पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करा; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हायकोर्टात मागणी

0
1
पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करा; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हायकोर्टात मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात त्यांची आई पुढे सरसावली असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारत २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली आहे.

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात बाजू मांडत, या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली.

अॅड. आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्याच धर्तीवर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणातही विशेष तपास पथक (SIT) नेमावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली.

प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही, इतकेच नव्हे तर त्यांचे निलंबनही झालेले नाही. न्यायालयीन चौकशी असूनही अद्याप कारवाई संदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेलेले नाहीत. म्हणूनच सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली आहे.

सरकारतर्फे याप्रकरणी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले असून, पुढील सुनावणीसाठी सर्वांचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.