कमिन्स कंपनीच्या कामगारांचा एक रुपया आमच्या घरी येत असेल तर राजकारण सोडू – श्रीमंत संजीवराजेंचे अजितदादा पवारांना खुले आव्हान

0
1
कमिन्स कंपनीच्या कामगारांचा एक रुपया आमच्या घरी येत असेल तर राजकारण सोडू – श्रीमंत संजीवराजेंचे अजितदादा पवारांना खुले आव्हान

फलटण: “कमिन्स कंपनीच्या कामगारांचा एक रुपया देखील आमच्या घरात जात असेल तर आम्ही राजकारण सोडू, अन्यथा हे सिद्ध करू शकत नसाल तर तुम्ही राजकारण सोडा,” असे घणाघाती प्रत्युत्तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या सांगता सभेत कमिन्स कंपनी आणि राजे गटाच्या संस्थांवर जोरदार आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी संजीवराजेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट पुरावे सादर करत अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

संजीवराजेंनी सांगितले की, कमिन्स ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे आणि तिचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आहेत. पगार थेट बँकेत जमा होतो आणि कामगारांच्या कपातीचा पैसा आम्हाला दिला जात असल्याचे आरोप खोटे असून, जर हे सिद्ध झाले तर आम्ही राजकारण सोडू, असे त्यांनी ठामपणे म्हटले.

याशिवाय, फलटणमधील गोविंद डेअरी, कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि अन्य संस्थांवरही केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. फलटण तालुक्यातील विकासकामे, रोजगारनिर्मिती, आणि खेळाडूंना मिळालेल्या यशावर त्यांनी भर दिला.

“जरंडेश्वर साखर कारखाना खाजगी झाला, पण श्रीराम सहकारी कारखाना सहकारीच राहिला आहे. याचा अभ्यास करून मग आरोप करा,” असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

संजीवराजेंच्या या आक्रमक प्रतिवादामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.