
फलटण प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. या दिवशी सरकारी, अनुदानित तसेच खासगी शाळा एका दिवसासाठी बंद राहणार असून, शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांजवळ भव्य मोर्चा काढण्याचे ठरवले आहे.
सातारा जिल्हा समन्वय समितीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याची आवाहन केली आहे. शिक्षकांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन, शाळा बंद करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य न करणे.
- संचमान्यता जुन्या निकषांनुसार देणे.
- शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या मागण्यांवर निर्णय न झाल्याने शिक्षक संघटनांनी संप, शाळा बंद आणि राज्यव्यापी मोर्चाचा इशारा दिला आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता आहे.
या आंदोलनामुळे ५ डिसेंबरला राज्यातील शिक्षण व्यवस्था एका दिवसासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होऊन आपली ताकद दाखवण्याचे उद्दिष्ट आहे.







