
मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. प्रदूषणाच्या समस्येवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात प्रदूषणाची समस्या फार मोठी आहे. शहरात देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून शुष्क वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागात असलेले डम्पिंग तसेच अनधिकृत चालणारे आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) याला जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत ईशान्य मुंबईचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नुकतेच पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कार्यवाही करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.




