतं की, या मानसिक तथ्यांचा नीट बोध झाला नाही, तर माणूस स्वतःची तसंच इतरांची प्रतारणा करत राहतो. यामुळं समाजमनाचा प्रवाह गढूळ होऊ शकतो. कबीरांचं समाजमन जाणून घेणं हे रोकड्या अनुभूतीतलं आहे. त्यात मनाच्या समाधानाला, शांतीला पाठमोरं करणारं काही दिसलं – जाणवलं की त्यांची बोधबोली प्रखर होते. कबीर पोटतिडिकेतून, करुणेतून उद्गारतात…
पूजा सेवा नेम व्रत
गुडियन का-सा खेल।
जब लग पिव परसै नहीं
तब लग संसै मेल।।
बालपणी आपण सारेच भातुकलीचा खेळ खेळत असतो. या खेळातील घर, वस्तू, माणसं आणि क्रिया आपण कल्पनेनं सजीव करत असतो. पण, हा खेळ खेळताना आपल्याला तो खोटा वाटत नाही. खेळाशी असलेलं आपलं तादात्म्य खरं असतं. कबीर म्हणतात, वयात आल्यावर, आपलं प्रेमाचं माणूस खरोखर सहवासात आल्यावर भातुकलीचा खेळ मांडला जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत नि कशासाठी आहोत, या आपल्या व्यापक ‘आहेपणा ’चा अर्थ उमजल्यावर आपली संवेदना संकुचित राहत नाही, आपलं मन चिंतनशील होतं. पूजा, सेवा, नेम आणि व्रत या उपासनाविधींना आपण निरर्थक न समजता, मानसिक स्थिती जाणून घेण्यातील त्यांचं मोल आपल्याला कळू शकतं. आपल्या पारंपरिक मनाला त्याच्या स्थितींचं नीट आकलन होत नाही, आपण परंपरेतलं मर्म स्वच्छ बुद्धीनं जाणून घेत नाही. कबीर हे तथ्य जाणतात. ते यासाठी एक मार्मिक दृष्टांत देतात…
न्हाये धोये क्या भया
जो मन मैला न जाय।
मीन सदा जल में रहे
धोये बास न जाय।।
मनाच्या समाधानासाठी आपण वेगवेगळ्या यात्रा करतो, पवित्र मानलेल्या नद्यांमध्ये स्नान करतो. आपल्या मनाची मान्यता असते की, यामुळं जन्मजन्मांतरीची पापं धुतली जातात! कबीर म्हणतात, हे माणसाचं विकार समजून न घेणारं – ‘मी’पणापासून मुक्त नसलेलं मन नुसत्या पवित्र नदीतल्या स्नानानं कसं स्वच्छ, शुद्ध होईल? माशाचं उदाहरण देऊन ते सांगतात की, मासा दिवस-रात्र पाण्यात राहतो, पण त्याचा वास येत राहतो. पवित्र नदीच्या पाण्याचा स्पर्श आपल्या देहाला होतो, पण मनाला होतो का? कबीरांचं हे सांगणं मन जाणून घेण्याची साधना करणाऱ्याच्या गाभ्यात थेट पोहचणारं आहे. ते आपल्याला आध्यात्मिक उपासनेमागचं सत्य अधिक गडद करून सांगतात…
तीरथ कांठै घर करै
पीवै निरमल नीर।
मुक्ति नहीं हरिनाम बिन
यौ कथि कहैं कबीर।।
भक्तिमार्गातील कर्मे डोळसपणे व्हावीत, या तळमळीनं कबीर सांगतात की, तीर्थक्षेत्री घर केलं, तिथल्या नदीचं रोज पाणी प्यायलं तरी आपल्याला आत्मज्ञान होईल, याची शाश्वती नाही. आपला तिथला वास देहभावानं असेल आणि मनोभाव विकाराधीन असेल, तर आत्मज्ञान कसं होईल? आत्मज्ञानासाठी स्वतःला उलगडून-उमजून घेत केलेलं आचरण महत्त्वाचं असतं.
स्थलमाहात्म्य कल्पून ‘पवित्र’ क्षेत्री तीर्थयात्रा केल्यानं, कालमाहात्म्याचं प्रस्थ वाढवून व्रतवैकल्ये आचरल्यानं आणि वस्तूमाहात्म्याचं खूळ माजवून ‘शुभ’ वस्तूंच्या परिग्रहानं आपलं मन उन्नत होतं का? जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या प्रश्नाची उकल ज्यानं-त्यानं करून घ्यायची आहे. या प्रश्नाने पायांखालची जमीन सरकतेय, असं वाटू नये म्हणून कबीर आपल्याला एक आधारसूत्र देतात : ‘मोकळ्या मनाच्या सहजावस्थेत सर्वांचे सर्व काही असलेल्या हरीचं नाम आपल्याला मनाच्या स्वभावाचं दर्शन घडवतं, मोकळं करतं.’ हे कबीरांचं सूत्र मनाला स्थिर करणारं, समाधान आणि शांती देणारं आहे.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)