फलटण :- फलटण शहर आणि तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हा आदेश जारी केला आहे. या कारवाईत तौफिक इम्तियाज कुरेशी (वय २३), ईलाही हुसेन कुरेशी (वय २५), अरबाज इम्तियाज कुरेशी (वय २८) आणि ईनायत हुसेन कुरेशी (वय २७), सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण, यांना तडीपार करण्यात आले आहे.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी या टोळीच्या कारवायांची तपासणी करून अहवाल दाखल केला होता. या टोळीच्या सदस्यांवर अनेक वेळा गुन्हे दाखल होऊन अटक तसेच प्रतिबंधक कारवाई झाली होती. परंतु त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबली नाही, म्हणून तडीपारची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
उपद्रवापासून मुक्तता
फलटण तालुक्यातील जनतेला या टोळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. त्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत संबंधित टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.
सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई
नोव्हेंबर २०२२ पासून सातारा जिल्ह्यात कलम ५५ अंतर्गत ३१ उपद्रवी टोळ्यांमधील १०० इसमांना तडीपार करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १३१ इसमांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे, तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत एका गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. आगामी काळात देखील सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोका, आणि एमपीडीए सारख्या कडक कारवाया केल्या जातील.
ही कारवाई हद्दपार प्राधिकरणासमोर सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम यांनी पुरावे सादर करून केली.