
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तातडीची वैद्यकीय मदत न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत भिसे कुटुंबीयांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला असून, रुग्णालयाने पेशंटला दाखल करून न घेणे ही गंभीर चूक असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाला हा अहवाल सादर केला असून, सविस्तर तपास सुरू आहे.
पुढील दोन दिवसांत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल. रुग्णाशी संबंधित वैद्यकीय अहवाल, कागदपत्रे आणि इतर साक्षींचा अभ्यास करून निष्कर्ष मांडला जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तनिषाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप करत, “ज्या गोष्टी आमच्यासोबत घडल्या त्या सर्व माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवर आमचा रोष आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील,” असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले.




