
हेमकिरण पत्की8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपलं मन सतत धावत असतं. ते म्हणतं- इथं नको, तिथं जाऊ. हे मिळवू, ते मिळवू. परिसराच्या बदलामागं धावताना, कुठल्या तरी प्राप्तीसाठी धडपडताना ते किती उत्तेजित असतं, उत्साही असतं! मनाच्या मागं चालताना काय राहून जातंय, काय सोबत येतंय हे आपल्याला थोडंही जाणवत नसतं. एका तंद्रीत काळाचा प्रवाह मनाआड होत असतो. दृष्टी वेधून घेणारी वस्तू आपल्या दृष्टीस पडते. मन थबकतं. ती वस्तू आपल्याजवळ कायमची असावी, तिच्यावर आपली मालकी असावी, अशी इच्छा मनात येते. ती पूर्ण होते. पण, काही क्षणानंतर पुन्हा दुसऱ्या वस्तूची आस मनभर होते. अशा असंख्य इच्छांच्या पूर्ततेसाठी आपलं मन धावत राहतं. हे मन कधी इच्छेला जाणून घेत नाही आणि इच्छेवेगळंही होत नाही. इच्छेमागून धावता – धावता आपला जीव थकून जातो. पण, हे धावतं मन एखादी विसाव्याची घटकाही लाभू देत नाही. पुढल्या लाभांचं उजेडभरलं अवकाश आपल्या डोळ्यांत तरळत राहतं. काय मिळवायचं असतं मनाला? का ते सतत धावत राहतं? मनाची धाव कुठवर असते? आस्थेनं ओथंबलेल्या शब्दांत कबीर म्हणतात…
मन तू पार उतर कहं जैहौ आगे पंथी पंथ न कोई, कूच – मुकाम न पैहौ।। नहिं तहं नीर नाव नहिं खेवट, ना गुन खैंचनहारा धरती-गगन-कल्प कछु नाही, ना कछु वार न पारा।। नहिं तन नहिं मन, नहीं अपनपौं, सुन्न में सुद्ध न पैहौ बलिवान होय पैठो घट में, वाहीं ठौंरे होईहौं।। बार हि बार विचार देख मन, अन्त कहूं मत जैहौ कहै कबीर सब छाड़ि कल्पना, ज्यों के त्यों ठहरैहौ।।
कबीर म्हणतात, ना इथं ना तिथं, मना तू कुठं जाणार? पलीकडं उतरून तुला कुठं जायचं आहे? हे धावणं कशासाठी? जे इथं आहे तेच मनाच्या पार आहे. मना, हा तुझा धावण्याचा स्वभाव आहे. इथल्या इच्छेच्या पूर्ततेनंतर जशी नव्या इच्छेची जन्मस्थिती, दोन इच्छांच्या दरम्यानची व्याकूळता, अस्वस्थता तसंच मनाच्या पारही. बरं, या धावण्याची कुठली वहिवाट नाही, एखादा सोबतीसाठी वाटसरू नाही. ही कसली धाव आहे मना, ज्याचा आरंभ नाही, अंत नाही. नुसतं नुसतंच धावणं आहे!
खरं तर ही धाव आभासी आहे, भ्रामक आहे. सत्याकडं पाठ करत घडणारी आहे. ही मनानं निर्माण केलेली अंतराळातली धाव आहे. या धावण्याला प्रत्यक्षाची दिशाच नाही. ही धाव जशी कुठली वाट तुडवत घडत नाही, तशी ती पाण्यातूनही घडत नाही. कारण तिथं पाणी नाही, नाव नाही, नावाडी नाही. ‘ना गुन खैंचनहारा’ आणि त्या नावेला दोरी बांधून कुणी खेचणाराही नाही. कबीर म्हणतात, हे मना… ना तिथं धरती आहे, ना आकाश आहे, ना काळ – वेळ आहे, ना क्षेत्र आहे. या तुझ्या असण्याचा – असतेपणाचा कुठला पार! अस्तित्वाला आरपार नाही. मग तू कुठं जाणार?
या धावत्या मनासाठी कबीरांचे आस्थेनं ओथंबलेले शब्द आहेत.. ‘मन तू पार उतर कहं जैहौ..’ मनाचा स्वभाव खूप मजेशीर आहे. भौतिक जगातील वस्तूंमागं ते आयुष्यभर धावत असतं. पोटापुरता पसा लाभला, अंग झाकायला कपडा मिळाला आणि उघड्या माथ्याला उन्हा – पावसापासून संरक्षण मिळालं, तरी या मनाची धाव आणि हाव संपत नाही. समाधानाचा किनारा लाभत नाही. इच्छांच्या मागून सतत चालताना ते एकेदिवशी थकतं – भागतं. पुन्हा नवीन इच्छा शोधून काढतं. ही इच्छा असते परमेश्वरप्राप्तीची. तरीही मनाचं धावणं अखंड चालू राहतं.
आपल्या सगळ्या इंद्रियांची धाव बाहेरच्या विषयांकडं असते. डोळ्यांना बाहेरचं पाहण्याची दृष्टी असते. ते आतलं जग पाहू शकत नाहीत. मनाचाही हाच गुण आहे, स्वभावधर्म आहे. त्यालाही अंतरीचं सुख दाखवावं लागतं. धन, पद, प्रतिष्ठा या भ्रामक मान्यता आणि पुण्य, स्वर्ग या कल्पना आहेत. या सर्वांमागं वारंवार धावणं चालू राहिलं तर मनाला त्याचा थारा कसा गवसेल? स्वरूपस्थितीचा आनंद कसा लाभेल? यासाठीच तर कबीर तळमळीनं सांगत आहेत… ‘बा मना, खोट्या कल्पनांमागं न धावता ध्यानस्थ हो.’ कबीरांचे ‘ज्यों के त्यौं ठहरैहौ’ हे शब्द विषयसुखानं विचलित होणाऱ्या आपल्या मनासाठी दिशादर्शक आहेत.
संपर्क : ९४०३७६८८९१
hemkiranpatki @gmail.com