फलटणः टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि देशातील अग्रगण्य उद्योगपती रतन टाटा (वय 86) यांचे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने गुरुवारी, 10 ऑक्टोबर, राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शासकीय दुखवट्याच्या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून, मनोरंजन आणि करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रतन टाटा यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाईल.
उद्योगजगतावर शोककळा
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत पत्रक प्रसिद्ध केले आहे. रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते, आणि काल पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली, 1991 ते 2012 या कालावधीत टाटा समूहाने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्राने एक आदर्श व्यक्तिमत्व गमावले आहे.