डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही; सर्व निवडणुकांवर बहिष्कार
साखरवाडी (ता. फलटण) – बुद्ध विहारासाठी जागा मिळावी, ही मागणी संपूर्ण दलित समाजाची हक्काची मागणी आहे. मात्र, गेल्या 26 वर्षांत 72 वेळा खोटी आश्वासने देत प्रशासनाने समाजाची दिशाभूल केली. या अन्यायाविरोधात आता लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, शासनाने तातडीने लेखी निर्णय न घेतल्यास यंदा साखरवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार नाही! तसेच आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.
समाजाची ठाम भूमिका – मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही!
✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत!
✅ फक्त वस्तीत भीम-बुद्ध पूजा, संविधान वाचन आणि ग्रंथवाटप होईल.
✅ बुद्ध विहारासाठी जागा मंजूर झाल्यासच जयंती साजरी करू, अन्यथा यंदा जयंती नाही!
प्रशासनाच्या दिरंगाईला विरोध – आता निर्णयच हवा!
गेल्या अनेक वर्षांत तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा आहेत. प्रशासनाच्या साखळीतील इतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आता स्पीड 100 चा गतीने निर्णय घ्यावा!
आज डिजिटल युगात सर्व व्यवहार ऑनलाइन होत असताना, एक मागणी दिल्ली दरबारी पोहोचवण्यासाठी 6-6 महिने लावले जातात, हे मान्य नाही! फॅक्स करा, मेल करा, संबंधित अधिकाऱ्यांना फोन करा! गरज पडल्यास आम्हीही सरकारपर्यंत पोहोचू. पण आता विलंब खपवून घेतला जाणार नाही!
निर्णय झाला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार!
संपूर्ण साखरवाडीतील दलित समाज ग्रामपंचायतसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल!
आगामी निवडणुकीत आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांना मत मागण्याआधी विचारावे लागेल – “बुद्ध विहारासाठी काय केलं?”
लोकप्रतिनिधींना मत नागरिकांच्या प्रश्नांसाठी दिले जाते. मात्र, जर सरकार आमच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल, तर अशा व्यवस्थेला मत देण्यात काहीच अर्थ नाही!
नोटा बटणाचा प्रचार – संपूर्ण समाजाचा निर्धार!
जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हा निर्णय केवळ साखरवाडीसाठी मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्यात आणि समाजात जनजागृती करून आम्ही “NOTA” बटणाच्या प्रचारात उतरू!
कोणतेही राजकीय चिन्ह मोठे नाही, पण आमची अस्मिता मोठी आहे!
सरकारला अंतिम इशारा!
सरकारने तातडीने लेखी आदेश जारी करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल!
आम्ही शांत आहोत, पण ही शांतता सरकारसाठी धोक्याची घंटा ठरेल!
बुद्ध विहारासाठी मागील 26 वर्षांत एक संपूर्ण पिढी वाया गेली, आता हे पुन्हा होऊ द्यायचे नाही.
1999 मध्ये नवीन पोलीस ठाण्याची जागा बुद्ध विहारासाठी निश्चित झाली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि दलित समाजावरील अन्यायामुळे ती जागा हिरावून घेतली गेली. आता तीच जागा बुद्ध विहारासाठी द्यावी आणि आमच्या जुन्या पिढीच्या संघर्षाला न्याय द्यावा!