फलटण :- श्री शंभू महादेवाच्या चैत्र वारीचे अद्वितीय दृश्य सोमवारपासून प्रकट होऊ लागले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भक्त पवित्र नद्यांचे पाणी दोन रांजणांत भरून, कावडी खांद्यावर घेत शिखर शिंगणापूरला चालत जात आहेत. यातील सासवड येथील ‘तेल्या भुतोजी’ यांची कावड विशेष मानाची मानली जाते. या कावडीचे फलटण शहरात आगमन होताच तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने औपचारिक स्वागत केले.
या वेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडलाधिकारी शीलवंत चव्हाण, तसेच तलाठी सोमनाथ पंडित हे उपस्थित होते.
या वारीचा सर्वोच्च क्षण म्हणजे ‘तेल्या भुतोजी’ यांची कावड मुंगी घाट चढत असतानाचा थरार. हजारो भाविक या दृश्यासाठी घाटात उपस्थित राहतात. या पारंपरिक कावडीच्या माध्यमातून देवाला पावसासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जाते.