
- Marathi News
- Opinion
- Nanded Professor Writer P Vitthal Article; Poet Critic Novelist | P Vitthal Birthday Special
पी. विठ्ठल15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रतिभावंत कवी, समीक्षक, कादंबरीकार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कार्यरत असलेले प्राध्यापक पी. विठ्ठल यांचा आज रोजी (एक जून) पन्नासावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे हे लेखकीय समाजचिंतन….
बघता बघता पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो. म्हणजे आयुष्याच्या पन्नास पायऱ्या चढून (अथवा उतरून) झाल्या असे म्हणता येईल. पन्नास हा तसा पुष्कळच मोठा टप्पा आहे. अर्थात मी माझ्या आयुष्याविषयी कमालीचा कृतज्ञ आहे. आणखी किती वय हातात आहे? माहीत नाही. ते कुणालाच माहीत नसतं, हीच तर जगण्यातली खरी गंमत असते. माझा जन्म १९७५ चा. याचा अर्थ असा की, आजवर माझा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध जगून झाला आहे. या दोन शतकातली पाच दशके मी पाहिली, अनुभवली आहेत. या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो वगैरे. निसर्ग नियमाप्रमाणे आणि रीतीरीवाजानुसार जे जे आयुष्यात घडायला हवे, ते घडले. म्हणजे आयुष्य हे चक्र असतं. अगदीच ते यंत्रवत नसलं तरी त्याचं ठरवून व्यवस्थापन नाही करता येत. किंवा अगदी पद्धतशीरपणे नियमनही करता येत नाही. असंख्य चढउतारांचा हा एक अज्ञात प्रवास असतो. आपण फक्त चालत राहतो. कोणत्याही सिद्धांताची तार्किक संगती लावावी, इतके हे सोपे नसते. निसर्ग, समाज- संस्कृती, भाषा आणि सुख-दुःखाच्या समग्र पर्यावरणाने आपण कायमच वेढलेलो असतो. आयुष्य ही अफाट गोष्ट असते. पृथ्वीपेक्षाही थोर.
आपल्या वाट्याला एक छोटासा काळ येतो. हा काळ आपल्याला घडवतो. आकार देतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि अस्तित्वाला एक नवा अर्थ देतो. ओळख देतो. माझ्या वाट्यालाही असाच एक काळाचा तुकडा आला. या काळाने सुख-दुःखाचे अगणित क्षण दिले. नातीगोती दिली. मित्र परिवार दिला. भाषा दिली. संस्कार दिले. स्थैर्य दिले. स्वास्थ्य दिले. अर्थात स्थैर्य ही गोष्ट कायमच सोबत असते असे नाही. चढउतारांच्या असंख्य कहाण्या यात सामावलेल्या असतातच. या कहाण्या अभावाच्या असतात, तशा आनंदाच्याही असतात. ‘अभाव’ आणि ‘आनंदा’च्या दरम्यान जे असतं ते ‘आयुष्य’. ही माझी धारणा. आयुष्यातल्या या नानाविध अनुभवांना तोंड देत देतच आपली जीवनदृष्टी आकाराला येत असते. हे अनुभव जसे प्राकृतिक असतात, तसेच ते सामाजिक आणि सांस्कृतिकही असतात.
पन्नास वर्षात मी काय पाहिलं आणि काय अनुभवलं? याचा लेखाजोखा मांडण्याचे तसे काही कारण नाही. कारण काळ नावाची गोष्ट कधीच स्थिर नसते. ती गतिमान असते. ती अव्याहत धावत असते. युद्ध, हिंसा, दमन, दुष्काळ, ताणतणाव, आरोग्याचे आणि स्वास्थ्याचे प्रश्न कायमच सोबत असतात. दहशत, भीती, मरणभय, भ्रष्टाचार, पाशवीपणा, क्रूरता, धार्मिक उन्माद आणि राजकारणाचे विकृत रूप या सगळ्या गोष्टी प्रत्येक काळात असतात. त्या आजही आहेत. माणसाच्या भावजीवनाचेच हे ‘अप्रिय’ पैलू आहेत. हे सर्वच मी अनुभवले, पाहिले आहे. या सगळ्याच गोष्टींची आपल्याला काही काटेकोर संहिता लिहिता येत नसते. जीवन व्यवहारातल्या या अपरिहार्य गोष्टी असतात. यापैकी काहीच गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो. विश्वासाच्या गूढ, गहन स्मृतींना आपण सांभाळत राहतो. प्रेम, मैत्री आणि आत्मीयतेची सर्वस्पर्शी सोबत आपण जपत राहतो. म्हणून तर आयुष्य सुखकर आणि सुंदर होतं.
