साताऱ्यात राजकीय तापमान वाढले! “खुर्चीत बसून संपवेन” – रामराजे निंबाळकरांचा इशारा

0
2
साताऱ्यात राजकीय तापमान वाढले! “खुर्चीत बसून संपवेन” – रामराजे निंबाळकरांचा इशारा

सातारा – “मी थकलो नाही, डोकं अजूनही चालतंय. जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसवून संपवेन,” असा थेट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

फलटणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना रामराजे निंबाळकर यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “१९९१ साली मी पहिल्यांदा फलटणमध्ये भाषण केलं होतं. तेव्हापासून आम्हाला चुकीचं राजकारण मान्य नव्हतं. त्याकाळी सत्ताच केंद्रबिंदू होती, विकास नव्हता. त्यामुळे आम्ही राजकारणात आलो आणि फलटणसाठी विकासाच्या वाटा उघडल्या, पाणी आणलं.

“डोकं चालतंय, काळजी करू नका!”

रामराजे म्हणाले, “माझं वय ७७ आहे. तरुणपणी क्रिकेट खेळताना झालेली पायाची दुखापत अजून त्रास देते. पण माझं डोकं अजूनही शाबूत आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. खुर्चीत बसून संपवेन!” त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करताना सांगितले की, “तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे, हा विश्वास गमावू नका.

नेमका इशारा कोणाला? राजकीय चर्चांना उधाण!

रामराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. रामराजे अजित पवार गटाचे असल्याचे जरी मानले जात असले तरी, लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रणजित निंबाळकरांचा पराभव झाला, असे मानले जाते.

रामराजेंच्या “खुर्चीत बसून संपवेन” या वक्तव्याचा रोख नेमका कोणावर आहे, यावरून आता राजकीय चर्चांना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा भाजपच्या विरोधकांसाठी आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.