फलटणमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार

0
17
फलटणमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार

फलटण प्रतिनिधी : फलटण शहर व परिसरात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत इसमांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश सातारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२, रा. मलठण, फलटण) आणि त्याचा साथीदार अर्जुन राजू जाधव (वय १९, रा. मलठण, फलटण) यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध दुखापत करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, चोरी यांसारखे गंभीर दखलपात्र गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अरविंद काळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार संबंधित आरोपींना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांनी केली. त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या समोर सुनावणी होऊन अंतिम आदेश पारित करण्यात आला.
सदर आरोपींवर यापूर्वी अटक व प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांनी गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती. अवैध मार्गाने दहशत निर्माण करणे, मारहाण, चोरी, अग्निशस्त्र बाळगणे आदी प्रकारांमुळे फलटण परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या टोळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत होती.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे तसेच महिला पोलिस कर्मचारी अनुराधा सणस यांच्या पथकाने आवश्यक पुरावे सादर केले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.