कौटुंबिक परीघ ओलांडला की व्यवहार सुरू होत असतो. तो ‘प्रिय’ आणि ‘अप्रिय’ या दोन स्वरूपाचा असतो. कोणताही कलावंत काळाच्या या दोन्ही प्रारूपांना प्रतिसाद देत असतो. कवी म्हणून मीही माझ्या काळाचे परिशीलन करण्याचा काहीएक प्रयत्न केला आहे. बऱ्यावाईट गोष्टींची कमी अधिक चिकित्सा केली आहे. शिक्षण आणि वाचनामुळे विचारदृष्टीचे क्षितिज विस्तारले. त्यामुळे वैचारिक भूमिका तयार होऊ शकली. त्यामुळेच पारंपरिक चौकटबद्ध जगण्याचे माप ओलांडता आले. वास्तवाचा अन्वयार्थ लावता आला. ‘लिहिणे’ हे अभिव्यक्तीचे एक प्रमुख अंग झाले. आकलनाच्या दिशा विस्तारल्या की ‘सत्य’ सांगताना भय वाटत नाही. व्यवस्थेच्या प्रभावाने आपली अभिव्यक्ती बाधित होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. ही काळजी मी कायमच घेत आलो.
दिवसेंदिवस आपल्या सामाजिक, सांस्कृतिक संवादाच्या शक्यता क्षीण होत चालल्या आहेत. नवमाध्यमांनी दिलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे मूर्खांनाही आपण सर्वज्ञानी असल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे. त्यामुळे चिकित्सेचे साधकबाधक क्षेत्र संकुचित झाले आहे. ट्रोलिंगच्या उथळ हाणामाऱ्यांनी आपण सर्वच अस्वस्थ आहोत. मीही आहे. पण तरीही आपण आपली मते मांडली पाहिजेत. वैचारिक मूल्य जपले पाहिजे, असे मला वाटते. मी माझ्या परीने तसा सतत प्रयत्न करत आलो आहे. पाच दशकात झालेली कितीतरी स्थित्यंतरे मी अनुभवली आहेत. कौटुंबिक सुख-दुःखाची असोत की, सामाजिक, राजकीय वा सांस्कृतिक स्वरूपाची असोत. या स्थित्यंतरामुळेच माझ्या आयुष्यालाही नवे वळण लाभले आहे. या सगळ्याच वाटा वळणांचा हिशेब मांडता येणार नाही. हा काळ जसा संपन्न होता, तसाच तो क्वचितप्रसंगी निरर्थक आणि नीरसही होता. अर्थात ही निरर्थकताही आपल्याला ‘अर्थपूर्ण आणि प्रगल्भ’ बनवत असते. अशा आत्मसंघर्षातूनच सर्जनाच्या नव्या दिशा सूचित होत असतात.
या संपूर्ण प्रवासात ‘पुस्तक’ ही अत्यंत महत्वाची गोष्ट सोबत होती, आहे. पुस्तकांविषयीची कृतज्ञतेची विनम्र भावना माझ्या मनात आहे. आयुष्यात पुस्तक नावाची गोष्ट आली नसती, तर काय झाले असते? याची कल्पनाही करवत नाही. पुस्तकांची सोबत होती म्हणूनच माझी थोडीफार बौद्धिक जडणघडण होऊ शकली. पुस्तकांमुळेच अमर्याद जगाचे दर्शन घडू शकले. साहित्य, ज्ञान-विज्ञान आणि इतिहास, तत्त्वज्ञानाची दालने खुली होऊ शकली. आत्मशोधाचा हा मार्ग सार्वकालिक महत्त्वाचा वाटतो मला. पुस्तकांमुळेच आपल्या थोर ज्ञानपरंपरेचा परिचय होऊ शकला. निकोपपणे भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होवू शकली. पुस्तकाइतकी सुंदर गोष्ट जगात अन्य नाही. याशिवाय सहवासात आलेल्या कितीतरी व्यक्तींनीही मला सर्वार्थाने समृद्ध केले आहे. आज प्रचंड वेगाने आपला भोवताल बदलत आहे. नवनव्या धारणा रूढ होत आहेत. हे उत्तर आधुनिक बदल आपल्याला कुठे घेऊन जातील? हे सांगता येत नाही. अशावेळी पुस्तकाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते.
