
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
‘अफझलखानाचं पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आम्ही आणणार, इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावा महायुती सरकारनं केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितलं होतं की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखं आहेत, असं म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्यानं सरकारनं ती वाघनखं आणण्याची घोषणाच करून टाकली. त्यावर करोडो रुपये खर्च केले. बातम्या छापून आणल्या. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनानं पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना यातील वस्तुस्थिती कळवली आहे. शिवरायांच्या नावानं भावनिक राजकारण करायचं हे काही लोकांच्या मनातच असतं. पण हे भावनिक राजकारण करता करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.





