फलटण, : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. फलटणच्या विकासाबाबत शरद पवार यांनी नेहमीच दूजाभाव केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “मी पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना विजय मिळवून, तुतारीवाल्यांच्या कारवाया मोडून टाकणार आहे,” असे नाईक निंबाळकर यांनी ठामपणे सांगितले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या विशाल मैदानावर लाडकी बहीण सन्मान सोहळा व भाजपा महायुती कार्यकर्त्यांचा विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितीत प्रमुख मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, भाजप उमेदवार सचिन कांबळे पाटील, माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांचा समावेश होता.
तीन राजे बंधूंच्या राजेशाहीवर गंभीर आरोप
आपल्या भाषणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजेशाही वृत्तीवर तीव्र टीका केली. “राजेशाही राबवून फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी बारामतीला विकले गेले. त्यामुळे तालुका गुलामगिरीत राहिला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “तीन राजे बंधूंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारांना मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सत्ताधारी गुंडगिरीच्या कारवाया, मी लवकरच चौकाचौकात फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात जनतेसमोर आणणार आहे,” असे नाईक निंबाळकर यांनी ठामपणे सांगितले.
सत्तेवर असलेल्या राजेंची एकाधिकारशाही
तिन्ही राजे बंधूंच्या एकाधिकारशाहीला विरोध करताना नाईक निंबाळकर म्हणाले, “माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर, हिंदुराव नाईक निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे आणि चिमणराव कदम यांनी प्रामाणिकपणे तालुक्याची सेवा केली. मात्र, तिन्ही राजे बंधूंनी आपल्या घरातीलच लोकांना सत्तास्थाने दिली. गेल्या तीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राजे बंधूंनी तालुक्याच्या हितासाठी काहीच केले नाही, उलट घरातल्यांचेच नाव रस्त्यांवर आणि संस्थांवर दिले आहे.”
बौद्ध समाजावर होणारा अन्याय
फलटण तालुक्यातील बौद्ध समाजाचे उद्योगपती नंदकुमार तासगावकर यांना साखर कारखाना काढण्यापासून थांबवण्यात आले. “जर त्यांचा साखर कारखाना झाला असता, तर अनेक लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र, तिन्ही राजे बंधूंनी हे होऊ दिले नाही. त्यांना सर्व सत्ता आपल्या घरातच हवी होती,” असे नाईक निंबाळकर यांनी आरोप केला.
फलटण तालुक्याची वाईट अवस्था
नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील सध्याच्या स्थितीवरही भाष्य केले. “श्रीराम साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, बुलढाणा अर्बन आणि फलटण दूध संघ यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तालुक्याला कर्जबाजारी करण्याचे काम विरोधक करत आहेत. गुन्हेगारी वाढवून, गुंडगिरीला पाठिंबा देणारे हेच लोक आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
मी केलेली विकासकामे
आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करताना नाईक निंबाळकर म्हणाले, “मी तालुक्यातील सर्वात मोठा आणि अधिक दर देणारा साखर कारखाना उभारला आहे. नाईकबा माळी येथे नवीन एमआयडीसी प्रकल्प उभारला जात आहे. निरा देवघर कालव्याची रखडलेली कामे सुरू करून दोन बोलकवडी कालवा बारमाही केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणले आहे आणि रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहेत.”
तिन्ही राजे बंधूंचा निषेध आणि आगामी विधानसभा निवडणूक
“तिन्ही राजे बंधूंचे पाणी पळविण्याचे तुतारीवाल्यांचे कारनामे जनता ओळखून आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना विजय मिळवून या तुतारीवाल्यांचे धाड मोडणार आहे,” असे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.