आपण आपल्या परीने या काळाचा, नव्या संवेदनेचा अन्वयार्थ लावायला हवा, असे मला वाटते. मागच्या काही वर्षात जाणीवपूर्वक मी देश- विदेशात भटकलो. पर्यटनासह साहित्य, कला आणि संस्कृतीच्या नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न केला. विविध विचारधारांना आणि वर्गीय सामाजिक संघर्षाला थोडे का होईना, समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी कुणी तत्त्ववेत्ता किंवा थोर अभ्यासक नाही; पण समाजव्यवस्थेचे हे आंतरिक रूप किमान आपल्याला माहीत असावे, ही यामागची माझी भावना. आजचे आपले एकूणच सामाजिक चर्चाविश्व खूप एकांगी आणि संशयास्पद होत चालले आहे. माणसांचे स्वास्थ्यपूर्ण जगणे संपुष्टात आले आहे. अविचारी आस्था नेहमीच धोकादायक असतात. आज काळ त्या वळणावर येऊन ठेपला आहे. समाजाच्या केंद्रस्थानी ‘धर्म’ नावाची गोष्ट येऊन बसली आहे. आपले श्रद्धा आणि विचारविश्व बदलले आहे. या काळाची चिकित्सा खूप वेगवेगळ्या अंगाने करता येऊ शकते. एक लेखक म्हणून या सगळ्या स्थित्यंतराला प्रतिसाद देण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवा.
मागच्या सुमारे पंचवीस वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. मला माझ्या विद्यार्थी आणि विद्यापीठाप्रती आत्यंतिक प्रेम आहे. मी शिक्षण क्षेत्रात नसतो तर पत्रकारितेत रमलो असतो. (अर्थात अशा जर तरला काही महत्त्व नसते.) गेल्या दीड-दोन दशकात एकोणवीस पुस्तके लिहून झाली. पुढच्या एक वर्षात आणखी दोनेक पुस्तके प्रकाशित होतील. ‘लिहिणे’ ही माझी आंतरिक गरज आहे. अजून बरच काही लिहायचं आणि वाचायचं बाकी आहे. बघूया किती जमतं ते. अर्थात हे काही माझ्या आयुष्याचे समग्र परिशीलन नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले एक चिंतन म्हणता येईल फार तर. असा जमाखर्च मांडून काही साध्य होत नसते हेही खरे. कारण आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात काय घडलं? याविषयी जाणून घेण्याची इतरांना उत्सुकता असण्याचे कारण नसते. माझ्याविषयी तर अजिबातच नसणार. पण तरीही मी लिहिले.
या प्रवासात आपल्या सर्वांची सोबत खूप आश्वासक आहे. जगण्याची, नैतिकतेची सकारात्मक ऊर्जा तुमच्यामुळेच तर मला मिळत आली आहे. मागच्या महिन्यात देशभर तणाव होता. युद्धजन्य परिस्थिती होती. यातून आपण जेमतेम सावरलो तर अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावत आहे. थोडक्यात काय तर यातल्या कोणत्याही गोष्टींना आपण टाळू शकत नाहीत. जे घडणार आहे ते घडणारच आहे. संयम आणि विवेकाने येणाऱ्या काळाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. मात्र द्वेषभावनेची क्षुद्र अहंता आपल्यात आणि माझ्यात फिरकू नये कधीच. यानिमित्ताने एवढेच. आपण सर्वजण मला खूप प्रिय आहात. अंत:करणपूर्वक आभार.
(संपर्कः p.vitthal75@gmail.com)
संबंधित वृत्त
पाऊसवेळा VIDEO:पाऊस पडतो म्हणजे…पिकांचे हिरवे उच्चार ठळक होत जातात; आज पी. विठ्ठल यांची कविता
कविता ही माझी रक्तवाहिनी- पी विठ्ठल