“ज्ञानेश्वरी पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न, पण फलटणमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रवास अद्याप सुरुच !”

0
27
“ज्ञानेश्वरी पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न, पण फलटणमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रवास अद्याप सुरुच !”

फलटण – लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा सोहळा असलेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदीतून मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात निघाला असला तरी माऊलींची वाट मात्र फलटण शहरात अद्यापही खड्ड्यांनी भरलेलीच आहे.

गेल्या काही दिवसांत ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या होत्या.

त्यावेळी ना. गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी प्रस्थानाच्या आत सर्व खड्डे बुजवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, आजही शहरातील अंतर्गत पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांची संख्या लक्षावधींच्या घरात असते, त्यात अशा रस्त्यांमुळे अपघात आणि गैरसोयीची शक्यता नाकारता येत नाही.

फलटण शहरातील पालखी मार्गाचा बहुतांश भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असूनही, केवळ सूचना फलक (पाट्या) लावून काम उरकल्याचा आभास निर्माण केला जात आहे. अधिकारी पाट्यांपुरतेच मर्यादित राहून, प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे.

संतांचे नाव घेतले जाते, पण त्यांच्या वाटेचा विचार मात्र उरतो कागदावरच – अशी खंत वारकऱ्यांतून व्यक्त होत आहे.