
सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा; भाजपचा दावा तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सत्तेचा तिढा कायम आहे. कोणाचा अध्यक्ष होणार याबाबत राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शाब्दिक चकमकींना सुरुवात झाली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी “काहीही झालं तरी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होणार” असा ठाम दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली. “ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलायलाही आम्हाला भीती वाटते, कारण लगेच दुसरा पालकमंत्री नेमला जातो,” असा टोला त्यांनी लगावला.
पत्रकारांनी “तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता का?” असा प्रश्न विचारल्यावर देसाई म्हणाले, “मला तो अधिकार नाही; मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उपरोधिक टिप्पणी केली.
दरम्यान, जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये बोलताना सांगितले की, सातारा जिल्हा परिषदेत भाजपचे 27 सदस्य निवडून आले असून एक अपक्ष सदस्यही त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडेच येईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पातळीवर चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. “चमत्कार करण्याची इच्छा नाही; पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल,” असेही गोरे म्हणाले.
दरम्यान, साताऱ्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सातारा जिल्हा परिषद संख्याबळ (एकूण जागा : 65)
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : 20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01
राष्ट्रवादी काँग्रेस (20), शिवसेना (16) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य मिळून त्यांची एकूण संख्या 37 होते, जी बहुमतासाठी पुरेशी आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. मात्र भाजपनेही आपले प्रयत्न सुरू ठेवले असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








