फलटण : शहरातील आठवडा बाजार रविवार पेठेत भरवावा, या मागणीसाठी श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाच्या वतीने फलटण नगरपालिका, प्रांत कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सध्या आठवडा बाजार रविवार पेठ व माळजाई मंदिर परिसरात भरवला जात असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
पालिकेने काही दिवसांपूर्वी आठवडा बाजार रविवार पेठेत भरवण्यास सुरुवात केली होती. मात्र, तालुक्याच्या बाहेरील भाजी विक्रेत्यांच्या विरोधामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हा बाजार माळजाई मंदिर परिसरात भरवला जात आहे. या निर्णयामुळे रविवार पेठेतील व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजार पूर्वीप्रमाणे रविवार पेठेतच भरवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पर्यटक आणि स्थानिकांना त्रास
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माळजाई मंदिर हे फलटण शहरातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. तिथे बाजार भरवल्यास पर्यटक तसेच शहरातील वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास होतो. याशिवाय, शेजारील तालुक्यांतील विक्रेते येथे विक्रीसाठी येत असल्याने स्थानिक भाजी विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आठवडा बाजाराच्या व्यवस्थापनात प्रशासनाने योग्य तोडगा काढावा आणि बाजाराचे विभाजन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार अहिवळे, उपाध्यक्ष कादरभाई बागवान, उपाध्यक्ष अरुण अहिवळे, सचिव नितिन घोडके, सदस्य बापूराव भोसले यांच्यासह तब्बल 192 भाजी विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.