
फलटण :- फलटण तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकाराचा मी तीव्र धिक्कार करतो, अशी भूमिका विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मांडली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु या घटनेमुळे सातारा जिल्ह्याची आणि फलटण तालुक्याची मोठी बदनामी झाली आहे,” असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
रामराजे पुढे म्हणाले, “एक काळ असा होता की अधिकारी फलटणला येण्यासाठी धडपड करीत होते. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ‘फलटण नको रे बाबा!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सत्ताबदल होताच अशा दुर्दैवी घटनेने फलटणची प्रतिमा डागाळली.”
घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी निराशा व्यक्त केली असल्याचे सांगून त्यांनी म्हटलं, “त्यांनी खचून जाऊ नये. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
“या घटनेमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. मला यात राजकारण करायचे नाही. सर्व तपास पारदर्शक व्हावा. सीडीआरमधून सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” असेही श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.








