—
फलटण : फलटण मतदारसंघात यंदा अभूतपूर्व अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मतदान दर तासागणिक वाढत गेले, आणि त्यातही महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. गावागावांत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का लक्षणीय वाढला असून, हा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे.
फलटण मतदारसंघात शेवटपर्यंत तुल्यबळ लढत झाली. एका बाजूला चौथ्यांदा आमदार होण्याचा प्रयत्न करणारे दीपक चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला गेल्या तीन वर्षांत फलटण तालुक्याचा सक्रिय दौरा करून विजय साधण्याच्या तयारीत असलेले सचिन पाटील. यावेळी मतदारांचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२०१९ च्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:
२०१९: ६४.४६% मतदान (२,१३,७९० मतदार)
२०२४: ७१.०८% मतदान (२,४१,३२९ मतदार)
यंदाच्या निवडणुकीत पाणी प्रश्न, फलटणचा विकास, रोजगार आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी प्रचारात ताकद लावत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.
रामराजे गटाच्या प्रचार मोहिमेत विश्वजितराजे, अनिकेतराजे, सत्यजितराजे यांची आक्रमक भूमिका दिसली, तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह आणि अॅड. जिजामाला यांनी कार्यकर्त्यांत ऊर्जा टिकवून मतदारांपर्यंत विकास आराखडा पोहोचवला.
रासप आणि स्वाभिमानी पक्ष यांचे उमेदवारही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील, आणि त्यांच्या मिळणाऱ्या मतांचा निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा बौद्ध समाजानेही आपली ताकद दाखवली. त्यामुळे फलटणचा मतदार कोणाला चकवा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्सुकता ताणली जाणारी आहे, मतमोजणीत कोण जिंकणार? याचा निर्णय लवकरच समोर येईल!