फलटण :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, फलटण-कोरेगाव मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. यंदा राजे गट विरुद्ध खासदार गट अशी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नुकताच आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे आणि संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वात फलटणमध्ये कसा बदल झाला हे प्रचारात मोठा मुद्दा ठरणार आहे.
दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असून, शरद पवार यांना नेहमी विरोधात असतात. त्यामुळे या दोन गटांमध्ये तीव्र संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
श्रीमंत रामराजे, जरी महायुतीमध्ये असले तरी ते राजे गटासाठी अदृश्य शक्ती ठरणार आहेत. प्रचारात प्रत्यक्ष दिसणार नसले तरी त्यांचे पडद्यामागचे कार्य राजे गटाला महत्त्वाचे समर्थन देईल.
खासदार गटाची ताकद वाढली आहे:
खासदार गटात आता मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी सामील झाले आहेत. प्रल्हादराव साळुंखे, माणिकराव सोनवलकर, विश्वासराव भोसले, सचिन अभंग यांसारखे नेते त्यांच्या गावांमध्ये प्रभावी असून, या निवडणुकीत ते खासदार गटासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.
संजीवराजेंचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’:
संजीवराजे यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीराम साखर कारखाना, श्रीमंत मालोजीराजे बँक, गोविंद मिल्क अशा संस्थांमधून आपले जाळे विणले आहे. यंदा त्यांचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ निवडणुकीत ठळकपणे दिसून येईल.
बौद्ध समाजाची भूमिका काय?
या मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित जागा असूनही, २००९ पासून बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी मिळालेली नाही. यंदाही राजे गट आणि खासदार गट यांची भूमिका बौद्ध समाजाच्या उमेदवारास संधी देण्याची दिसत नाही. जर पुन्हा बौद्ध समाजाला डावलले गेले तर समाजाची भूमिका काय राहील, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मतदानावर बहिष्कार घालणार की स्वतःचा उमेदवार उभा करून दोन बलाढ्य गटांचा सामना करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.