
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत योग्य नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिले होते. त्यापूर्वीच जुलै महिन्यात पुणे शहर तसेच उपनगरांच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत आणि अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं पाणीकपात रद्द करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता धरणांतील पाणीसाठा वाढत असल्याने राज्य सरकारने पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




