साखरवाडी (ता. फलटण): अनेक वर्षांची प्रतीक्षा, अनेक महिन्यांचा संघर्ष आणि अखेर प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून साखरवाडीतील बौद्ध बांधवांनी स्वतः पुढाकार घेत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “आता सुट्टी नाही!” अशा ठाम निर्धारासह सोशल मीडियावर संदेश देत, भगवान तथागत बुद्ध यांचे भव्य मूर्तिस्थान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नुकताच साखरवडीत उभारण्यात आला.
गेल्या ३० वर्षांपासून साखरवाडीत बुद्धविहार व्हावा, यासाठी स्थानिक बौद्ध अनुयायी सातत्याने प्रयत्नशील होते. अनेक वेळा निवेदने, मोर्चे आणि आंदोलने होऊनही शासनाच्या आश्वासनांशिवाय काहीही हातात पडत नव्हते. मात्र, यावेळी लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन थेट बुद्धविहारासाठी आक्रमक होत याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्ती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसविण्यात आला आहे .
या ऐतिहासिक क्षणी साखरवाडी व परिसरातील भीम अनुयायी आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आता वेळ आली आहे, शासनाने याची दखल घेऊन या विहारास अधिकृत मान्यता द्यावी’, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
“आम्ही प्रतीक्षा केली, आंदोलनं केली, मोर्चे काढले… पण आता आमचा धीर सुटला. आम्ही स्वतःचा बुद्धविहार स्वतःच उभारणार आहे!” – असा आवाज साखरवाडीतून निघू लागला आहे.